Tuesday, June 17, 2014

वर्षाऋतु


सीताहरण झाल्यावर तिचा शोध घेता घेता श्रीराम - लक्ष्मण माल्यवान पर्वतावर पोहोचले. याच दरम्यान वर्षाऋतु सुरु झाला. आद्य कवि वाल्मीकिंना देखिल रामाच्या मुखातुन वर्षाऋतुचे कौतुक लक्ष्मणाला ऐकवण्याचा मोह आवरला नाही. वर्षाऋतुचे तोंड भरुन कौतुक करताना देखिल रामाला सीतेचा विरह जाणवतो आहे.

===============

जणू आसन्नप्रसवा गर्भधारिणी,
मार्ग क्रमती मंदगामिनी,
धारण करुनी गर्भि जलाशय
तनु अलंकारली सौदामिनी ।।१।।

नभ उतरले गिरिशिखरावर,
पाय-या जणू या सौमित्रा,
चढुन जावे क्षणिक झरझर
बलाकमाला द्यावी मित्रा ।।२।।

भरुन ओंजळ घ्यावी ज्याची,
गंध केतकी असा चिंब अन्
माखुन घ्यावा गंध मातीचा,
घमघमुन जावे कुटीर अंगण ।।३।।

लगडुन आले थेंब बिलोरी,
झुकुन गेला तो जांभुळ बघ,
मागला निसटला झाडावरुनी,
रंग तयाचे किती मोज बघ ।।४।।

केकारव करती मोर आम्रवनी,
उडती चक्रवाक अन् बगळे,
हिरव्या गार तृण शालीवर,
इंद्रगोपांची लाल ठिगळे ।।५।।

माल्यवान गेला मदात झिंगुन,
सृजनास लागते काय आणखि?
धरणीच्या तापल्या श्वासासारखि
जळत असेल जानकी, हाय! मम सखि ।।७।।

- सौरभ वैशंपायन