Wednesday, October 30, 2013

पुनरुत्थान!

 काही लाख वर्षांपूर्वी तिथे रोजच निसर्गाची दिवाळी साजरी व्हायची. लावारसाचे अनार उंच उंच उडायचे. निसर्गचक्राप्रमाणे ते शांत होत गेलं आणि उभी राहीली एक अभेद्य भिंत - सह्याद्रि!

पुढे त्या सह्याद्रिच्या अंगा खांद्यावरती अनेक सत्तांनी आपली ठाणी वसवली. श्री शिवछत्रपतींनी देखिल अनेक दुर्गम दुर्ग जिंकले अथवा नव्याने बांधले.


त्यावेळी ज्या दुर्गांनी छातीचा कोट करुन परकियांचे तोफगोळे आपल्या अंगावर झेलले व इथल्या मातीला स्वातंत्र्य मिळवून दिले - राखले. आज त्या दुर्गांची आपण साधी स्वच्छ्ताही राखू शकत नाही हि अत्यंत लाजेची गोष्ट आहे. अनेक कद्रू, कपाळकरंटी आणि निर्बुध्द लोकं तिथे आपली नावे लिहितात, दारुच्या पार्टी करतात, पान - गुटक्यांच्या पिंकांचे सडे शिंपतात ...... पण अगदिच अंधार नाहिये. पणतीची एक मिणमिणती वात सुध्दा अंधार दूर करु शकते तश्या ह्या निराशेच्या गोष्टिला छेद देणारे तरुण आज महाराष्ट्रात आहेत.

आपण मोठ्या आनंदाने दिवाळी साजरी करत असताना आपल्या शिवरायांचे दुर्ग अंधारात कसे? ह्या प्रश्नाने बेचैन होऊन मग सुरु झाला एक नवा उपक्रम. ऐन दिवाळीच गडकोटांवरती साजरी करायची. महाराष्ट्रातल्या एकातरी दुर्गावरती जाऊन शक्य तितकी साफ सफाई करायची, डागडुजी करुन गडावरची मंदिरे, समाधी, महाद्वार, पायर्‍या यांना तोरणांनी, फुलांनी, रांगोळ्यांनी, पणत्यांनी सजवायचे आणि अंधार पडला कि त्या पणत्या उजळवायच्या. शतकानुशतके अंधार बघितलेल्या दुर्गांना त्या २-४ दिवसात का होईना पण पुन्हा प्रकाशित करायचे.

मग एक चमत्कार घडतो, दुर्गातील वास्तू पुरुष जागा होतो. शहारुन उठतो, त्याला शिवकालातील उडवलेल्या चंद्रज्योती आठवतात. चार क्षण का होईना तो भरुन पावतो. ऐन सणासुदिला घरदार सोडून दूर गावच्या लाडक्या आज्जी - आजोबांना भेटायला जावं तसं आपणहून आलेल्या त्या तरुणांना तो तोंड भरुन आशिर्वाद देतो - "कल्याणमस्तु!", "तस्थातु!"

अश्या अनेक संस्था आजआपल्या आजूबाजूला काम करतात. FB वरती त्यांची पेजेसआहेत. महिना - पंधरा दिवस आधी त्यांचे संकल्प व त्यावर्षी निवडलेला दिवस आणि दुर्ग तिथे समजू शकतो. तुम्हालाहि शक्य झालं तर अश्या एखाद्या संस्थेबरोबर नक्कि जा. गडावरची दिवाळी अनुभवून बघा. तिथल्या वास्तू पुरुषाचा आशिर्वाद घ्या!

आणि समजा हे जमलं नाहि तरी एक गोष्ट नक्की करा ..... आजुबाजुच्या लहान मुलांना घरासमोर एखादा छोटासा "दुर्गम" गड बांधु द्या. या मातीशी त्यांनी नाळ पुन्हा जोडा!

शुभ दिपावली!!!

No comments: