Tuesday, March 27, 2012

उत्तर

गर्भरेशमी वस्त्र त्यावरी,
काठ जरीचे सळसळते,
वेळ एकटि अबोल साजण
चुकार कंकण हळहळते ॥१॥

अबोल साजण अबोल हसता
हुरहुरते पाऊल वळते
मी सांगावे तू ऐकावे
शब्दाविण खूण कळते ॥२॥

अता उरावे अता सरावे
दिव्यातले अत्तर जळते,
मिणमिण मिटते ज्योत लाजरी
 एक क्षण नजर मिळते ॥३॥

हळूच यावे मिठीत घ्यावे,
स्पर्शास बावळे मन चळते
असा दुरावा कसा उरावा?
मिठीतलेही अंतर छळते ॥४॥

रातराणीचा गंध मनावर
तनावरती दव गळते
फुले अवेळिच पारीजात का?
प्रश्नाविण उत्तर मिळते.॥५॥

- सौरभ वैशंपायन.

Saturday, March 17, 2012

बॅटमॅन फॉरएव्हर




आता नुसतं "सचिन तेंडुलकर" हे नाव डोक्यात जरी आलं, तरी ओठांचे कोपरे बाउंड्रिलाईनकडे चेंडू धावावा तसे कानांच्या दिशेने आपसूक धावतात. सचिनचं ज्या गोष्टिशी नाव जोडलं जात (अर्थात चांगल्या अर्थी) त्यातही जादू होत असावी - सगळ्यांना आठवत असेल सचिन याआधी "MRF" च्या ब्रॅन्डनेमची बॅट वापरत असे. त्यावेळी आमच्यात देखिल आपापल्या बॅटला तसाच MRF चा स्टिकर लावायचं खूळ आलं होतं. अर्थात तेव्हा हे समजायचं वय नव्हतं कि बॅटला नुसता स्टिकर लावला कि तेंडुलकर नाही बनता येत, पण या अज्ञानात सुख असल्याने असेल कदाचित, ती MRF ची बॅट हातात घेतली, कि टिम मधला एखाद्या फद्या देखिल सहज १५ - २० रन्स करुन जात असे.

सचिनला किती नामाभिधानं द्यावीत? किती बिरुदं लावावीत? त्याला मास्टर ब्लास्टर म्हंटलं, विक्रमांचा महामेरु म्हणून झालं, शतकांचा अनभि्षिक्त सम्राट जाहीर केलं आणि ते खरही होतं .... सिंहासनासाठी सम्राट नसतो - सम्राटांसाठी सिंहासन असतं. आणि ते तसं नसलं तर सम्राट जिथे बसतो ती जागा आपसूक सिंहासन बनते. सचिनने काही वेगळे केले नाही. पूर्वी अश्वमेध करु पाहणार्‍या बलशाली राजाला चतुरंग सेना घेऊन पृथ्वी पादाक्रांत करत जावी लागायची, आणि इथे या पठ्ठ्यानं फक्तं २२ यार्डच्या त्या पट्टिवरच इतकि दौड केली इतकि दौड केली कि सगळं जग त्या २२ यार्डात सामावलं. आणि बरोबरही आहे, वामनाने सुध्दा तीन पाऊलातच तीन्हि लोकं पादाक्रांत केले होतेच कि ..... सचिन तसाही उंचीने आणि आता कर्तृत्वाने "वामनच" आहे. फरक एकच त्या वामनाने बळी राजाला पाताळात धाडलं, हा बॅट्समनचे "बळि" घेणार्‍यांना प्रेक्षकांत धाडतो.

म्हणाल तर भारतात इतर अनेक खेळाडुही मोठे होते - आहेत, द वॉल असलेला द्रविड होता, पण त्याची बॅटिंग हि अतिसुंदर नववधूप्रमाणे होती. लाजत मुरकत आपलं आरस्पानी सौंदर्य दाखवायची, उगीच आंगचटिला येणार्‍या मवाली चेंडुंशी अंतर राखण्याचा खानदानीपणाही तिच्यात होता. द्रविड भारतीय संघाचा तारणहार नक्किच होता पण द्रविडची "भीती" कधीच वाटली नाही, आणि समजा तो पाच दिवस पीचवर उभा राहून दोन्हि संघांच्या चारही इनिंग एकटाच  खेळून गेला असता तरीही ती वाटली नसती. त्या उलट सेहवाग - दहा वर्षांच्या एखाद्या वांड मुलाला हातात चार फुटी वजनदार दांडके देऊन "हं, ही माळ्यावरची गादी! धोपटून साफ कर बरं!" हे सांगितल्यावर तो ज्या उत्साहाने ते काम करेल त्याच उत्साहाने सेहवाग पीचवरती वावरतो. सेहवाग कुठलाही प्रकार खेळला तरी T-20 चा शोध त्यानेच लावल्यासारखा खेळतो (उदा - वेस्ट इंडिज विरुध्द ODI मध्ये केलेले २१९). पण "सचिन" हा "सचिन" आहे त्याची बॅटिंग ही एखाद्या प्रचंड पडद्यावर सादर होणार्‍या रोमन युध्दकथेवरच्या चित्रपटासारखी असते आणि त्याचे फटके हे अक्षय्य भातातल्या अस्त्रांसारखे असतात. कधी कधी ICC ला सांगावसं वाटतं कि बाबांनो क्रिकेट  ग्राउंडला "स्टेडियम" का म्हणता?? म्हणण्यापेक्षा "रिंग" म्हणा (तसंच बॉक्सिंगच्या "चौरस" बाउटला "रिंग" का म्हणतात हे सुध्दा कोडंच आहे), म्हणजे जेव्हा जेव्हा सचिन खेळायला येईल तेव्हा दरवेळि नव्याने "लॉर्ड ऑफ द रिंग्ज" बघता येईल. कारण कुठल्याही ’गोलात’ उतरला तरी लॉर्ड तोच असतो.

सचिन आज २२ वर्ष खेळतोय, अजून किती खेळेल माहीत नाही (पुढल्या वर्ल्डकपची टिम "सचिन" हे नाव सोडुन बदलली असेल तरी मला आश्चर्य वाटणार नाही .... कधी कधी तर वाटतं विराट कोहलीला सुध्दा सचिनच्या हस्ते लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळेल तेव्हाही सचिन क्रिकेट खेळतच असेल). एखाद्या आयुर्वेदिक औषधाचं लिटरभर पाणी उकळून - उकळून त्याचा अर्धाकप काढा करावा तसं सचिन क्रिकेट खेळला आहे. म्हणूनच सचिन हा क्रिकेटचा परीपाक आहे. वर्ल्डकपच्या साखळि सामन्यात सचिन आऊट झाल्यावर साऊथ आफ्रिकेविरुध्द उरलेल्या आठ जणांनी केलेली हाराकिरी पाहून, पोलिओ डोस सारखं सचिनच्या अंगठ्याच २ - २ थेंब तीर्थ त्या प्रत्येकाला पाजावसं वाटलं होतं .... म्हणजे अशी पांगळी झालेली किंवा ऐनवेळि पक्षाघाताचा झटका आल्यागत कोसळलेली बॅटिंग निदान उभी तरी राहिली असती.

 सचिन आजवर इतका खेळला, वन डे मध्ये अठरा हजारहून अधिक धावा कुटल्या, टेस्ट मध्ये पंधरा हजार धावांपेक्षा जास्त केल्या. इतकि किर्ती, मान मरातब, पैसा मेहनतीने कमावले. कधी कधी विचार येतो कि सचिनलाच काय वाटत असेल? कारण त्याच्या प्रत्येक धावेसरशी त्याचा स्वत:चाच आधीचा रेकॉर्ड मोडला जातोय. त्याच्या मागे असलेला पॉन्टिंग जवळपास ४ हजार रन्सनी मागे आहे. आणि इतकं असून पॉन्टिंगचा उद्दामपणाचा अंशही सचिनच्या वागण्यात दिसत नाहि. सचिन फक्त पीच वरती असला कि मुजोर होतो ते सुध्दा फक्त बॅटनेच. सचिन मैदानात डोक्यावर बर्फ ठेवुन वावरताना दिसतो. तो कितीही चिडला तरी त्याच्या हातून गैरवर्तन होत नाही. वर्ल्डकपच्याच विंडिज विरुध्दच्या मॅच मध्ये देखिल अंपायरने नाबाद दिल्यावरही स्वत: खिलाडु वृत्ती दाखवुन, हा शांतपणे पॅव्हिलिअन मध्ये परतला. आज सारखीच तो जेव्हा मोठी खेळि करतो आणि त्यानंतर भारत हरत असेल तर त्याला किती मानसिक त्रास होत असेल?? गेले वर्षभर त्याचे शतक झाले नव्हते तर भल्या भल्यांनी त्याला निवृत्तीचा सल्ला दिला होता. त्यात द्रविडच्या निवृत्तीने तर मिडियाने अजून बोंबाबोंब करायला सुरुवात केली होती. पण जो २ दशकांहुन अधिक वर्ष क्रिकेट खेळतो आहे त्याला त्याच्यात क्रिकेट बाकि आहे कि नाहि हे समजणार नाहि का? बरं आता झालं महाशतक तर म्हणे ऑस्ट्रेलियात काय धाड भरली होती त्याला? बांगलादेश काय टिम आहे का? ... लगोलग बांगलादेशाने "विश्वविजेत्या संघाला" उत्तर दिलंय. "आम्हांला लिंबू-टिंबू समजू नका!" आता बोला, बाकि कोणी केले का मग बांगलादेश विरुध्द शतक?

असो, नेहमीच किरकिर करायला जन्म घेतलेल्यांना खास सल्ला - सचिन इतका पुढे निघून गेलाय कि त्याला स्पर्ष करणं जवळपास अशक्य आहे. तरी एक गोष्ट सांगू इच्छितो कि समजा उद्या क्रिकेटमध्ये एखादा नविनच चमत्कार जन्माला आला आणि त्याने रोज सकाळि उठुन एक सेंच्युरी जरी केली ना, तरी तो "सचिन" नाही हो बनू शकणार. खरच "सचिन" होणं खूप कर्मकठिण आहे. फार फार पूर्वी "ब्रह्मर्षी" होणं जितकं कठिण होतं ना कदाचित तितकच.

सगळ्यांनी सचिनला नावे ठेवली. काही कर्मदरीद्रि लोकांनी शब्दश: नावे ठेवली, आणि आमच्या सारख्या लोकांनी दर शतकानंतर ’घालिन लोटांगण’ म्हणत त्याला नावे बहाल केली पुढेही करत राहुच ..... पण सध्यातरी मला फक्त एकच नाव सुचतंय "द बॅटमॅन".... "बॅटमॅन फॉरएव्हर".

- सौरभ वैशंपायन.

Wednesday, March 14, 2012

Ra.hul

"भिंत" म्हंटल्यावर पहिल्यांदा आठवते ती चीनची भिंत, मग चांगदेव वाघावर बसून भेटायला येत आहेत हे ऐकून ज्ञानोबा माऊलींनी म्हणे ते ज्या भिंतीवरती बसले होते ती भिंतच त्यांच्या दिशेने चालवली होती ती भिंत, आणि जर्मनीचेच नसून जवळपास जगाचे दोन भाग करणारी आणि मग ८९ मध्ये धुळिस मिळालेली "बर्लिन वॉल". अनेक शतकांतून अश्या जग बदलणार्‍या भिंती निर्माण होत असतात. परवाच "धावणारी भिंत" क्रिकेट मधून निवृत्त झाली आणि आणखि एक चमत्कार पुढल्या पिढ्यांसाठी पुस्तकांत नोंद करण्यापुरता उरला.

पानिपतातून कसं जानू भिंताड्या ३ दिवस तग धरुन सदाशिवराव भाऊंच्या पत्नीला वाचवत  ग्वाल्हेरला निसटला? तसंच, ग्राउंडवरती आपल्या टिमने पराभवाकडे रांगायला सुरुवात केली कि आपला राहुल भिंताड्या उभा रहायचा, चक्क २-३ दिवस उभा रहायचा. अ‍ॅडलेड घ्या, कलकत्ता आठवा. किंवा नॉन - स्ट्रायकर एन्ड वर सेहवाग ते श्रीशांत असे १० जण बदलले तरी हा आपला स्ट्राईकवरती गौतम बुध्दाच्या शांततेने उभा राहिला होता ते आठवा. हे म्हणजे आपल्याच अनिलभाईने पाकिस्तानचा बाजार एकहाती उठवला होता त्याला वरताण झालं. एकदिवसीय क्रिकेटमध्येहि दहा हजारहुन अधिक धावा करुन त्याने केवळ तो केवळ कसोटि क्रिकेटमधला खेळाडू नव्हता हे आरामात सिध्द केलं.

राहुल द्रविड हा नको इतक्या सद्‍गृहस्थ धाटणीतला होता. म्हणजे नॅटवेस्ट सीरीज फायनल मध्ये गांगुलीने शर्ट वगैरे फिरवला तसं राहुलला स्वप्नातहि शक्य नव्हतं कारण तो मुळात त्याचा पिंडच नव्हता. संझगिरी एकदा म्हणाले होते कि सौरवच्या जागी राहुल असता तर त्याने खिश्यातून झटकायला म्हणून रुमालहि काढला नसता. पण मुळात द्रविडचे अवतारकार्यच वेगळे होते. म्हणजे वनवासात गेलेल्या राम-सीता-लक्ष्मणाचे कौतुक होते, श्रीरामाच्या पादुका सांभाळलेल्या भरताचे कौतुक होते पण १४ वर्षे आपल्या पतीपासून दूर राहिलेल्या उर्मिलेबद्दल कोणालाच पडली नसते .... अनेकदा तसंच अक्षम्य दुर्लक्ष द्रविडबाबत झालं. पण तो तिथे नसता तर? हा विचार केला कि केवळ द्रविड होता म्हणून पराभव टळला अश्या पोतडिभर मॅचेस सहज काढता येतील. मात्र त्याने कधीच नाराजीचा जाहिर सूर काढला नाहि. तो फक्त खेळत राहिला. त्याला कोणी सचिन - लारा - जयसूर्याच्या पंक्तीला बसवले नाहि, त्याला "स्फोटक" वगैरे कधी कोणी म्हंटले नाहि. अगदि द्रविड आउट झाला म्हणून वैतागून कोणी टिव्ही बंद केल्याचेहि मला आठवत नाहिये. पण इतर कोणी असलं नसलं तरी द्रविड असला कि आशेचा तंतू आपसूक चिवट व्हायचा. मॅच जिंकू, किमान ड्रॉ करु इथवर तरी समाधान मनात आपोआप असायचं. (या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात राहुल खेळू शकला नसल्याचं कारण बहुदा ऑसीजनी वर्गणी काढून, एखाद्या ७२ घंटे मैं १००% इलाज करणार्‍या बंगालीबाबाला मूठ - करणी वगैरे करायला सांगितलं असावं अशी मला दाट शंका येतेय. नाहितर नेहमीचं ’गिर्‍हाइक’ द्रविड - लक्ष्मण सोडतील?? :-p)

सध्या तरी सचिनचे "महाशतक" हि एक प्रमुख "राष्ट्रिय चिंता" बनली आहे. वास्तविक सचिन ते शतकच काय नंतरहि अजून पाच - पंचवीस शतकं झळकावेल आता मुख्य प्रश्न असा आहे कि द्रविडची जागा कोण घेणार?? एखादि जाहिरात करण्याइतकं का ते सोपं आहे??? कारण राहुलची जागा घेणं म्हणजे फक्त भरमसाठ रन्स करणं नसतं. टिमला गरज असेल तेव्हा नांगर टाकून उभं रहाणं, समोरचा खेळाडू मागहुन येऊन १०० करतो तेव्हाहि आपण ६०-७० वरती शांतपणे खेळत रहायचं, समोर असलेल्या बॅट्समनशी "प्रतिस्पर्धी" म्हणून न खेळता "पार्टनर" म्हणून खेळत रहायचं, अनेकदा नको असलेल्या भूमिका संघासाठी यशस्वीपणे पार पाडणे म्हणजे राहुलची जागा घेणे असा अर्थ होतो. ऐनवेळि विकेटकिपर सारखी प्रचंड कठीण भूमिका पार पाडायची ताकद आताच्या संघात कोणाकडे आहे? राहुलने ती देखिल बजावली. कारण राहुल द्रविडची भूमिका हि भारतीय संघासाठी बहुतांशी द्रौपदि वस्त्रहरणाप्रसंगी श्रीकृष्णाची जी भूमिका होती तीच असायची.


राहुल भोवती प्रसिध्दीचं झगमग करणारं, डोळे दिपवणारं मोठं वलय असं दिसल नाहि. ना त्याच्या भोवती कुठले वाद कधी उभे राहिले. म्हणजे थोडक्यात बापडा क्रिकेटमधला उच्च मध्यमवर्गिय होता म्हणा ना. एखाद्या गोष्टिची - व्यक्तींची योग्य किंमत ती जागच्या जागी असली ना कि नसते, ती गोष्ट किंवा व्यक्ती गेल्यावरती जाणवणारी कमतरता घालमेल अजून वाढवते ..... राहुल तू विश्वास बाळग - आता जेव्हा जेव्हा भारताचा संघ पराभवाकडे रांगायला आणि मग दुडुदुडु धावायला सुरुवात करेल तेव्हा प्रत्येक घरातून हळहळता आवाज येईल "आता पीचवरती द्रविड हवा होता रे!"

 - सौरभ वैशंपायन