Thursday, December 22, 2011

शिवछत्रपती : एक नितांत सुंदर कोडं!




सध्या http://www.marathaempire.in या साइटच्या निमित्ताने शिवचरीत्र व त्याच्याशी संबधित घटनांवर बरेच वाचन होते आहे. नवनविन संदर्भ वाचनात येत आहेत. शिवपूर्वकाल - शिवकाल आणि शिवोत्तरकाल यांची आलटून पालटून तुलना होते आणि मग इतिहासात "जर-तर" ला स्थान नसते हे हजारदा स्वत:ला बजावून देखिल त्या तुलनेत स्वत:ला मी हरवून बसतो. शि-वा-जी या तीन अक्षरांनी जे काहि घडवलं त्याला जगाच्या इतिहासात तोड नाहि. केवळ मी मराठी आहे म्हणून मी म्हणत नाहिये किंवा यात अतिशयोक्तीहि नाहिये. परदेशी इतिहासकार शिवछत्रपतींची तुलना सिकंदर, नेपोलिअन बोनापार्टशी करतात. पण शिवछत्रपती हे त्यांच्यापेक्षा कित्येकपटींनी सरस आहेत. सिकंदर - नेपोलिअन यांना जगज्जेता व्हायचं होतं, फरक इथुनच सुरु होतो. महाराजांनी खरंतर छत्रपती व्हावं किंवा कोणी जग पादाक्रांत करणारा चक्रवर्ती सम्राट व्हावं म्हणून हे कार्य केलं नाहि. जनतेला आपल्या पोटच्या पोरांप्रमाणे त्यांनी सांभाळलं. अर्थात महाराजांचे लक्ष दिल्लीवर होतेच ते त्याला "थोरली मसलत" म्हणत. पण ते अमर्याद सत्तेसाठी हपापलेले दिसत नाहित.रयतेच्या काडिसहि हात लावू नये हे पत्रातून आपल्या अधिकार्‍यांना सांगतात. आज्ञापत्र किंवा शिवाजी महाराजांनी गडांवरती नामजाद केलेल्या अधिकार्‍यांना युध्द प्रसंगी. शांततामय कालखंडात व नवा किल्ला बांधतेवेळी केलेल्या आज्ञा/धाडलेली पत्रे वाचल्यावर हा माणूस बदलत्या काळाच्या बरोबरीचा विचार करतच होता पण आर्य चाणक्यांप्रमाणेच नंतरची कित्येक शतके सहज अबाधित राहिल - आदर्श राहिल असाहि विचार करत होता हे समजतं. राज्य कारभार करताना आजूबाजूच्या परीस्थितीचे त्यांना किती भान होते व आजूबाजूच्या देशी-परदेशी माणसांची त्यांना किती जाण होती हे त्यांच्या एका पत्रावरुन समजतं. फिरंगी लोकांना समुद्रकिनारी वखार बांधायला दिली कि ते हमखास पाठीशी आरमार घेऊन पुढे तट बांधून किल्ला करणार म्हणजे ती जागा गेलीच समजावे, म्हणून त्यांना समुद्र किनारी वस्ती करु देऊ नये. त्यांच्याशी संबध आले-गेले इतपतच असावेत असे स्पष्टपणे त्यांनी म्हंटले आहे. परकियांचे हेतु महाराजांनी आधीच स्वच्छ वाचले होते हेच यातुन दिसते.


महाराजांनी इतर धर्मियांवर अत्याचार केले नाहित मात्र त्यांना आपल्या डोक्यावर मिर्‍याही वाटू दिल्या नाहित. गरज पडली तेव्हा गोव्याच्या सीमेवरती जूलमाने धर्मांतर करणार्‍या ४ पाद्र्यांना पकडले व त्यांनाच हिंदू धर्म स्वीकारण्याचा हूकूम दिला, तो नाकारताच त्यांचा तिथल्या तिथे शिरच्छेद केला. त्या बरोबर धर्मांध पोर्तुगिजांचे हिंदू जनतेवरील विकृत अत्याचार बरेच थंड झाले. तसेच ३-४ ठिकाणे मंदिरे पाडून बलात्काराने मशिदि उभारल्या होत्या शिवछत्रपतींनी त्या पाडून पुन्हा तिथे मंदिरे उभारल्याचे दाखले आहेत. ज्यांना "हिंदवी" स्वराज्य म्हणताना जीभेला अर्धांगवायूचा झटका येतो त्यांच्यासाठी हे नमुनादाखल सांगतो आहे. शिवाय शिवछत्रपतींचे राज्य हे "हिंदवी स्वराज्य" होते आणि म्हणूनच इतर धर्महि सुखनैव नांदत होते हे लक्षात घ्यायला हवे. आणि शिवछत्रपतीच का? शिवरायांआधीचा कुठलाहि बलाढ्य हिंदू राजा घ्या व त्याच्या राज्यात दुसर्‍या धर्माची मुस्काटदाबी होत होती हे कुणीहि सप्रमाण सिध्द करुन दाखवावे. हि सामाजिक  गणिते पडताळली कि नसते भ्रम आपोआप लयास जातील. "गर न होते शिवराय तो होत सुन्नत सबकि!" किंवा "काल तुरकान भयो, दख्खनकि ढाल भयो!" हि केवळ तोंड देखली स्तुती सुमने नसून सुमारे हजार वर्ष हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांचा आक्रोश होता. हे काव्यांच्या या दोन पंक्तीच सुमारे हजार वर्षांची ससेहोलपट सांगतात. हजार वर्षांची समाजाची हि धार्मिक फरपट थांबवणारी व्यक्ती अर्थातच "महान" बनते. इथे शिवराय "धार्मिक" कसोटिंवर उजळुन समोर येतात.



"योध्दा किंवा सेनापती" म्हणून महाराजांचा विचार करताना दोन गोष्टि आधी सांगतो एक म्हणजे अमेरीकेच्या वेस्ट पॉइंट मिलटरी अकादमीत शिकवण्यासाठी जगभरातल्या उत्तम लढायांची वाळूची प्रतिके तयार केली आहेत. त्यात २ युध्दे मराठ्यांची आहेत एक आहे प्रतापगडचे शिवराय-अफझलखान युध्द व दुसरे म्हणजे थोरल्या बाजीरावांनी जिंकलेली पालखेडची लढाई. दुसरी गोष्ट अशी कि व्हिएतनामच्या प्रतिकाराचे प्रतिक असलेले नेते "हो-ची-म्हिन" जेव्हा भारतात आले होते तेव्हा त्यांनी गुरिल्ला वॉर बाबत बोलताना श्री मोहन धारीया यांना म्हंटले होते "अमेरीकेविरुध्द लढताना आम्हि शिवाजीच्या गनिमी काव्याच्या क्लूप्त्या बारकाईने अभ्यासल्या होत्या!"  अमेरीकेला २४ वर्ष आगीचा पाऊस पाडून देखिल व्हिएतनाम मधून हरुन बाहेर पडावं लागलं होतं त्या पार्श्वभूमीवर याचा विचार व्हायला हवा. हे म्हणजे तीनशे वर्षांनी देखिल जूलूमा विरुध्द आवाज उठवणार्‍यांच्यापाठी शिवराय उभे राहिल्यासारखे तर होतेच पण अप्रत्यक्षपणे अमेरीकेलाच हरवल्यासारखे नव्हते काय? हा विचार केल्यावर मग महाराजांमधला योध्दा त्याचे तंत्र पुन्हा काळाच्या कसोटिवर यशस्वीपणे उतरते. कमीतकमी सामान व शक्य तितके चपळ सैन्य हा त्यांचा मुख्य मंत्र होता. अगदि स्वत: महाराज युध्दभूमीवर असतानाहि, जाड कापडाचे २ तंबू असत. लहान तंबु त्यांच्यायसाठी व मोठा तंबू चर्चा करायला त्यांना व सरदारांना असे, बास, इतकाच काय तो पसारा. जत्रेला निघाल्यागत आपले जनाने - बगीचेच गाड्यांवर लादुन फिरणार्‍या मुघलांना महाराज व मावळे येता-जाता आरामात का टपलवून जात याचे उत्तर यानंतर फारच सोप्पे होऊन जाते. तीच गोष्ट आरमाराची. भारतातील इतर मुख्य सतांचा आरमाराबाबत आनंद असताना, ज्याचे आरमार त्याचा समुद्र हे ओळखून व समुद्रप्रवास निषिध्द मानणारी वेडगळ वैचारिक जळमटे त्यांनी पार झटकून टाकली व समर्थ आरमाराची निर्मिती केली. पार कॉंगो-मस्कत पर्यंत मराठी जहाजे जात होती. अखेर "शिवाजी मुळचा दर्यावर्दि नाहि हि देवाची कृपा अन्यथा त्याने सगळा समुद्रच जिंकला असता!" असे म्हणायची पाळि त्यांनी टोपिकरांवर आणली होती. दुर्गबांधणीचे तंत्रज्ञान बघितल्यावर महाराज किती श्रेष्ठ दर्जाचे दुर्गस्थापत्यविशारद होते हे समजून येतं. खास करुन राजगड व रायगडची राजधानी म्हणून केलेली निवड. कुरटे बेटावर अजिंक्य शिवलंका असा सिंधुदुर्ग उभारण्याची कल्पना हे आजहि साक्ष द्यायला उभे आहेत.



राज्य व राज्यकर्ता म्हणून अजून एक सर्वात महत्वाची बाब म्हणजे "आर्थिक" आघाडि. सुरुवातीला महाराजांनी पैसा जमा करायला दोनदा सुरत, कारंजे, दिंडोरी वगैरे लुटले तरी ती तत्कालिन गरज होती हे लक्षात घ्यायला हवे. स्वराज्याच्या सुरुवातीला पैसा उभारण्यासाठी दुसरी सोय नव्हती. आणि तसाहि झिजिया कर हा लुटिपेक्षा वेगळा नव्हता असे माझे वैयक्तीक मत आहे. आमच्याच देशात येऊन आंम्हाला नागवणार्‍या परदेशी लोकांच्या लेखणीला बळी पडलेले आमचे माजी पंतप्रधान शिवरायांना "लुटारु" म्हणून मोकळे होतात तेव्हा भारताच्या इतिहासाबाबतचे त्यांचे ज्ञान व दृष्टि स्पष्ट होते. मात्र महाराजांना व्यापारात मोठा बद्ल घडवून आणायचा होता व एक मोठे व्यापारी केंद्र रायगडवरती वसवायचे होते हे रायगडवरील हुजूरबाजार (ती "बाजारपेठ" नव्हे) व आज्ञापत्रातील "साहुकार" प्रकरण सांगते. तसेच गोव्यातुन येणारे मीठ पोर्तुगीज कमी दरांत विकतात त्याने स्वराज्यातील मीठाला तोटा होतो हे समजल्यावर पोर्तुगीज जे मीठ आणतील त्यावर भरपूर कर बसवा हा सोपा उपाय ते सुचवताना दिसतात. अजून अनेक उदाहरणे देता येतील. थोडक्यात तलवार व तराजू  या दोहोंचे महत्व महाराजांना सारखेच होते हे दिसते.

अश्या अनेक बाबी अनेक सद्गुण दाखवता येतील पण लेखातला शेवटचा म्हणून घेतलेला गुण म्हणजे चरीत्र. शत्रूनेहि आदराने मान झुकवावी इतके स्वच्छ चरीत्र महाराजांनी उभे केले. मुळातला उमदा स्वभाव व निष्कलंक चरीत्र यामुळेच त्यांचासाठी जीव द्यायला तयार झालेले लाखो जण शिवोत्तर कालातहि त्याच स्वामीनिष्ठेने लढत होते - पडत होते - जिंकत होते. गुणग्राहकता हि अजून एक जमेची बाजू. कुथला माणुस कुठे - कधी - कसा उपयोगात आणायचा याचे अचूक ज्ञान त्यांच्याकडे होते.

शिवछत्रपती हा न संपणारा विषय आहे. बौध्दिक, मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, सामरीक कसोट्यांवर ते यशस्वी ठरले. त्यांची उदाहरणे, विचार कालातीत ठरले. अश्यांना "द्रष्टा" हाच एकमेव योग्य शब्द आहे. लाखो कागदपत्रे नष्ट झाली, अजून लाखो कागदपत्रे अंधारात आहेत. शिवचरीत्राला आपण आत्ताशी कुठे स्पर्ष केलाय अजून खूप काहि प्रकाशात यायचे आहे. म्हणूनच म्हणतो शिवछ्त्रपती हे एक नितांत सुंदर कोडे आहे. कधीच न संपणारे तरीहि पुन: पुन: नव्याने सोडवूनहि गुंगवणारे, चकवणारे आणि तितकेच शिकवणारे देखिल!

 - सौरभ वैशंपायन.

1 comment:

उदय कालगांवकर said...

फ़ारच सुंदर विश्लेषण सौरभ ....