Wednesday, April 27, 2011

पुन्हा .....

पुन्हा ती नव्याने आली समोरी, पुन्हा जागली जुनी अंतरे!
पुन्हा खेळ चाले नव्याने सुखाचा, जुन्या वेदनेला ना अंत रे ॥धृ॥


असे काय झाले? कळेना कुणाला, परी सांभाळली उरी खंत रे,
नवी पालवी ही जुन्या भावनेला? कि अखेरीस पुन्हा आकांत रे? ॥१॥


पडावा कवडसा तिच्या आठवांचा? पुन्हा न व्हावी दिक्‌ - भ्रांत रे!
अस्वस्थतेने मी असा वेढलेला जरी भासवितो वरी शांत रे. ॥२॥

 - सौरभ वैशंपायन.

Tuesday, April 19, 2011

संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग!



गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राला प्रणाम करताना - "राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा |" असे त्याचे वर्णन केले आहे. दगडांच्या देशा म्हणजे "गड - कोटांचा" देश. आज एकट्या महाराष्ट्रात सुमारे साडेतीनशेहुन अधिक किल्ले आहेत. शिवछत्रपतींनी स्वराज्याचे स्वप्न पाहीले व ते प्रत्यक्षात उतरवले ते गडकोटांच्यावरील असलेल्या त्यांच्या विश्वासावरतीच. निर्वाणाआधी शिवाजी महाराजांकडे जवळपास तीनशे साठ किल्ल्यांचा ताबा होता. म्हणुनच समर्थांनी त्यांचे "गडपती" असे सार्थ वर्णन केले आहे. पुरंदरच्या तहानंतर महाराजांकडे १८ किल्ले होते. सुभेदार तानाजी मालुसरे यांनी बलिदन देउन "सिंहगड" जिंकून १९ वा किल्ला स्वराज्यात आणला आणि त्यानंतर ८ वर्षात महाराजांकडे अडिचशेहुन अधिक किल्ले होते. हे वाचून मती गुंग होते. जिथे एक एक किल्ला घ्यायला मुघल - विजापुरकरांना महिने किंवा चक्क अनेक वर्ष लागत (उदा. जिंजीचा वेढा जवळपास ९ वर्ष चालला होता) तिथे मराठे कधी एखाद्या रात्री हल्ला करुन किल्ला जिंकत.  आज ना उद्या खुद्द दिल्लीपती दख्खनमध्ये उतरणार हे महाराजांना माहीत होते. आपल्या एका किल्ल्याने एक वर्ष झुंजवले तरी मुघलांना किमान ३६० वर्षे युध्द खेळावे लागेल अश्याच दृष्टिने महाराजांनी गडकोट बळकट केले होते आणि म्हणूनच औरंगजेबाच्या राक्षसी वरवंट्याखाली महाराष्ट्राचं स्वातंत्र्य याच गड - कोटांनीच टिकवले. तीनशे वर्षे चालत असलेली विजापुर, गोवळकोंडा यांसारखी राज्ये त्याने बागेत फिरायला जावं तितक्या सहजतेने घेतली. पण जनरल सह्याद्रि व अतिचिवट मराठ्यांनी औरंगजेबाच्या माथ्याला टेंगळे आणली. आणि "आलमगीर" म्हणावणारा तो इथेच तोबा तोबा करत तीन हात जागेत विसावला.

भारतात अगदी रामायण - महाभारत कालापासून "दुर्ग" ही संकल्पना दिसते. याशिवाय मनुस्मृती, कौटिलिय अर्थशास्त्र, देवज्ञविलास यात दुर्गांचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. मनुस्मृती दुर्गांवर पुढील भाष्य करते - 

धनुदुर्गं महीदुर्गमब्दुर्गम्‌ वार्क्षमेव वा ।
नृदुर्गं गिरिदुर्गं वा समाश्रित्य वसेत्पुरम ॥
सर्वेण तु प्रयत्नेन गिरिदुर्गं समाश्रयेत ।
एषां हि बाहुगुण्येन गिरिदुर्गंविशिष्यते ॥

पैकि - धनुदुर्ग म्हणजे सभोवार अनेक कोस पाणी पुरवठा नसणारा किल्ला. महीदुर्ग - बारा हात उंच तटबंदी असलेला किल्ला. अब्दुर्ग - सभोवार पाण्यामुळे नैसर्गिक संरक्षण मिळालेला किल्ला. वार्क्षदुर्ग - दाट झाडित लपलेला किल्ला. नृदुर्ग - हत्ती, घोडे, रथ, पायदळ यांचं संरक्षण असलेला किल्ला. गिरिदुर्ग - डोंगरावरील किल्ला.

तर राजा कृष्णदेवरायाच्या काळातील लाला लक्ष्मीधर याने देवज्ञविलास मध्ये दुर्गांचे ८ प्रकार सांगितले आहेत - 
प्रथमं गिरिदुर्गंच, वनदुर्ग द्वितीयकम्‌।
तृतीयं गव्हरंदुर्गं, जलदुर्गं चतुर्थकम्‌॥
पंचमं कर्दमं दुर्गं, षष्ठं स्यान्मिश्रकं तथा।
सप्तमं ग्रामदुर्गं स्यात्‌, कोष्ट्दुर्गं तथाष्टकम्‌॥

यात डोंगरी किल्ला, वनदुर्ग, गुहेचा किल्ला म्हणून उपयोग करणे, पाणकिल्ला, दलदलीतील किल्ला, मिश्रदुर्ग, गावकूसा भोवतीचा कोट किंवा लाकडि कोट असलेलं ठिकाण असे आठ प्रकार सांगितले आहेत.



महाराष्ट्रात अनेक सत्तांनी दुर्ग जिंकले अथवा नव्याने बांधले. त्यात सातवाहन, राष्ट्रकुट, चालुक्य, यादव, विजयनगर, मराठे या सत्ता होत्या तर तुघलक, खिलजी, मुघल, बिदरशहा, निजामशहा, आदिलशहा, सिद्दि, पोर्तुगिज, इंग्रज हे शुध्द परकिय देखिल होते. त्यामुळे महाराष्ट्रात बहुविध शैलींचे किल्ले बांधले गेले. अनेकदा मुळ बांधकामात बदल करुन त्यावर आपली शैली उभारायची असे प्रकार देखिल सर्रास दिसतात. महाराष्ट्रात आधिक्याने आढळतात ते गिरीदुर्ग आणि अर्थातच तेही मुख्यत: सह्याद्रिच्या रौद्ररम्य रांगेत. त्याशिवाय गेली अनेक शतके समुद्राच्या थपेडा खात उभे असलेल्या भक्कम जलदुर्गांनी देखिल महाराष्ट्राचे वैभव वाढवले आहे.


सध्यातरी आपण मुख्य विचार करणार आहोत तो शिवछत्रपतींनी बांधून घेतलेल्या दुर्गांचा व मराठ्यांच्या दुर्गांवरची व्यवस्था साधारणत: कशी होती याचा. शिवाजी महाराजांकडे भले ३६० किल्ले होते, पण त्यांनी नव्याने बांधुन घेतलेले किल्ले साधारण १८ - १९ असावेत. त्यात मुख्यत: राजगड, तोरणा, प्रतापगड, रायगड हे डोंगरी तर पद्मदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी हे समुद्रि किल्ले येतात. गड बांधणीत प्रत्येकवेळि महाराजांनी नवनवे तरीही यशस्वी प्रयोग केले. एखादा संपूर्ण दुर्ग किंवा दुर्गाचा महादरवाजा मराठ्यांनी बांधला हे ओळखण्याची सर्वात मोठी खूण म्हणजे त्याचे गोमुखी प्रवेशद्वार. किल्ल्याचा महादरवाचा थेट दिसणार नाही असा दोन बुरुजांच्या आत बांधायचे तंत्र महाराजांनी वापरले. यामुळे शत्रूला थेट तोफ तर त्यावर डागताच येत नाही पण महादरवाज्या समोर आल्या खेरीज शत्रुला त्यावर हल्ला चढवताच येत नाही मात्र यावेळि शत्रू महादरवाज्या समोरील चिंचोळ्या जागेत आला कि तट बुरुजांच्या जंग्यांतून ३ ठिकाणहून त्यावर भरपूर मारा करुन त्याला सहज परास्त करता येते.


पूर्वी महादरवाजा फोडायला हत्ती वापरत. मग त्याला अटकाव करायचे मार्गही शोधावे लागत. त्यासाठी दरवाज्यावर मोठे मोठे अणकूचीदार खिळे लावत म्हणजे धडक मारायला हत्ती बिचकायचे. त्यावर शत्रू असा उपाय करत असे कि दरवाज्या समोर उंट आडवा टेकवून हत्तीला त्या उंटावर धडक द्यायला लावत म्हणजे उंटामुळे हत्तीला ते खिळे दिसत नसत. म्हणजे हत्तीच्या व खिळ्यांच्या मध्ये उंट मेला तरी पलिकडचा दरवाजा फुटत असे. मग यावरचे उपाय म्हणजे  एकतर महादवाज्याकडे येणार्‍या वाटेतला काहि भाग हा इतका चिंचोळा  वा नागमोडि ठेवायचा कि "हत्ती" त्यातून आत येऊच शकणार नाही, दुसरे - दरवाज्यांच्या पुढे हत्तीला धावत यायला मोठी जागाच ठेवायची नाही, तिसरे - दरवाज्या समोर उंच पायर्‍या बांधायच्या व चौथे - दरवाजा थेट समोर न ठेवता उजव्या किंवा डाव्या भिंतीत ठेवायचा. तरीही काही कारणाने समजा महादरवाजा शत्रूच्या हाती पडलाच तरी आत आल्या आल्या थेट किल्ल्यात प्रवेश नसे समोर एक भक्कम भिंत उभी असे म्हणजे संपूर्ण U टर्न किंवा ९० अंशात वळावे तर समोर पुन्हा उंच पायर्‍यांची वाट असे त्याने सहाजिक शत्रूची गती कमी होई आणि या वळणार्‍या वाटेवरती मारा करता येईल अशी सोय आत असे. या खेरीज साधारण डोंगराच्या मध्यावरच तटबंदी घालून डोंगराचा जास्तीतजास्त भाग स्वत:साठी सुरक्षित करायचा आणि शिवाय मग बालेकिल्ला अजून उंचीवर बांधायचा हे तंत्र आपल्याला रायगड, राजगड, प्रतापगडावर देखिल दिसतं.


शिवछत्रपतींनी बांधून घेतलेल्या किल्ल्याचं अजून वैशिष्ट्य म्हणजे मुख्य दरवाजाकडे जाणार्‍या वाटांच्या उजवीकडे किल्ल्याचा कडा व तटबंदि असते. याचं कारण श्री प्र. के. घाणेकरांनी त्यांच्या "अथा तो दुर्गजिज्ञासा" या पुस्तकात देताना सांगितलं आहे कि  पूर्वी मुख्य लढाई ही ढाल - तलवारींनीच होई. शिवाय बहुसंख्य माणसे ही उजव्या हाताचा जास्त वापर करणारी असतात. सहाजिकच तलवार उजव्या हातात असे व ढाल ही डाव्या मनगटाच्या वरील भागात चामड्याच्या पट्ट्यांनी आवळून "बांधली" जात असे. याचा विचार करुन शत्रूला याचाच वापर त्याच्या विरुध्द करण्याच्या दृष्टिने हे दुर्ग बांधले. हल्ला करताना तटबंदि उजव्या बाजूला असली कि सहाजिक त्यांच्या उजव्या बाजूवरुन बाण, बंदूका, उकळते तेल व मुख्यत: दगड - धोंडे यांचा मारा होणार. हा मारा चूकवण्यासाठी (मुख्यत: दगडांचा) त्या सैनिकाला तलवार मध्ये घालता येत नसे अन्यथा तलवारीला खांडे पडून तलवार निकामी होई मग त्यासाठी ढाल वरती उजव्या बाजूला धरणे क्रमप्राप्त होते अन्यथा चाळिस - पन्नास फुटांवरुन फेकलेला लहानसा गोटा अगदी जीवघेणा देखिल ठरु शकतो. पण मग त्यासाठी तलवार डाव्या हातात घ्यावी लागेल. ह्याने  समजा वरुन होणारा मारा चूकवत शत्रू दरवाज्या नजिक आलाच तर अचानक मराठ्यांची लहानशी टोळी दरवाज्या बाहेर हल्ला करायला आल्यास पुन्हा ढाल - तलवारीची अदलाबदली करणे जवळपास अशक्य असे त्याने शत्रूचा मारा निष्प्रभ होई.


शिवछत्रपतिंनी राजाभिषेकानंतर रघुनाथपंतांकडून 'राज्यव्यवहारकोश' तयार करवून घेतला. त्यात सातवे प्रकरण किल्ल्यांवर आहे. तर शिवकालोत्तर कालात लिहिल्या गेलेल्या रामचन्द्रपंत अमात्य यांच्या "आज्ञापत्रात" आठव्या प्रकरणात किल्ल्यांचे महत्त्व, त्यांची रचना व व्यवस्था यावर उहापोह केला आहे. खरतर दुर्गांचे महत्व विषद करणारे ’आज्ञापत्रातील’ ते "दुर्ग" प्रकरण मुळापासून वाचण्यासारखे आहे. तरी या कारणाखेरीज आज्ञापत्र या करीता महत्वाचे आहे कि शिवछत्रपतींच्या आज्ञेवरुन रघुनाथपंतींनी राज्यव्यवहारकोषात सुमारे १४०० फार्सी अथवा मराठी भाषेबाहेरील शब्दांना गिर्वाणभाषेतील प्रतिशब्द दिले आहेत. त्यात अर्थात किल्ल्यांवरील वास्तू अथवा बांधल्या गेलेल्या भागांना असे प्रतिशब्द दिले आहेत. मुळात "किल्ला" हा शब्दच फार्सी आहे. संस्कृत भाषेत आपण त्याला "दुर्ग" म्हणतो, ज्याचा भेद करणे दुर्गम आहे तो दुर्ग. याशिवाय बालेकिल्ल्यास "अधित्यिका", माचीस "उपत्यिका",  खंदक म्हणजेच परीखा असे अनेक शब्द सांगता येतील. शिवाय - चर्या (तटावरची नक्षीदार दगडांची रांग), नाळ (दोन तटांमधली माणसांच्या वावरण्याची जागा (जशी संजीवनी माचीत आहे), जिभी/हस्तीनख (दारासमोरील आडोसा), जंग्या (तटांमधून बंदूका/तीरांचा मारा करायला ठेवलेली जागा), फांजी (तटावरची चालण्याची जागा), रेवणी (खंदक व तट यांच्यातील तटाबाहेरची जागा) असे शब्द किल्यांच्या अनेक भागांसाठी वापरलेले आढळतात.


किल्ल्यांची बांधणी कशी आहे ते बघुन त्याची शैली समजते, बुरुज जर गोलाकार असतील तर ती भारतीय शैली, ’चौकोनी’ असतील तर ते ब्रिटिशांनी बांधलेले तर भिंतीच्या पुढे किंचीत अधांतरी पण भक्कम असलेले किंवा पंचकोनी बुरुज असतील तर ते पोर्तुगिज बांधणीचे आहेत असे समजायचे. काही वेळा भारतीय बांधणीत देखील षटकोनी अथवा अष्ट कोनी देखिल बुरुज आढळतात पण ते क्वचित. उदा राजगड बालेकिल्ल्याचे दोन्ही बुरुज देखिल असेच कोनातील (त्यांना चार कोन आहेत) आहेत. दुपदरी किंवा चिलखती बुरुज ही संकल्पना आपल्याला शिवछत्रपती निर्मित दुर्गांच्या बांधकामात अनेकदा दिसते. बुरुजांच्या बांधणी शिवाय त्या किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावरची चिन्हे, तो किल्ला कोणी बांधला अथवा कोणाकडून जिंकून घेतला हे दर्शवतात. उदा कमळ असेल तर ते देवगिरी सत्तेचं प्रतिक आहे, गंडभेरुंड (द्वीमुखी गरूड) असल्यास विजयनगरचं साम्राज्य, शरभ किंवा सिंह असल्यास आदिलशहा किंवा मराठे, क्रॉस असल्यास पोर्तुगीजांचा किल्ला, गणपती असल्यास पेशवाई काळातील बांधकाम असं सहज ओळखता येतं.  शिवाय अनेकदा विजयाचे चिन्ह म्हणून दुसर्‍यांची प्रतिकं आपल्या प्रतिकांच्या पंज्यात अथवा शेपटित धरलेले दर्शवितात, उदा - काहीवेळा गंडभेरुंड शरभाच्या पायाखाली किंवा सिंहाच्या शेपटित हत्ती धरलेला दाखवतात.


वरील गोष्टि बर्‍याच अंशी माहितही असतात, आता आपण बघूया कि किल्ल्यावरची व्यवस्था कशी असे? - त्यासाठी असे "कान्हूजाबता" म्हणजे कानून+जाबता थोडक्यात सांगायचे तर "नियमावली". केंद्रिय सत्तेकडून ही नियमावली बनत असे. त्या किल्ल्याचा मुख्य असे किल्लेदार. मराठी कागदपत्रात त्यासाठी ’हवालदार’ असाही शब्द वापरलेला आढळतो, वास्तविक हवालदाराचे सुध्दा २ वेगवेगळे उल्लेख आहेत एक ’परगण्याचा’ तर दुसरा ’किल्ल्यावरचा’. सध्या फक्त किल्ल्यापुरता विचार करु. तो हवालदार किल्ला व त्याच्या परीसरातील न्याय, मुलकि व लष्करी कामांसाठी जबाबदार मानला जात असे. मात्र कुठलीही नेमणूक तो किल्लेदार थेट करु शकत नसे. तो फारफार तर शिफारीस करु शकत असे मात्र निर्णय केंद्रिय सत्ताच घेत असे. हे किल्लेदार त्या पंचक्रोशीच्या बाहेरचे असत. याचे कारण, समजा शत्रूने उद्या त्या किल्लेदाराच्या कुटुंबाला पकडून समोर उभे केले तर मानसिक दबावाखाली तो शरण जाण्याची शक्यता असे. कुटुंब दूरच्या कुठल्या गावात असेल तर हि शक्यता उरत नसे.


मुलकि वा आर्थिक कामांसाठी किल्लेदाराला जबाबदार धरले जाई त्याच्या हाताखाली अनुक्रमे सबनिस > कारखानिस > फडणीस (सबनिस व कारखानीस या दोघांच्या हाताखाली वेगवेगळे फडणीस असत) > दफ्तरदार > कारकून अशी फळी असे. पैकि सबनीस जमाखर्च बघत व किल्लेदाराच्या अल्पकालिन अनुपस्थितीत किल्लाची जबाबदारी सबनिसांकडे असे, सबनिस साधरणत: ब्राह्मण जातीचा नेमत. तर कारखानीस किल्ल्यावर अथवा किल्ल्याच्या परीसरात होणारे उत्पादन, रसद व किल्ल्याचे जतन/डागडुजी यांकडे लक्ष पुरवत असे, बहुतेकदा कारखानीस कायस्थ प्रभू असत. गरज असताना किल्ल्यावरील खजिना उघडताना त्यावेळि किल्लेदार, सबनिस, कारखानिस आणि फडणवीस हे तिथे उपस्थित असणे गरजेचे असे. तसेच धान्याचे कोठार उघडायचे असल्यास कोठिदार किंवा कोठावळ्याला असेच उघडता येत नसे त्यावेळि कारखानीस तिथे उभा रहात असे. यांच्याशिवाय किल्ल्यावर तासकरी (घटिकापात्रांवर लक्ष ठेवुन तासांचे तोल वाजविणारा) असत, किल्ला मोठा असेल तर एकापेक्षा जास्त तासकरी असत. त्यांचा पगार सरकार करी. किल्ल्यावर अथवा पायथ्याशी दोन - दोन गवंडि, सुतार, चांभार मुद्दाम आणून वसवले जात. त्यांना सरकारातून पगार मिळत असे. ऐकून नवल वाटेल पण अशी कला असणार्‍यांना सामान्य सैनिकापेक्षा जास्त पगार मिळत असे. आज्ञापत्रात यांखेरीज जोशी, वैद्य, जडिबुटिची माहीती असणारे वैदू. रसायनवैद्य असावेत असे आज्ञापत्र म्हणते.


लष्करी हुद्यांमध्ये किल्लेदाराच्या हाताखाली सरनौबत > तटसरनौबत असत. यांच्याच हुद्याच्या जवळचे म्हणावेत असे नाईक > तटसरनाईक देखिल असत. किल्ला जितका मोठा वा महत्वाचा तिथे यांची संख्या एकाहून अधिक असे.


गडाच्या परीघात महार - मांग यांचे "मेटे" असत. यांना मेटकरी म्हणत. गड यांच्या खांद्यावर शांतपणे डोके ठेवून झोपत असे. कारण परचक्र आल्यास त्याची पहिली लाट हे बहाद्दर आपल्यावर घेत. गडाभोवतालची गस्त हेच घालत. त्यांना आजूबाजूची जमिन कसून गुजराण करावी लागत असे मात्र त्यांवर कुठलाही कर लावला जात नसे. व्यवस्थेत त्यांना आदर होता. किल्ल्याच्या आसपासच पेठा असत. गडावरच्या वस्तू याच बाजारातून मिळत व बाजाराला गडाचे संरक्षण. पावसाळ्यापूर्वी  किल्ल्यावरच्या सगळ्या वस्तू शाकारण्याची व्यवस्था करावी लागे, गहू - बाजरीच्या पेंढ्यांनी घरे, दारूची कोठारे, बुरूज, दोन तटांना जोडणारी ठिकाणे, दरवाजे हे शाकारले जात. त्यासाठी सरकार खालच्या गावातून वेठे (मजूर) बोलावून घेई व बाजारभावानुसार काही हजार गवताचे भारे मागवून घेत.


प्रत्येक किल्ल्याचा वार्षिक अहवाल असे. सरकारातून एक अधिकारी येऊन "AUDIT" करत असे. कधी कधी नव्याने जिंकलेल्या किल्ल्याची पहाणी करुन त्याची डागडुजी, त्याला लागणारे सैन्य, सैन्याला लागणारे धान्य, युध्दकाळाची बेगमी आधीच करुन ठेवण्यासाठी अधिकचा पण बाजूला काढावा लागलेला धान्यसाठा, पाण्याची व्यवस्था, तेल, मीठ, जीरे, मोहरी यांसारखा छोटा खर्च देखिल जमेस धरला जात असे. शस्त्रे सरकारच देत असे. दरवर्षी त्यांची संख्या मोजली जात असे. त्यांची संख्या कमी अथवा जास्त झाली तर त्याची चौकशी होत असे. गुन्हेगाराला कडक शासन होई. कुठली शस्त्रे कोणी बाळगावी याचे नियम होते. परवानगिशिवाय वाघनखे बाळगायची बंदि होती. दुतर्फा खर्च म्हणून एक प्रकार असे म्हणजे एका किल्ल्यावरचा माणूस काही कारणाने तात्पुरता अथवा कायमचा दुसर्‍या किल्ल्यावर नामजाद झाला तर त्याचा पगार नव्या ठिकाणी दिला जात असे मात्र त्याची नोंद पूर्वीच्या किल्ल्यावर देखिल केली जाई. तसेच त्याच्या जमिनीचा कर नविन ठिकाणहून सरकारात जमा होत असे.


सर्वसाधारणपणे किल्लेदाराचा पगार सर्वात जास्त असे साधारण ५००-६०० रुपये. शिवाय त्यांना अब्दागिरेचा मान असे. त्याखालोखाल मग सबनीस, कारखानिस, सरनौबत, तटसरनौबत अशी उतरती भाजणी असे. मात्र क्वचित किल्लेदार नविन असला व सबनिस, कारखानिस हे जुने जाणते व खूप अनुभवी असले तर त्यांचा पगार नवख्या किल्लेदारापेक्षा जास्त असे. या सगळ्यांत विशेष मान होता तो गोलंदाजांना किंवा "तोपचींना". अचूक ठिकाणी तोफा डागण्याचे तंत्र अनेक वर्षे युध्दात आघाडिवर राहून त्यांनी आत्मसात केलेले असे, त्यामुळे यांनाही कधी कधी अगदि कारखानिसांइतका पगार देखिल असे. मोठ्या किल्ल्यांवर ५ पर्यंत तोपची सहज असत. शांतता काळात व मुख्यत: पावसाळ्यात अर्थातच तोफांची काळजी घेण्याचे जोखमीचे काम त्यांवरच असे. सामान्य सैनिकाचा पगार हा साधारण ५ रुपये असे. यातही १/३ - १/३ - १/३ अशी वाटणी करुन अन्न, वस्त्र व मोहरा यात तो पगार विभागून त्याला दिला जात असे.


वर सांगितलेला सगळा खर्च हा "सनदि खर्च" म्हणून अंदाजपत्रकात आधीच नोंद होत असे, व तसे पैसे गडावर पाठवले जात. जो पगार वाटला जात असे त्यासाठी सरकारातून "हजेरनविस" येत असे किल्ल्यावरील सगळ्या सैनिकांची तो स्वत: किल्लेदार, सबनिस, कारखानीस यांच्या समक्ष हजेरी घेत असे व नोंद केलेली संख्या बरोबर आहे का? हे बघत असे. ती बरोबर असल्याची खात्री झाली कि मगच स्वत:कडिल पैसे किल्लेदार - सबनिसाकडे देत असे. मात्र कधी कधी अचानक काही कामे निघत, वीज पडून नुकसान होई, दुष्काळ पडल्याने ठराविक कोट्याचे धान्य गडाच्या आसपासच्या गावांना वाटावे लागे इ.इ. ह्या अनाहुतपणे उपटल्या खर्चांना "गैरसनदि खर्च" म्हणत. हा खर्च किल्लेदार आधी करत असे व मागहुन त्याची पडताळणी, हिशेब करुन मग सरकारातून तो खर्च किल्लेदारास मिळत असे.


गडावर कुठल्याही धर्माचे देवस्थान असेल तर त्याचा खर्च सरकार करत असे. त्याला दिवाबत्तीची सोय करुन दिली जात असे. नंदादिपात किती तेल असावे याचे माप कागदपत्रात "छ-टाक" म्हणजे सहा टाक असावे असे दिले आहे तर माणसाला अन्न शिजवायला "नव टाक" अशी नोंद आहे. आज आपण छटाक, नवटाक  वेगळ्या अर्थी वापरतो ते सोडा, पण त्याचेही लिखित नियम असत. सरकारचे वेगळे तूपाचे भांडार असे एक खाण्याचं तूप दुसरं नासकं तूप. नाव नासकं असलं तरी ते जखमेवर बांधण्यासाठी अनेक वर्षं साठवलेलं तूप असे. नासक्या तूपातून जखमा "बांधत" अथवा "तळत". बांधण्यापर्यंत काय ते समजतही, पण ’जखम तळणं" काय प्रकार आहे? तर त्यांचे हात - पाय कलम होत त्यांचा रक्तस्त्रावाने मृत्यू होऊ नये म्हणून हात कलम केल्यावर लोंबणारे मांस - जखम उकळत्या तूपात पटकन बुडवून बाहेर काढली जाई कि ती जखम "सील" होई.


किल्ल्यावरती अनेक सण उत्साहात साजरे होत. पण मुख्य सण "दसरा". या दिवशी गडावरती नवं निशाण लावत. गडाच्या रक्षणकर्त्या देवतेची पुजा करत. त्याच बरोबर किल्ल्याच्या परीसरातील अतृप्त आत्मे, पिशाच्च यांचीही शांती करण्यासाठी प्रत्येक किल्ल्यावर रेड्याचा बळी देत. हा सगळा खर्च सरकार करे. आधी रेड्याच्या नाकाचा टवका कापून त्याच्या नाकातील रक्त गाळत किल्ल्याला फेरी मारत व फेरी पूर्ण झाली कि किल्लेदार स्वत:च्या हाताने रेड्याचा बळि देई. सैनिकांत त्याचा प्रसाद वाटला जाई. दिवाळित शोभेचे दारुकाम होई. गोळा न घालता दारू ठासून तोफा उडवल्या जात. त्यांनाच चंद्रज्योती म्हणतात.


अजूनही शेकडो लहान - मोठ्या गोष्टि आहेत जसे किल्ल्याचे दरवाजे उघडणे - बंद करण्याचे नियम, किल्लेदाराला सरकारी कामासाठीच किल्ला तात्पुरता सोडावा लागला तर अधिकार कुणाकडे द्यावेत याचे नियम, गडावरती राजप्रासाद असेल त्याची व्यवस्था, वर्षभर तोफगोळे व दारू दमट होऊ नये म्हणून घ्यायची काळजी, हत्यारांची घ्यायची काळजी, गडावरती व गडाभोवताली कुठली झाडे, वृक्ष अथवा झुडुपे असांवित? किल्ल्यावरच्या कचर्‍याचे काय करावे? गडावरची पाण्याची व्यवस्था कशी असावी याबाबत काटेकोर नियम असत.


शिवछत्रपतींच्या किल्ल्यांविषयी आजवर अनेक पुस्तके आली. एकेका किल्ल्यावर इतिहास व व्यवस्था असे एक एक पुस्तक निघाले तरी किमान ३०० पुस्तके निघतील इतका हा विषय मोठा आहे, एका लेखात तो बसणे कदापी शक्य नाही. याच किल्ल्यांनी मराठ्यांना स्वातंत्र्याची चव चाखवली. देशासाठी झुंझताना सह्याद्रि, जंगले व कोकण - गोव्यात फेसाळणार्‍या समुद्राने साथ दिली. या शिखरांवर त्यांच्या पायथ्याशी, किंवा भर समुद्रात आपला इतिहास घडला. अनेक वीर या किल्ल्यांसाठी, महाराजांसाठी, स्वराज्यासाठी लढताना कामी आले. त्यांचा मुकुटमणी देखिल तिथे रायगडावर चीरनिद्रा घेत पहुडला आहे. त्यांचा जन्म झाला गडावर, आयुष्यभर तो महामानव लहान मोठ्या गडकोटांवर वावरला व अखेरचा श्वास देखिल गडावरच घेतला. ते सर्वार्थाने "गडपती" होते. या सगळ्याची आठवण आपण ठेवली पाहीजे. आज आपले गडकोट काळ गिळत आहे. जंगल माजून बुरुज ढासळत आहेत, काही निर्बुध्द आणि कद्रू लोक त्यांच्या भिंतींवर आपली नावे कोरुन ती ठिकाणे विद्रुप करतात तेव्हा मनाला खूप त्रास होतो. समुद्रात नुसता तीनशे फुटि पुतळा उभारुन काहीही फायदा नाही. आपल्या ऐतिहासिक ठेव्याविषयीच जागरुकता नसेल तर त्या नव्याने बांधलेल्या तीनशे फुटि पुतळ्यानी काय मेलेली मने जिवंत होणार? ऐतिहासिक स्मारके हि स्फुर्ती घेण्यासाठी असतात कि कचरा करण्यासाठी? याविषयी समाजाला भान येत नाही तोवर सर्व फुकट आहे. फक्त ज्या वेगाने गडकोट नष्ट होत आहेत ते बघता दोन पिढ्यांनी महाराष्ट्राला "दगडांच्या देशा" अशी हाक मारता येणार आहे का? यावर विचार व्हावा इतकिच अपेक्षा.

बहुत काय लिहिणे? सुज्ञ असा!
विज्ञापना, राजते लेखकावधि ॥

शिवशक ३३७,  चैत्र पौर्णिमा (हनुमान जयंती, शिवपुण्यतीथी).

 - सौरभ वैशंपायन.

============
संदर्भ -
१) अथा तो दुर्गजिज्ञासा - प्रा. प्र के घाणेकर.
२) १७ एप्रिल २०११ रोजी जनसेवा समिती आयोजित दुर्गजिज्ञासा या कार्यक्रमातील श्री निनाद बेडेकर, श्री पांडुरंग बलकवडे व प्रा. घाणेकर यांची व्याख्याने.
३) आज्ञापत्रातील "दुर्ग" प्रकरण.


Friday, April 15, 2011

इस मिट्टि में दम है।



आकाशगंगेत म्हणे असं ठिकाण आहे जिथे नविन तारे जन्माला येतात. दादर, मुंबई २८ मध्ये सुध्दा असंच एक ठिकाण आहे "शिवाजी पार्क". इथेही तारे जन्माला येतात - क्रिकेटमधले. द्वारकानाथ संझगिरी म्हणतात ते अगदि  बरोबर आहे, शिवाजी पार्क जवळच्या घरांतील लहान बाळे उभी रहातात तीच बॅटच्या आधाराने. रोज अनेक जण इथल्या मातीत घाम - रक्त मिसळवून इथली माती नव्याने "तयार" करत असतात. कुस्तीच्या आखाड्यातली चिकण माती जशी  तेल, ताक मिसळवून संस्कारीत करतात व त्यातच बलाढ्य मल्ल तयार होतात तसंच काहीसं.

२२ वर्षांपूर्वी असाच एक तारा या मातीतून निपजला - सचिन. सचिन तेंडुलकर रोज रोज जन्माला येत नाहीत, अशी माणसं घडवणारे साचे देव सुध्दा लग्गेच मोडून टाकतो ,बनलेली मुर्ती पहीली आणि शेवटची. पण सचिनची मुर्ती घडवायला देवाने सुध्दा बहुदा शिवाजी पार्कची माती खणून नेली असावी.

माणूस त्याच्यातील गुणांनी देवपदाला पोहोचतो, सचिनही अनेकांसाठी देव आहे. एखाद्या अवताराचे बालपण जिथे जाते त्या स्थानाला महत्व प्राप्त होतं. मग लोकं ती जागा पूजतात. पण शिवाजी पार्कबाबत असं नाही होताना दिसत. म्हणजे श्रीकृष्णाच्या बाबलीला घडल्या तिथे मथुरेत - गोकुळात डोकं टेकायच, आणि आपला "वामन"  घडताना ज्या मैदानाने बघितला त्यावर कचरा टाकायचा???  निदान सचिनला देव मानणार्‍यांनी तरी नक्किच हे करु नका रे!

शिवाजीपार्कला खूप मोठा "इतिहास" आहे. त्यात राजकिय, सामाजिक, सांस्कृतिक आहेच पण त्याला मुख्यत: आहे तो खेळांचा इतिहास. या मैदानाने अनेक वेगवेगळ्या मैदानी आणि मर्दानी खेळातल्या हिर्‍यांना स्वत:च्या अंगावर खेळवले आहेत. आणि त्यातूनही क्रिकेटसाठी तर हे गुरुकुल आहे. ७-८ क्रिकेट क्लब्सचे पीच आहेत इथे. कधीतरी गावस्कर, वाडेकरांचेही पाय इथल्या पीचना लागले होते.

रोज शेकडो लहान मुले त्यांच्याही वजनाहून अधिक असलेली त्यांची किट सांभाळत येणारे त्यांचे पालक, डोळ्यात सचिन बनण्याची स्वप्ने घेऊन येतात. वर म्हणलो तसे "सचिन" तर सारखे सारखे  नाही बनत, पण रोज सकाळि अनेक मुलं घाम - रक्त त्या मातीत मिसळताना दिसतात, खेळात जीव ओततात, ते बघून जाणवतं कि अजून मातीवर "संस्कार" सुरु आहेत. कोण जाणे कधी तरी १-२ पिढ्यांनी माती संस्कारीत झाली कि एखाद्या रात्री देव परत गुपचूप खाली उतरेल आणि परत थोडिशी माती खणून नेईल ...... after all - इस मिट्टि में दम है!

 - सौरभ वैशंपायन.

Wednesday, April 13, 2011

तख्तास जागा हाच गड करावा...




गेल्या लेखात आपण स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा म्हणजे "राजगडचा" मागोवा घेतला. "गडांचा राजा आणि राजांचा गड" या सदरात येणारा दुसरा गड अर्थात रायगड. हि स्वराज्याची दुसरी राजधानी. चंद्रराव मोरेच्या प्रकरणात महाराजांना जावळित उतरावे लागले. शिवकांळात जावळी परीसरात मोरे, शिर्के, सावंत, हबशी, सुर्वे, दळवी, यांची घराणी वर्चस्व राखुन होती. यांपैकी खेळाणा(विशाळगड) किल्ल्यावरील मोरे हे स्वतंत्र राज्य राखुन होते व उरलेल्या ७ मोरे घराण्यांनी आपला एक प्रमुख निवडुन त्याला "चंद्रराव" किताब दिला. शिवकाळात "चंद्रराव" हा किताब महिपतगडावरील "दौलतराव मोरे" हा पुरुष राखुन होता. "दौलतराव मोरे" ह्याचे निधन झाल्यावर त्याच्या दत्तक पुत्राला – यशवंतरावाला "चंद्रराव" किताब देण्यास विजापुरच्या आदिलशहाने विरोध केला. तेव्हा दौलतरावाची विधवा पत्नी "माणकाई" हिने शिवरायांकडे मदत मागितली. स्वराज्य कार्यात एक मात्तबर माणूस हाताशी येईल असा विचार करुन महाराजांनी चाळिशी उलटून गेलेल्या "मुलाला", "चंद्रराव" किताब मिळवुन दिला. काही काळाने आदिलशाहिचा विरोध शमल्यावर यशवंतरावाने शिवरायांशी बेबनाव मांडला. 

महाराजांनी त्याला जरबेत घेणारा खलिता धाडला पण चंद्ररावाला जावळिच्या घनदाट अरण्याची गुर्मी चढली होती त्याने महाराजांना उलटा मुजोर जबाब पाठवला "येता जावळि ... जाता गोवळि! पुढे एक मनुष्य जिवंत माघारा जाणार नाही! तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येणार ते आजच या! ..... येथे उपाय कराल तर तो अपाय होईल!" तरीही महाराजांनी समजावणारी अजून एक थैली पाठवली "..... जावळि खाली करोन, हात रुमाल बांधोन, भेटीस येवोन हुजूराची चाकरी करणे! इतकियावरी बदफैली केलिया मारले जाल!"  चंद्ररावाने मग्रुर उत्तर पाठवले - " ..... जावळिस येणारच तरी यावे! दारुगोली महजूद आहे!" महाराजांचा संयम संपला. स्वत: जातीने महाराज जावळित उतरले. यशवंतरावाचा माज उतरला. घाबरुन तो "रायरी" किल्यावर जाऊन लपला. अखेर या झगड्यात इ.स. १६५६ मध्ये शिवरायांनी मोरे घराण्याकडुन जावळी जिंकुन घेतली. याच मोहिमेत महाडचे मुरारबाजी देशपांडे शिवरायांच्या सेवेत आले.ते चंद्रराव मोर्‍यांकडून लढत होते पण महाराजांनी त्या हिर्‍याला स्वराज्यासाठी हाक दिली आणि त्यांनी पुरंदर प्रकरणापावतो स्वराज्याची सेवा केली. महाराजांना जावळि मोहिमेत असे हिरे आणि बेलाग चीरे गवसले त्यातलाच एक "रायरी".


मोर्‍यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापूरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. "सके १५७७ संवत्सरी पौष शुध्द चतुर्दस राजश्री सिवाजीराजे याणी देशमुखाचा जमाव घेऊन जाऊन जाऊली घेतली. चंदरराऊ पळोन राइरीस गेले. तेथे राजश्री स्वामीनी किलीयास वेढा घातला. वैशाखमासी सके १५७८(एप्रिल-मे १६५६) शिवाजी राजे भोसले याणी रायरी घेतली. समागमे कान्होजी जेधे देशमुख ता भोर व बांदल व सिंलींबकर देशमुख व मावळचा जमाव होता. हैबतराऊ व बालाजी नाईक  सिंलींबकर  याणी मध्यस्ती करुन चंदरराउ किलियाखाली उतरले" अशी नोंद  जेधे शकावलीत आहे. पण चंद्ररावाला विनाशकाले विपरीत बुध्दि सुचली. महाराजांच्या छावणीत आश्रित राहुन त्याने विजापुरशी संधान बांधले. त्याच्या "गुफ्तगु" करणार्‍या थैल्या महाराजांच्या जासूदाने मधल्यामध्ये पकडल्या. चंद्रराव छावणीतुन निसटला. पण कुठे जाणार होता? पकडला गेलाच. अखेर शिक्षा म्हणून त्याची गर्दन मारली, त्याची बाजी वा कृष्णाजी हि मुले देखिल मारली. जावळि निष्कंटक झाली.

शिवरायांनी गड घेतला तेव्हा त्यास गडाचे स्वरूप जवळपास नव्हते असेच म्हणावे लागेल. दक्षिणेत मुस्लिम सत्ता येण्याआधी हा किल्ला कोणा मराठे पाळेगाराच्या ताब्यात होता व चौदाव्या शतकात त्याने विजयनगरचे मांडलिकत्व स्वीकारले होते. पुढे निजामशाहीत गड शिर्क्यांच्या ताब्यात होता, गडावर आजही "शिर्काई" देवीचे मंदिर आहे ते बहुदा याच कळातले असावे. या काळात रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मग किल्ला विजापूरकरांकडे आला व पुढे शिवाजी महाराजांकडे. रायगडची निरनिराळ्या कालखंडातील कागदपत्रात, आज्ञापत्रात, बोली भाषेतील वेगवेगळी १५  विश्वासजन्य नावे उपलब्ध आहेत – १)रायरी २)तणस ३)राशिवटा ४)नंदादिप ५)इस्लामगड ६)रायगिरी ७)राहिर ८)मामले रायरी ९)उत्तमगड १०)सरखा ११)रेडि १२)राजगिरी १३)राजदुर्ग १४)शिवलंका १५)पूर्वेकडिल जिब्राल्टर


शिवरायांनी राजगड सोडुन रायगड निवडला त्याबाबत शिवदिग्विजय प्रकाश टाकते. शिवराय आग्र्याहुन सुटुन आले, काही महिन्यांनी मथुरेत गुप्तपणे राहणारे शंभूराजे देखिल सुखरुप राजगडि पोहोचले. या आनंदाच्या घटनेप्रित्यर्थ जिजाऊ साहेबांनी मेजवानी देण्याचे ठरविले काही महिन्यांनी राजकारणातून फुरसत मिळताच त्यांनी मेजवानीचा बेत केला. बारा मावळातल्या तालेवार देशमुखांना राजगडावर बोलावले शिवदिग्विजयबखर सांगते - "ते समयी कारभारी यांणी मोठा चवरंग होता, त्याजवरी कचेरीत गादी ठेवुन जागा उंच करविली. नंतर दुतर्फा मंडळी बसली त्यांत मोहीते, महाडिक, शिर्के, निंबाळकर, घाटगे, जाधव आदीकरुन जमा झाले होते. त्याणी महाराजांची जागा उंच करुन गादि घातली हे पाहून इर्षा वाटली की, आता आंम्हा मराठ्यांस सभ्य थोर, मोठेपणा शिवाजीराजे यांजकडे आला. आम्ही कदिम तालेवार, राजे, मोर्चेलाचे अधिकारी असतां ...... असें असता अमर्यादपणानी उंच स्थळी बसणार. आम्हि सेवकभाव दाखविणार. त्यास आम्हांस कचेरीत बसावयाची गरज काय? म्हणोन बोलोन उठोन चालिले ......  नंतर बाळाजी आवजीस महाराजांनी विचारले. पुढे योजना कोणते प्रकारे करावयाची, ती सांगा. त्यावरुन विनंती करते जाले कीं "महाराज या नावांस छत्रसिंहासन पाहीजे. त्याशिवाय राजे म्हणविणे अश्लाघ्य, लाजिरवाणे,खुशामती बोलणे. स्वयंभू पदवी असली म्हणजे खुशामत जसे ईश्वर शोभेप्रत पावतात, तशीच पदवी जो छत्रसिंहासनाशिश राजा असतो ..... छत्रसिंहासन असलें म्हणजे, या लोकांची बोलणी शिशुपालवत्‌ सभेचे ठायी होतील. समयावच्छेदे नाशही पावतील" ...... कशी योजना सांगा म्हणता; काशीस गागाभट्ट, महासमर्थ ब्राह्मण, तेजोराशी, तपोराशी, अपरसूर्य, साक्षात वेदोनारायण, महाविद्वान, त्याजकडे कोण पाठवून तेथे गोष्टिचा उपक्रम करुन त्यांचे आज्ञेने जे करणे ते केले असतां राजमान्य निर्बाध होते."  या घटनेनंतर महाराजांनी राजधानी हलविण्याचे कारणे -
१) शास्ताखानाच्या स्वारीच्यावेळि त्याच्या स्वारांनी अगदि गडाखालपर्यंत येऊन जाळापोळ केली होती. शिवाय मावळांतील सगळे देशमुख राजांना शरण आले नव्हते.
२) रायगड कोकणात दुर्घट जागी होता. त्यावर शत्रूला आक्रमण करायचे झाल्यास सह्याद्रिची हजार-बाराशे मीटरची भिंत ओलांडणे क्रमप्राप्त होते.  शिवाय रायगडच्या आसपासचे शिर्के, मोरे, दळवी हे महाराजांना संपूर्ण शरण आले होते.
३) आरमार स्थापन झाल्याने समुद्रावरच्या हालचालीवर अणि व्यापारावर नियंत्रण ठेवायला समुद्राला तुलनेनी जवळ असलेली राजधानी गरजेची होती. कोकण- घाट दोहोंवर जास्त भक्कम पकड बसवता येणे शक्य होते.

महाराजांनी बेलाग बुलंद असलेल्या रायगडची निवड केली ती पारखूनच सभासद बखर म्हणते - "राजा खासा जाऊन पहाता गड बहुत चखोट, चौतर्फी गडाचे कडे तासिल्या प्रमाणे दिड गाव उंच. पर्जन्यकाळि कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासिव एकच आहे. दौलताबादही पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु उंचीने तो थोडका. दौलताबादचे दशगुणी उंच देखोन संतुष्ट जाले आणि बोलिले - तख्तास जागा हाच गड करावा."  सभासद रायगडाबाबत अजुन लिहितो - "रायगड पहाडी किल्ला चांगला. आजुबासुन शत्रूची फौज बसावयास जागा नाही. घोडे माणूस जाण्यास महत्‌संकट. वरकड किल्ले पन्हाळे बहुत. पण खुलासेवार व मैदान मुलुखात. यास्तव आजच्या प्रसंगास हीच जागा बरी. येथे लवकर उपद्रव होऊ न शकेल."    इथुन पुढे निर्वाणापर्यंत महाराजांचे वसतीस्थान रायगडच होते.


पाचाड हे पायथ्याचे मुख्य गाव. त्यावेळि पाचाडला खूप महत्व होते. रायगड परीसरातील घोडदळ पाचाडात उभे असे. दुसरे महत्व असे कि  पुढे वृध्दापकाळी जिजाऊसाहेबांना गडावरचा पावसाळि - हिवाळि गार वारा सोसवेना म्हणून त्यांना पाचाडात एक वाडा बांधून दिला होता आजही त्याचे अवशेष आहेत, तक्याची विहीर आहे. शिवाय पाचाडात जिजाऊसाहेबांची समाधी आहे. तिथुन बघितलं कि रायगडचे रुद्र टकमक टोक दिसते. त्याकाळि तो मातृभक्त राजा कदाचित टकमकवरुनच त्या वाड्याच्या दिशेने नमस्कार करीत असावा. राज्याभिषेकानंतर नऊच दिवसांनी जिजाऊसाहेब निवर्तल्या त्या देखिल पाचाडातच, तेव्हा या मातीवर  शिवछत्रपतींचे पृथ्वीमोलाचे अश्रू सांडले असतील. या परीसराला हळव्या नात्यांचा परीसस्पर्ष आहे तो असा. या खेरीज कोंझर, रायगडवाडि, छत्री निजामपूर, कावल्या - बावल्याची खिंड अश्यां आटोपशीर गावांनी, खुणांनी रायगडला वेढले आहे.

रायगड चढताना पहिल्यांदा लागतो तो खुबलढा बुरुज. तेथे चित दरवाजाही होता पण आता तो नाही. अरे हो ..... खुबलढा बुरुजासमोर सध्या ST बस थांबा आहे त्याच्या पाठीमागे एक वाट जाते. ती एका गुहेपर्यंत जाते. त्या गुहेला २ मोठी खिंडारे आहेत व खाली खोल दरीतला दूरवरचा प्रदेश सहज नजरेत येतो. त्याला "वाघबिळ" किंवा "चित्त्याचे डोळे" म्हणतात. शत्रुवर नजर ठेवायला उत्तम जागा आहे. तसेच खुबलढा व समोर दिसणार्‍या टकमकच्या बेचक्यात "नाना दरवाजा" आहे. "नाना" याचा बोली भाषेतील अर्थ "लहान" किंवा "दुय्यम" म्हणता येईल पण दुय्यम असून नेहमीच्या राबत्यासाठी हाच वापरला जात असावा. इ. स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील "हेन्‍री ऑक्झेंडन" याच दरवाजाने वर आला होता. पुढे वाटेत मदारी मेहतर मोर्चा लागतो. आणि मग येतो महादरवाजा. जय आणि विजय या दोन भरभक्कम बुरुजांच्या गोमुखी रचनेत तो लपला आहे. दोन्हि बुरुज बुलंद असून जवळपास एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट आहे. व बुरुजांकडून एक तटाबंदि टकमककडे तर दुसरी हिरकणी बुरुजाकडे गेली आहे. हेच काम बघून इंग्रज वकिलाला "पुरेसा धन्यसाठा असल्यास अत्यल्प शिबंदिसह हा गड संपूर्ण जगाविरुध्द लढू शकतो" असे वाटले असल्यास नवल नाही. महादरवाज्याचे काम हा युध्द वास्तूशास्त्रातील अति उत्तम नमुना म्हणायला हवा. हा महादरवाजासुध्दा असा बांधला आहे कि त्यावरही वरुन सहज लक्ष ठेवता येईल. नीट बघितले तर लक्षात येते कि महादरवाज्यचे स्थान गंगासागर व हत्ती तलाव यांच्या बेचक्यातील आहे - गडावरचा पाण्याचा साठा महत्वाचा असला तरी जर गरज पडलीच तर हे दोन तलाव फोडल्यास कितीही मोठ्या संखेने शत्रु आला तर यांच्या जलप्रपातात सहज वाहुन जावा. सध्या गळती लागल्याने हत्ती तलाव कोरडा असतो. गंगासागर मात्र वर्षभर पुरुन उरेल इतके पाणी साठवतो. 


गडावर अनेक अवशेष आहेत. काही सुस्थितीत आहेत काही मोडकळिच आले आहेत. मात्र २ अनमोल गोष्टि म्हणजे "राजदरबार" व "श्री शिवछत्रपतींची समाधी". सातशे वर्षांच्या भिषण रात्रीनंतर स्वातंत्र्यचा सूर्योदय इथेच झाला. चार पातशाह्यांच्या छाताडावर पाय देऊन एक "हिंदु राजा पातशहा जाहला हि गोष्ट सामान्य नव्हे." गडावरील या राजसभेत ता. ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक संपन्न झाला.राजदरबारापासून हुजुरबाजार (बाजारपेठ) मार्गे जगदिश्वरमंदिरापर्यंत ताशे - कर्णे यांनी गजबजलेली व मोर्चेल, सोन्याची अंबारी, दोहो बाजुंनी ढळणार्‍या चवर्‍या यांनी सुशोभित "शिवछत्रपतींची" मिरवणूक निघालेली रायगडाने बघितली व शके १६८० च्या हनुमान जयंतीला याच वाटेने त्या महापुरुषाची अंतयात्रा निघालेली सुध्दा बघितली. स्वराज्याचे राष्ट्राचे परमोच्च सुख व पराकोटिचे दु:ख दोन्ही या शिखराने अनुभवले आहे. जगदिश्वराच्या मंदिरसमोर आजही तो पुरुषोत्तम चीरनिद्रा घेत पहुडला आहे. रायगडावर सर्वात जास्त वेळ कुठे द्यावा तर तो समाधीजवळ. इथे भल्याभल्यांचा अहंकार आपसूक गळून पडतो. एखाद्या पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात समाधीसमोर शांतपणे बसणं हा शहाणं करणारा अनुभव असतो. शक्य झाल्यास तो जरुर घ्या.

तसेच राजगडावरील हुजूरबाजार (बाजारपेठ) हा महाराजांच्या दूरदृष्टिचा उत्तम नमुना म्हणावा लागेल. ती रोजची बाजारपेठ नव्हे. तर देशभरातील मु्ख्य व्यापार्‍यांचे मुतालिक तेथे वसवावेत आणि त्यांच्याकडून त्या वस्तूंचे वेगवेगळे नमुने उपलब्ध केले जात असावेत. व मोठ्या व्यवहाराची बोलणी तिथे होऊन सावकार सौदा पक्का करत असावा. व थैली सीलबंद करुन सरकारात कर भरणे, वाटेत माल अडवला जाऊ नये म्हणुन व्यापार्‍यांना परवानगीची पत्रे देणे अशी कामे येथे होत असावीत. यावर आज्ञापत्रातील साहुकार प्रकरण प्रकाश टाकते - "साहुकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा. ....साहुकाराचे संरक्षणात बहुत फायदा आहे..... पेठांपेठांत दुकाने वखारा घालोन हत्ती, घोडे, नरमिना, जरबाब, पशमी आदि करुन वस्त्रजात व रत्ने व शस्त्रे आदिकरुन अशेष वस्तुजात यांचा उदिम चालवावा. हुजूरबाजारामध्येही थोरथोर  सावकार आणोन ठेवावेत..... त्यांसी अनुकुल न पडे तरी असतील तेथचे त्यांचे समाधान रक्षून आपली माया त्यांस लावून त्यांचे मुतालिक आणून त्यांस अनुकुल ते जागा, दुकाने देऊन ठेवावे." पण महाराज किती दक्ष, सावध व लोकांची अचूक पारख असलेले हो्ते हे आज्ञापत्रातील पुढच्या ओळींतून समजते टोपिकर म्हणजे युरोपिय व अरब व्यापार्‍यांबाबत आज्ञापत्र म्हणते - "सावकारांमध्ये फिरंगी इंगरेज वलंदेज फरासीस डिंगमारादि टोपीकर हेही लोक सावकारी करितात. परंतु ते वरकड सावकरांसारिखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्यक प्रत्यक राज्यच करतात ..... राज्य करणारास स्थळलोभ नाही यैसे काय घडो पाहते? ..... त्यांची आमदफ्तरी आलेगेले ऐसेच असो द्यावी, त्यांसी केवळ नेहमी जागा देऊ नये. जंजिरेसमिप या लोकांचे येणे जाणे सहसा होऊ देऊं नये.. ... कदाचित वखारेस जागा देणे जाहलेच तर खाडिचे सेजारी समुद्रतीरी न द्यावा.... आरमार पाठीसी देऊन त्यांचे बळे बंदरी नुतन किल्ला करणारच, तेव्हा तितके स्थळ राज्यातून गेलेच." थोडक्यात दख्खनचा व समुद्रावरचा व्यापार महाराजांना आपल्या पंखाखाली घ्यायचा होता. नुसतीच तलवारच नव्हे तर तराजू देखिल तितकाच महत्वाचा असतो हे महाराज उमजून होते. म्हणुनच २२ - २२ गाळे असलेला ४४ दुकानांचा संसार वरती रायगडावर मांडला होता.


रायगडावरच्या वास्तूंविषयी एकुणच खूप लिहिता येईल पण लेखाचे विस्तारभय आहेच मात्र त्या प्रत्यक्षात जाऊन बघणे उत्तम. रायगडचा शिवकालोत्तर इतिहास जाणून घ्यायचा तर - शके १६०२ रौद्र संवत्सर माघ शु. ७, इ. स. १६८१ १६ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचे विधिपूर्वक राज्यारोहण झाले. या छाव्याने शत्रुंवर केलेली पंजेफाड हि विस्मयकारक आहे. मात्र छत्रपती शंभूराजांना स्वस्थता अशी लाभलीच नाही. त्यांचा एका ठिकाणी फारवेळ गेलाच नाही राज्यारोहण वगळता त्यांची रायगडाशी संबधित "ठळक" घटना क्वचितच असावी. मात्र पुढे औरंगजेबाने छत्रपती शंभुराजांना पकडल्यावर व त्यांची हालहाल करुन हत्या केल्यावर, स्वराज्याची जबाबदारी छत्रपती राजाराम महाराजांवर आली. इ. स. १६८४ च्या सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडच्या मोहिमेस सुरुवात केली. शहाबुद्दीन खान यास चाळीस हजार सैन्यासह बादशाहने रायगडाच्या पायथ्याशी धाडले. मात्र त्याने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालू केली. पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो १६८५ च्या मार्चमध्ये परतला. म्हणूनच मग औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा इतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. 


५ एप्रिल १६८९ रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ आठ महिने हा वेढा चालू होता. या वेढ्याला यश मिळावे म्हणून औरंगजेबाने कवी कलशचा मुलगा व एक मराठी सरदार यांच्याकडून रायगडाचे मेणाचे "मॉडेल" बनवुन घेतले होते म्हणे.  अखेर दि. ३ नोव्हेंबर १६८९ रोजी सुर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितुर केले. झुल्फिकारखान हा बादशाहने इतिकादखानला दिलेला किताब आहे. पुढे रायगडचे नामांतर ‘इस्लामगड’ असे झाले.औरंगजेबाने हा किल्ला घेतला खरा पण तो सांभाळणे त्याला जड होऊन बसले. कारण गायकवाड, गोळे यांसारखे स्वराज्याचे पाईक, कांगोरी किल्यावरुन त्याला सतावत होतेच. गड मिळुनही जीवाला स्वस्थता लाभेना. दिल्लीतले नियम मराठ्यांच्या गल्लीत लागू होत नव्हते ... होणारही नव्हते. अखेर वैतागुन त्याने किल्ला जंजिर्‍याचा सिद्दिअ खैरीयतखान याला दिला. मराठ्यांना दुर्दैवाने जंजिरा कधीच जिंकता आला नाही, पेला ओठाशी आला म्हणतानाच दरवेळि तो उडवला जात असे. मात्र सिद्यांनी गडावर जवळपास ४० वर्षे फतकल मांडली होती. अखेर ५ जून १७३३ या दिवशी शाहूमहाराजांच्या कारकिर्दीत रायगड पुन्हा मराठांनी घेतला. 

पुढे पेशवे कालात नाना फडणवीस किल्यावर अनेकदा येऊन गेल्याचा उल्लेख आहे. मात्र कोल्हापुर - सातरा अश्या दोन गाद्या तयार झाल्या, आणि पेशव्यांमुळे सगळ्य भारताचे राजकारण पुण्यात ठरवले जाऊ लागले. साम्राज्य विस्तारल्याने आक्रमणाचे भय संपले व रायगड सारखा बुलंद डोंगरी किल्ला परत मोठ्या युध्दात कधी वापरावा लागला नाही. मात्र त्याला शेवटचे युध्द खेळावे लागले इंग्रजांशी. पण १८१८ मध्ये हा किल्लासुध्दा इंग्रजांच्या ताब्यत गेला. इंग्रजांनी धार्मिक भावनांना थेट कधी ठेच पोहोचवली नाही मात्र "राष्ट्रिय अस्मिता" जागविणारी अनेक ठिकाणे त्यांनी तोफांचा मारा करुन पाडली त्यात रायगडही होता. कारण "शिवाजी" या नावाची आठवण सुध्दा इथल्या लोकांना नविन उभारी देऊ शकते हे त्यांना माहीत होतं.


आज आपण स्वतंत्र आहोत, पण ते स्वातंत्र मिळवण्याची उर्मी छत्रसाल बुंदेल्यापासून थोरल्या बाजीरावांपर्यंत आणि नरवीर उमाजी नाईकांपासून ते सुभाषबाबुंपर्यंत अनेकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शिवछत्रपतींनीच दिली. ते स्वातंत्र्य आता आपल्याला टिकवायचे असेल, आणि रयतेच्या काडिलाही धक्का न लावणार्‍या "जाणत्या राजाला" थोडसं ओळखायचा प्रयत्न करायचा असेल तर प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा रायगडला नक्कि जावे.
 
 "शिवरायांचे आठवावे रुप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । शिवरायांचा आठवावा प्रताप । भूमंडळी ॥"

 - सौरभ वैशंपायन. 

================================
संदर्भ - 
१) महाराष्ट्राची धारातिर्थे - पं महादेवशास्त्री जोशी
२) राजगड बखर - श्री अप्पा परब
३) हुजूरबाजार - श्री अप्पा परब
४) राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे
५) शककर्ते शिवराय - श्री विजयराव देशमुख

Tuesday, April 12, 2011

चैत्रातला पाऊस

परवा संध्याकाळपासून जवळपास रोज पावसात भिजणे सुरु आहे. कितीही भिजलं तरी मन भरत नाहीये. पावसाची पहीली सर अस्ताव्यस्त येऊन गेली, घाई घाईने अंगावर झेलावी लागली. मग मात्र एक एक सर सावकाश, गार गार, पण तरी आत कुठेतरी बोचणी लावणारी. मग झर्‍यांतून - नद्यात - समुद्रात जाऊन परत बाप्ष व्हावं आणि परत त्याचा पाऊस होऊन तीच आधीची सर पुन: नव्याने अंगावर घेण्यातली मजा गेले ३ दिवस घेतोय .... नाही डोक्यावर पडलो नाहीये ..... शान्ता शेळकेंनी केलेला "मेघदूताचा" अनुवाद वाचतोय.

"मन्दाक्रांता" वृत्तातला मेघदूत मागे कधीतरी वाचलाही होता. पण १२ - १५ श्लोक वाचून झाल्यावर चाल कितीही छान वाटत असली तरी फारसं न कळणं या कारणाने पुस्तक बाजूला झालं. दर आषाढाच्या सुरुवातीला पेपरमध्ये "आषाढस्य प्रथमदिवसे" हे वाचलं कि त्या मेघदूताविषयी, त्याला दूत बनवू इच्छिणार्‍या त्या मिलनोत्सुक शापित यक्षाविषयी आणि यक्षाच्या तोंडुन कदाचित आपल्या पूर्वायुष्यातल्या विरह झालेल्या सखीलाच तो निरोप पोहचवू इच्छिणार्‍या कवीश्रेष्ठ कालिदासाबद्दल उगीच हुरहुर लागुन रहायची. पण म्हणून कधी घेतलय मेघदूत आणि बसलोय वाचायला असं कधी झालं नव्हतं.

परवा मॅजेस्टिक मध्ये गेलो होतो, तासभर तिथल्या पुस्तकांमध्ये घुटमळत होतो. अनेक विषयांवरची अनेक पुस्तके डोळ्याखालुन घातली. आणि नकळत काव्य विभागाकडे वळलो. पहिल्याच नजरेत "मेघदूत" नजरेत आलं. एक क्षण माधव ज्युलियन यांच असावं असं वाटलं पण खाली "अनुवाद : शान्ता शेळके" हे वाचलं आणि अधाश्यागत ते उचललं. किती वेळ तिथे उभा होतो माहित नाही पण २० - २२ श्लोक तर तिथेच वाचले. पाने उलटत होतो .... काय अफाट लिहायची बाई .... "तोच चंद्रमा नभात" उगीच नाही हो सुचलं एका श्लोकावरुन.

"तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी  
नीत्वा मासान् कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः ।
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं 
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ॥२॥"

 - >
"गिरीवरी त्या महीने कांही कंठित राही तो विरही जन
सखिविरहे कृश असा जाहला गळे करांतुनि सुवर्णकंकण
आषाढाच्या पहिला दिवशीं बघ तो शिखरी मेघ वांकला
टक्कर देण्या तटभिंतीवर क्रिडातुर गज जणूं ठाकला!"

हा विरह दाखवणारा श्लोक असो किंवा मेघाला रस्ता सांगताना अगदि ठळक खाणाखुणा सांगणारा -

"गच्छन्तीनां रमणवसतिं योषितां तत्र नक्तं  
रुद्धालोके नरपतिपथे सूचिभेद्यैस्तमोभिः ।
सौदामिन्या कनकनिकषस्निग्धया दर्शयोर्वीं 
तोयोत्सर्गस्तनितमुखरो मा स्म भूर्विक्लवास्ताः ॥४१"
- >

"प्रिय भेटीस्तव अभिसारोत्सुक रमणी जेव्हा निघतेल रात्री
राजपथावर अडेल पाऊल निबिड तिमिर तो भरतां नेत्री
उजळ तयांची वाट विजेने कांचनरेषा जशी निकषावर
वर्षुन गर्जुन भिववु नको पण विलासिनी त्या जात्या कातर"

यातला कौतुकमिश्रित हळवेपणा असेल, शान्ता बाईंची लेखणी अव्याहत ओघवती राहिली आहे. ३ दिवसात ५ वेळा पुस्तक वाचून झालय अजुन कितीवेळा वाचिन? माहीत नाही, पण दरवेळि नवं काहितरी मिळतय. अनेकदा तर समजतय पण चिमटीत नेमकं पकडता येत नाही असं काहीसं वाटायला लागतं. याआधी "मधुशाला"  वाचताना असं झालं होतं.

झपाटलेपण काय असतं ते अनुभवायचं असेल तर नक्की हे मेघदूत वाचा. या वर्षीच्या आषाढा आधी ह्यातले शक्य तितके अनुवादित श्लोक पाठ करिन म्हणतोय ... पण नाहिच झाले तरी बाहेर आषाढचा पाऊस कोसळत असताना मेघदूताची पारायणे करणार हे नक्कि. तोवर अचानक चैत्रातच बरसलेल्या या पावसात भिजत राहीन म्हणतोय.

 - सौरभ वैशंपायन.

Sunday, April 3, 2011

स्वप्नी जे देखिले रात्री ...



आपण साखळि सामन्यांतली ३री मॅच जिंकलो तेव्हाच चॅट करताना मित्राला म्हणालो - "सध्या डोक्यात इतकं क्रिकेट आहे कि, काल मला स्वप्न पडले होते कि आपण वर्ल्डकप जिंकला आहे!". पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणे. गेले दिड महीना उठता - बसता क्रिकेटशिवाय काही सुचत नव्हतं. आणि बहुतकरुन सर्वच भारतीय क्रिकेटप्रेमींची हीच अवस्था होती. "सचिनसकट वर्ल्डकप" हेच ते स्वप्न होते. काल तो वर्ल्डकप सचिनने उचलेला बघितला आणि धन्य वाटलं.

श्राध्दाच्या वेळि मंत्रपुष्पांजली म्हंटलेली कोणी ऐकली आहे का? सहाजिकच नाही, पण ३० मार्च २०११ रोजी शिवाजी पार्कमध्ये हे प्रत्यक्षात घडलं. मोहालीत पाकिस्तानचं श्राध्द घातल्यावर देशभरात जो जोश होता त्याला पारावार उरला नव्हता. मात्र तोंड देखलं "पाकला बुकललं तिथेच फायनल जिंकलो, आता वर्ल्डकपचं होईल ते होईल!" हे अर्धसत्य सगळ्यांनी कितीही बोंबलून सांगितलं तरी प्रत्येकाला विश्वचषक हवा होताच. त्यासाठी दहाव्या वर्ल्डकप मध्ये लंकेचा "दशानन" लोळवणं भाग होतं. पाक विरुध्दच्या सेमी फायनल आधी आणि नंतर एकूण २ वेळा कामानिमित्त चर्चगेटला जावं लागलं. ट्रेन थांबली किंवा हळू झाली कि उजव्या हाताच्या वानखेडे स्टेडियमकडे गाडितले हजारो डोळे मोठ्या आशेने बघायचे. ट्रेनच्या खिडकि - दरवाज्यातून मान बाहेर काढून बघणार्‍या लोकांच्या डोळ्यातलं ते स्वप्नं सरळ सरळ वाचता येत होतं. २५ तारखेला घरी आल्यावर फेसबुक वरती आपोआप स्टेटस अपडेट झालं - "वानखेडे स्टेडियमने सचिनची २ तारखेची अपॉइंटमेंट मागितली आहे!"

अखेर काल ती त्याला मिळालीच. गेल्या ३ मॅच मध्ये आपली बॉलिंग आणि फिल्डिंग अफाट झाली. झहीर खानने टिच्चून बॉलिंग केली. काल तर झहीरने चक्क ३ मेडन ओव्हर टाकून लंकेच्या ओपनर्सना गुदमरवून टाकलं. वरुन २ विकेट्स घेतल्या. शिरस्त्याप्रमाणे पहीला बळी त्यानेच घेतला. आपण झहीरच्या बॉलिंगवरती हा टेंभा मिरवतोय पण आता इथे धोक्याची घंटा वाजलेली ऐकू येतेय, सध्या झहीर सोडला तर दुसरा "स्ट्राइक बॉलर"  दिसतच नाहीये. भज्जीला काय झालय ते समजत नाहीये. तो वाईट बॉलिंग करत नाहीये, पण भज्जीची जादू दिसत नाहिये हे पण खरं. दुसरीकडे नेहराला झाकावा आणि श्रीशांतला काढावा इतका स्वैर मारा त्याने केला. नेहरा अनफिट असल्याचा अनेकांना आनंदच झाला. पण त्याजागी अश्विनला खेळवले गेले नाही. श्रीशांतसारखा अत्यंत बेभरवश्याचा माणूस(?) अंतिम सामन्यात का घेतला हे कोडे आहे. मग ह्याला हाक मार, त्याला शूक - शूक कर, असं करुन पार्ट टाइम बॉलर्स चक्क अंतिम सामन्यात खेळवावे लागले. हे लक्षण अजिबात चांगले नाही आणि विश्वविजेत्यांसाठी नाहीच नाही. अनेकांना वाटेल कि काय हे? विजय साजरा करायचा सोडून ही काय खुसपटं काढतोय? पण युध्द जिंकले असले तरी जखमी सैनिक मोजावेच लागतात हा नियम आहे. ऑसीजने १२ वर्ष बेदरकार राज्य केलं कारण जिंकताना देखिल काय चूका झाल्या? त्या परत होऊ नये म्हणून काय करावे? त्यावर त्यांनी भर दिला. आता आपण "चॅम्पियन" आहोत "so let's live like Champion".

काल सर्वोत्तम गोष्ट कुठली असेल तर आपले क्षेत्ररक्षण. युवी - रैना - विराट ने शब्दश: अदृष्य भिंत उभी केली होती. पॉइंट वरती युवराजने त्याच्या नैसर्गिक कमजोर बाजूला म्हणजे उजवीकडे डाइव्ह मारुन जो बॉल अडवला व ४ रन्सच्या जागी त्यांना भोपळा सप्रेम भेट दिला ते बघताना मला जॉन्टि र्‍होड्सची आठवण आली. चित्याच्या वेगाने त्यांच्याकडून हे सगळं घडत होतं. या पठ्ठ्यांनी सहज २५-३० रन्स वाचवल्या अन्यथा पुढे ते महाग पडलं असतं. झहिरने देखिल २ वेळा अतिशय सुरेख बाउंड्रि अडवून ४-५ रन्स वाचवले. हे सगळं गॅरि गुरुजींमुळे झालय हे मान्य केलच पाहिजे. BTW गॅरी क्रस्टन हा अर्थाअर्थि पहीला साऊथ आफ्रिकन ठरला जो वर्ल्डकप फायनल मध्ये पोहोचला आणि चक्क जिंकला सुध्दा.


मग मैदानात उतरले सचिन -सेहवाग. सचिन वानखेडेवर असण्याची तुलना, विठोबा पंढरपुरात असण्याशीच होऊ शकते. सचिनला त्याच्या घरच्या मैदानावर आतिषबाजी करताना बघायला सगळे उत्सुक होते. पण पक्वान्नाचा घास घ्यावा आणि दाताखाली खडा यावा तसं दुसर्‍या बॉलवरती झालं. मलिंगाने सेहवागला LBW पकडलं. स्टेडियमवरच्या त्या गंभीर वातावरणात गौतम गंभीर वन डाऊन आला. नॉन स्ट्रायकर एन्डवरती आपला सचिन गौतम बुध्दाच्या शांततेने उभा होता. गंभीरने आल्या आल्याच फोर मारुन मलिंगाला आदाब अर्ज केला आणि आपले इरादे जाहिर केले. मग दुसर्‍या बाजूने, ST च्या लाल डब्याने आधी घुमल्यासारखं करुन घाटातली मलिंगाच्या केसांसारखी वळणं सहज पार करावीत, तशी सचिनची बॅटिंग सुरु झाली. त्याने कुलसेकराला पिदवायला सुरुवात केली. पट्टिने आखल्यासारखा स्ट्रेट ड्राइव्ह त्याने तडकावला तेव्हा अर्धा मिनिट सचिनने अदिदासची जाहिरात केल्यागत बॅट उभी धरली होती - "वंडरफुल!" मग त्याच ओव्हरमध्ये थर्डमॅनच्या थोडं उजवीकडे मारलेल्या फोर वरती "सचिन तेंडुलकर" अशी ठसठशीत सहि करुन मगच त्याने बॉल टोलवला होता. तो फोर बघून "चला! म्हणजे सचिन आळस देऊन उठलाय एकदाचा!" हे समजलं. पण सचिन अधिक रंगात येण्याआधीच मलिंगाच्या ऑफ वरुन बाहेर जाणार्‍या बॉलच्या रस्त्यात सचिनने बॅट घातली आणि मागे संगाकाराने कुठलिही चूक केली नाही. सचिनसारखी विकेट मिळाल्यावर आनंदाने मलिंगाच्या कुरळ्या केसांनी सुध्दा जागच्याजागी एक जास्त गिरकि घेतली असेल. सचिन १८ वर परतत असताना अख्खे स्टेडियम गप्प झाले, पण पहिल्यांना सचिनने फार धावा न करता देखिल स्टेडियममधली लोकं टाळ्या वाजवत उभी राहिलेली मी पाहिली. २२ वर्षात सचिनने किती शतके केली? किती धावा जमवल्या? हा भाग अलाहिदा ..... सचिनने "आदर" कमवलाय तो असा.

कोहलीने देखिल बर्‍या धावा केल्या कोहली गंभीर मध्ये ८३ रन्सची भागीदारी झाल्याने डावाला आकार आला. ५वा आलेल्या धोनीने केलेली सुरुवात बघून आजहि धोनी हिंदि फिल्म मधल्या पंजाबी लग्नातील "मुह - दिखाई कि रस्म" करण्यापुरता आलाय कि काय याच चिंतेत सगळे होते. कारण संगाकाराने चूक केली म्हणून धोनीला स्टंप् करु शकला नाही. अखेर गंभीर धोनीची १०९ धावांची भागीदारीने भारताने निश्चित विजयाकडे वाटाचाल केली. गंभीरचे शतक ३ धावांनी हुकले याचं वाईट वाटतंय. पण त्याची खेळि सुरेख व योग्यवेळी झाली. गंभीर आउट झाल्यावर युवराज आला. पाकिस्तान वगळता बाकि सगळ्या मॅचमध्ये युवराजने चांगली कामगिरी केल्याने त्याच्याकडून अपेक्षा होत्याच. मॅच कट टू कट सुरु होती आणि कधी बॉल जास्त कधी रन्स जास्त असं होत होतं. पण खरंतर काळजीचं काहीहि कारण नव्हतं. कारण ६ विकेट्स हातात होत्याच पण ते ५२-५३ रन्स करताना अजून बॅटिंग पॉवर प्ले उरला होता तो अखेर भारताच्या कामी आलाच. धोनीने बॉलच्या कानाखाली सणसणीत आवाज काढून लंकेला नॉक - आऊट केले.



मग सगळं स्वप्नवत होतं. युवराज - सचिनचे आनंदाश्रू. खेळाडुंनी एकमेकांना मारलेल्या जोशपूर्ण मिठ्या, स्टेडियमच्या छतावरील रिंग मधून झालेली फटाक्यांची आतिषबाजी आणि मग सचिनला सगळ्यांनी खांद्यावर उचलून वानखेडेला मारलेली एक फेरी. मग सगळ्यांनी उचलून धरलेला तो विश्वचषक, शॅम्पेनचा पाऊस, बॅकग्राउंडला वानखेडेच्या फ्लड लाईट्सचा लखलखाट, उडणारे शेकडो फ्लॅश, आणि भारतातल्या प्रत्येक रस्त्यावर - प्रत्येक नाक्यावर वाजणारे ढोल, धर्म, जात, वय, लिंग विसरून बेभान नाचणारे "भारतीय" आणि त्यांच्या हातात फडकणारे तिरंगे. सगळं रोमांचक, अविस्मरणिय.



पण महेला जयवर्धनेनी प्रेशरखाली केलेले १०३ रन्स आणि मुथैय्या मुरली धरनची शेवटची वन डे मॅच म्हणूनही हि फायनल सगळ्यांच्या कायम लक्षात राहील. we miss you murali! अलविदा!

यजमान देशाने वर्ल्डकप जिंकला. हे देखिल पहिल्यांदा झाले. आजवर ज्या देशाने यजमानपद भूषवले तो देश कधीच वर्ल्डकप जिंकू शकला नव्हता. आता पुढचा २०१५ चा विश्वचषक ऑस्ट्रेलिया - न्यूझिलॅन्ड मध्ये आहे - तब "उनके घर में घूस के मारेंगे!" आणि तेव्हा "११ कांगारु" आणि "११ किवींची" शिकार केली तरी PETA वाले काही बोलणार नाहीत हे नक्कि.

 - सौरभ वैशंपायन.