Thursday, February 18, 2010

उट्टं !



१८ फेब्रुवारी २०१०, दक्षिण आफ्रिकेच्या बलाढ्य संघाला एक डाव आणि ५८ धावांनी नमवुन भारत कसोटि क्रिकेटमध्ये क्रमांक एकवर कायम राहिला. खरतर मागच्याच नागपुर कसोटित एका डावाचा पराभव पदरात पडल्यावर भारतीय संघाच्या मनोधैर्यावर परिणाम हॊणे स्वाभाविक होते. पण त्या सामन्यात "व्हेरी व्हेरी स्पेशल" लक्ष्मण आणि "द वॉल" राहुल द्रविड हे दोघेहि नव्हते. त्यामुळे पत्याच्या बंगल्यागत सगळे ढासळले होते. पण यावेळि लक्ष्मण संघात आला आणि नुरच बदलला. इडन गार्डन आणि लक्ष्मण हा फॉर्म्युलाच विनिंग फॉर्म्युला आहे. अर्थात त्याने निराशा केली नाहि. [:-)]

एकुण सामन्यात ७ शतके झळकली. इडन गार्डन फलंदाजांसाठी नंदनवनच ठरले. सेहवाग, सचिन, धोनी आणि लक्ष्मणने नेत्रदिपक खेळ केला. तर दक्षिण आफ्रिकेकडुन पीटरसनने एक तर हाशिम अमलाने दोन्हि डावांत शतके झळकावली. काहिहि म्हणा अमलाच्या हमल्यापुढे भारतीय गोलंदाज हतबल झाले होते विशेषत: जहिर जखमी झाल्यावर सगळा भर फिरकि गोलंदाजांवर पड्ला, हरभजनने ५ विकेट्स घेत तो सार्थहि ठरवला पण दक्षिण आफ्रिकेच्या शेपटाला हाताशी धरुन नाबद राहिलेल्या अमलाने भारताचा विजय बराच लांबवला. भारतीय संघात ऑस्ट्रेलिया प्रमाणे "killing instinct" नाहिये हे परत सिध्द झाले. सामना जिंकला हा भाग वेगळा, पण २०११ च्या विश्वचषकाचा विचार करुन भारतीय संघात आक्रामकता वाढिस लागणे गरजेचे आहे.

या सामन्यातील जमेची बाजु म्हणजे धोनीची सरस कॅप्टनशीप, जहिर - हरभजनची भेदक गोलंदाजी. भारताची चार शतके आणि द्रविडची न जाणवलेली कमतरता जी नागपुरला प्रकर्षाने जाणवली होती. सचिनबाबत म्या पामर काय बोलणार? सचिन महान आहे. सलग चार सामन्यात चार शतके?? आता सचिन द्वेष्ट्यांना एक गोष्ट सांगु इच्छितो - "सचिनच्या नावाने बोटे मोडणे थांबवा कारण सचिन सगळ्याच्या पलीकडे गेलाय! उगीच तुमचे ब्लडप्रेशर वाढवुन घेऊ नका. सचिन इतकं क्रिकेट खेळलाय इतकं क्रिकेट खेळलाय कि उद्या एखाद्या सामन्यात लंच नंतर नॉन स्ट्रायकर एंड ला उभं राहुन दात कोरत कोरत एखाद - दुसरी ढेकर दिली तर तीहि त्याच्या रेकॉर्डवर येईल!"

असो, इतका किबोर्ड बडवण्याचा उद्देश एकच - "मागच्या सामन्याचं उट्ट भारताने अखेर काढलच!"


- सौरभ वैशंपायन.

No comments: