Saturday, November 29, 2008

पण लक्षात कोण घेतो……?

२६ नोव्हेंबर २००८, रात्रीचे ९ वाजुन ४० मिनिटे ....मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस पासुन मृत्युचे चालु झालेले तांडव आत्ताशी कुठे शमतोय. अजुन ताज धुमसतेच आहे. दहशतवाद हा ऑक्टोबर १९४७ पासुनच भारताच्या पाचवीला पुजलाय. १९४७ च्या काश्मीर हल्ल्यापासुन परवाच्या घटनेपर्यंतचा प्रवास कसा झाला हा फार मोठ्ठा प्रश्न आहे. त्यावर शेकडो पुस्तके आणि हज्जारो लेख लिहुनहि झाले आहेत – होतील. पण किमान १६ अतिरेकि समुद्र मार्गाने मुंबई सारख्या भारताच्या अति महत्वाच्या आणि आर्थिक राजधानी म्हणावल्या जाणार्‍या शहरात उतरुन भारताच्या पोलिस-लष्कर-NSG यांसारख्या भक्कम यंत्रणांशी थोडि थोडकि नव्हे तर ४८ तासांपेक्षा जास्त झुंज घेतात. आपल्याकडिल अत्याधुनिक हत्यारे वापरुन १५३ व्यक्तींचा जीव घेतात. १४ पोलिस आणि ३ NSG चे जवान शहिद होतात. नागरीकांची तर गणनाच नाहि. पण हे किती दिवस २? ४? १०? नंतर सगळं विसरणार. मग परत एखादा बॉम्बस्फोट होईतो आम्हि झोपणार. हे चक्र असच सुरु राहणार. कदाचित या जगाच्या अंतापर्यंत(किंवा पाकिस्तानच्या). मुळात नागरीकांमध्येच जाणीव नाहि. वर्क स्पीरीट च्या नावाखाली मुंबईला सलाम ठोकले जातात. मग एखाद्या दिवशी सगळी मुंबई मिनिटभरासाठी स्तब्ध होऊन श्रध्दांजलीचा कार्यक्रम होतो. बाऽऽऽऽस झालं काम. दहशतवादाला धर्म नसतो वगैरे तत्वज्ञान ओकले जाते.

काल पंतप्रधान गरीऽऽऽब चेहरा घेऊन सगळ्याचा “कडक” शब्दात निषेध नोंदवत होते. क्षणभर वाटुन गेले हे आवाहन दहशतवाद्यांना दाखवले तर दया येऊन ते परतीची वाट धरतील इतका बापडा चेहरा आणि त्याहुन खालचा स्वर लावुन आमचे पंतप्रधान “प्रत्युत्तराची” भाषा करत होते. आमचे राष्ट्रपती-पंतप्रधान स्वत:च्याच ऑपरेशन केलेल्या पायांवर उभे राहतात हिच मोठी गोष्ट आहे असे सारखे वाटते. मी लिहिलेलं हे सगळं खुप आक्रस्ताळेपणाने किंवा अपमानकारक वाटेल पण हा आजच्या तरुण पिढीचा संताप आहे. जे भ्रष्टाचारी नेते मेले पाहिजेत ते ठणठणीत आणि जे जवान-किसान जगायला हवेत ते असे मरत आहेत.

मूळात ४८ तास झुंज घेऊ शकतील इतका दारुगोळा घेऊन हे यमदुत आत येतात कसे हा प्रश्न विचारल्यावर अजुनच नविन माहिती हाताशी लागते – ते सगळे किमान ३ महिने मुंबईत होते. दक्षीण मुंबईची खडा न खडा माहिती जमा करुन ते परत पाकिस्तानात गेले तिथे सगळी तयारी करुन कराची-गुजरात-मुंबई असा प्रवास करुन त्यांनी हा आकांत घडवला. खोलवर विचार केल्यास हे सगळे चक्र एकमेकांत खुप गुंतले आहे. पाकिस्तानासारखे असंतुलित व नेहमी हुकुमशहांच्या आणि मुल्ला-मौलवींच्या प्रभावाखाली राहिलेले राष्ट्र असताना त्याचा भारतावर परीणाम होणारच. अफगाणिस्थानात अल कायदा पुन्हा बळकट होतोय, गेले काहि दिवस इराण अमेरीकेशी अरेरावीने बोलतोय, ओसामा-अयातुल्लाची तत्वज्ञाने तिथल्या मदरश्यांतुन तरुणांच्या टाळक्यात ठसवली जात आहेत इतकि कि इंजिनिअर असलेले तरुण अल्लाहसाठी जिहाद करायला फिदायीन हल्ले करत आहेत. म्हणुनच अमेरीका-ब्रिटन-इस्राइल या ३ नावांनंतर “भारत” हा देश चौथ्या क्रमांकावर आहे हे विसरुन चालणार नाहि. त्यातुन चीन सारखे राष्ट्र भारता विरुध्द इथल्या शक्तींना छुपी मदत करते हे काहि नविन नाहि. दहशतवाद कीती पसरलाय हा विचार केला तरी हा देश कसा चालतोय याचे कौतुक करावे लागेल… वर काश्मीर, पंजाबात खलीस्तानवादी, नेपाळ सीमेपासुन विदर्भापर्यंत पसरलेले माओवादि, आसाम मधले फुटीरतावादि, सिक्किम-अरुणाचलप्रदेशावरची चीनची वखवखलेली नजर, भारताच्या कुशीतला कृतघ्न बांग्लादेश, खाली उत्तर श्रीलंकेत लिट्टे, त्यातुन वेगळा द्रविड देश असावा अशी मागणी करणारी माणारे या देशात आहेत याची जाणीव बहुदा लोकांना नाहिये. हे कमी की काय अंदमान-निकोबार मध्ये बांग्लादेशी घुसखोरी करत आहेत. भारत - श्रीलंकेच्या बरोबर खाली अमेरीका-ब्रिटनचा संयुक्त नाविक तळ “दिएगो गार्सिआ” आहेच. आणि हे सगळे काहि संत नव्हेत. आंतराष्ट्रिय राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो. आपल्या देशाचा नागडा स्वार्थ इतकीच प्रत्येकाची खरी बाजु असते.

आपण जागतीक पातळीवर युनो अथवा सार्क सारख्या आंतराष्ट्रिय व्यासपिठांची “शक्तीपिठे” कधीच केली नाहित. मात्र पाक काश्मीर मध्ये भारत जवळपास “कयामत ढा रहा है!” हेच चित्र निर्माण करत फिरत होता-आहे. याचा परीणाम भारताला नक्किच भोगावा लागला होता. आता परत अमेरीकेचा नवनिर्वाचित अध्यक्ष ओबामा परत तेच त्रिपक्षीय वाटाघाटिचे गाणे गाऊ लागलाय. भारताने कुठल्याहि परीस्थीतीत फक्त द्वि-पक्षीय वाटाघाटीचा हट्ट सोडुन चालणार नाहि. खरतर काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असुन आज दुसर्‍या देशा बरोबर सीमा आखाव्या लागत आहेत. हे घोंगडं पं. नेहरुनी भिजवुन ठेवलय. “डोमेलच्या पुढे जाऊ नका! कारण त्यापुढे भारताशी इमान नसलेली कट्टर माणसे आहेत!” हि मेजर सेन यांना दिलेली सुचना भारताला आज महाग पडतेय. तेव्हा भारताला काश्मीर घेणे सहज शक्य होते तेव्हा काहि कारणांनी तो घेतला नाहि त्याचा फार मोठा इतिहास आहे. जागे अभावी इथे सगळा देता येत नसला तरी थोडक्यात सांगायचे तर फारुख अब्दुल्लाचा बाप शेर-ए-कश्मीर उर्फ शेख अब्दुल्ल याला स्वतंत्र कश्मीर हवा होता त्यासाठी त्याने पाकिस्तानच्या गळ्यात गळे घातले होते मात्र पाकिस्तान आपल्याला फसवत आहे हे कळल्यावर हाच शेख दिल्लीत पळत आला, नेहरुंनी त्याला मदत केली पण अशी त्रांगड निर्माण करणारी मदत जी आज भारताला त्रास देणारी ठरलीये. बर पुढे याच शेख अब्दुल्लाचे नेहरु-गांधी घराण्याने किती गालगुच्चे घेतले हे जगाला माहित आहे. त्याचा मुलगा फारुख अब्दुल्ला हा अजुनहि स्वतंत्र काश्मीरचा फुत्कार मधुन-मधुन टाकत असतोच आणि इतके करुन हाच फारुख अब्दुल्ला, राज ठाकरें विरुध्द शिवाजी पार्क वरील समाजवादि पार्टिच्या मेळाव्यात एकोप्याच्या गप्पा मारतो. बहुदा असे विनोद भारताखेरीज कुठे घडत असतील असे मला वाटत नाहि. आज ठरवले तरी युध्द आणि जगाची नाराजी ओढावुन ती निभावुन नेण्याची आर्थिक-सामाजिक-राजकिय-सामरीक ताकद भारतात येत नाहि तोवर संपुर्ण काश्मीर भारताला जिंकता येणार नाहि ये उघडे-वाघडे सत्य आहे. कारण यात पाक-भारतच नव्हे तर चीन व अमेरीकेचे हितसंबध गुंतले आहेत हे सांगणे न लगे. शाक्सगम, मानसरोवर च्या पलीकडिल भाग चीनचे साम-दाम-दंड-भेद वापरुन ६२ पासुन थोडा-थोडा करत बळकावलाय.

पाकचे असे तर या बाजुला चीन पाकिस्तानला अग्वादा बंदर बांधण्यात मदत करतय. श्रीलंकेला लिट्टे विरुध्द लढायला चीन हत्यारे पुरवतय. त्यामुळे श्रीलंका चीनची मांडलिक बनलि तर भारतालाच त्याचा त्रास होणार आहे. आणि आमचे करुणानिधी तमिळींना न्याय मिळावा म्हणुन लिट्टेची मदत करायला भारत सरकारला भाग पाडायचे उद्योग करत आहेत. लिट्टे काहि सत्संग भरवणारी धर्मदाय संस्था निश्चित नाहिये. आपला एक पंतप्रधान याच लिट्टेने ग्रासला होता. आपला शेजारी म्यानमार तिथे हुकुमशाहिच आहे, मादाम स्यु कि अजुन किती वर्ष तुरुंगात घालवणार आहेत? या प्रश्ना बरोबरच म्यानामारला चीन मदत करतोय हे जास्त धोकादायक आहे कारण अरुणाचलप्रदेशची शेकडो किलोमीटरची सीमारेषा म्यानामारला लागली आहे. भारतीय पंतप्रधान चीनच्या पारंपारीक प्रतिस्पर्धी असलेल्या जपानला भेट देऊन आल्यावर चीनची अस्वस्थता बघण्यासारखी होती. चीन भारताला सगळीकडुन घेरतय. या ड्रॅगनचा विळाखा आत्ताच खिळखिळा केला पाहिजे.

प्रत्येक जण झाल्याप्रकाराचा राजकिय लाभ उठवणार. विरोधी पक्ष सरकार-सुरक्षा यंत्रणा झोप काढत होतं का? हा प्रश्न विचारणार. सरकार म्हणणार येणारा डोक्यावर पट्टि बांधुन थोडिच येतो कि मी आतंकवादि आहे म्हणुन? आम्हि आता अमुक एक दल आणी समिती स्थापन करु. अश्या समित्या स्थापन होणार चौकशी होणार सरकार बदलले कि आपला स्वार्थ साधणारे निष्कर्ष काढायला लावणार किंवा नविन समिती बसवणार मग “तारीख पे तारीख” पडत राहणार १३ वर्षे खटले चालणार अर्धे आरोपि म्हातारे होऊन मरणार, काहि तुरुंगात जास्त सुरक्षीत राहणार, मसुद अझर सारखे सुदैवी आणि लंबी पहुच असलेले अतिरेकि एखाद्या विमान अपहरणानंतर सुटुन पाकिस्तानात जाणार मग “जैश-ए-मुहम्मद” सारखे आत्मघातकि जिहादि पथक स्थापन करणार, अफझल गुरु तुरुंगात मानव अधिकारवाल्यांच्या उपकारावर एकेक दिवस पुढे ढकलत राहणार. मात्र अफझल गुरु जिवंत कसा या अस्वस्थतेने संसदेवरील हल्ला आपल्यावर झेलणार्यांचा नातेवाईक त्यांची मरणोत्तर शौर्य पदके परत करतोय याची दखल कोण घेणार? लाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽज वाटायला हवी त्याची, शौर्य पदके परत केली जातात – कोणासाठी एका आतंकवाद्यासाठी????? आणि सरकार अफझलला लटकवण्या ऐवजी निलाजरेपणाने आतंकवाद्यांच्या मुलांना आर्थिक मदत देत फिरतय. वाऽऽऽऽऽऽऽऽऽ. प्रत्येक नागरीकाला याची लाज वाटायला हवी. येत्या निवडणुकीत अश्या सरकारला त्यांची “जागा” दाखवायला हवी. हा प्रकार म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा झाला.

सरकार कुठलेहि असो आतंकवादा विरुध्द लढणारी एक यंत्रणा पाहिजे. कडक कायदे हवेत इतके कि आतंकवाद्यांनी मरणाची भीक मागितली पाहिजे. पण हे सगळे काहि आज म्हंटले आणि उद्या उभे राहिले इतके सोप्पे नाहिये . राजकिय स्वार्थ सोडुन सगळ्यांनी एक मुखाने कठोर कायदे निर्माण करुन ते राबवायला हवेत. याच बरोबर नागरी सुरक्षेची अंतर्गत सुविधा असली पाहिजे त्यासाठी डिजास्टर मॅनेजमेंट ची सुदृढ यंत्रणा देखिल दुसर्‍या बाजुला उभी केली पाहिजे. ती आधी़च केली असती तर गुजरात मधुन जी बोट बोट मालकाला ठार मारुन बळकावली आणि पुढे जे झालं ते कदाचीत झालं नसतं अथवा निदान आटोक्यात आणता आलं असतें. किंवा नरीमन हाऊस बाहेर जी फाजील बघ्यांची गर्दि जमुन पोलिसांचे काम उगीच वाढवत होती ती जमा झाली नसती. अमेरीका - युरोपिअन राष्ट्रे अथवा इस्राइल सारख्या काहि राष्ट्रांत किमान ३ वर्षांचे सैनिकी प्रशिक्षण दिले जाते. भारताला आर्थिक दृष्ट्या हे सध्या शक्य नसले तरी NCC सारखी शक्य तितकी आपत्कालीन मदत दले यासाठी शाळा पातळी पासुन ते जेष्ठ नागरीकांपर्यंत बनवली पाहिजेत. याचा उपयोग अश्या घटनांच्यावेळी होईलच पण नैसर्गिक आपत्तीत देखिल बरेच नुकसान टाळता येईल. आपला नविन शेजारी संशयास्पद हालचाल करत नाहिये ना? तो जास्तीत जास्त वेळ घरातच घालवत नाहिये ना? जास्त ओळख न वाढवता अलिप्त राहुन आपले व्यवहार करतोय का? असे प्रश्न देशाच्या सुरक्षेसाठी विचारणे गरजेच आहे. गाडित आजुबाजुला ठेवलेली एखादि बॅग सहा-आठ स्टेशन नंतर हलली नसेल तर ती कोणाची आहे? हा प्रश्न विचारला पाहिजे.

या अश्या यंत्रणां खेरीज समाजात अनेक बाबतीत आज जागरुकता येणे फार गरजेचे आहे. संजय दत्तवर AK ४७ जवळ बाळगल्याचा आरोप असताना त्याचे चित्रपट हिट होतातच कसे? चिंकारा मारुन सलमान खान सुटतो कसा? आणि सुटल्यावर त्यावर बहिष्कार टाकायचे सोडुन तो सुटल्याचा आनंद मनवलाच कसा जातो? सलमान-संजय म्हणजे काहि दैवी अवतार नव्हे, उलटे टांगुन बडवुन काढावे हि तो यांची लायकि. कधी कधी तर प्रश्न पडतो कि इथल्या लोकांची बौध्दिक पातळी इतकि खालावली आहे का?? संजय दत्तला मध्ये ९३ च्या सुनावणीसाठी कोर्टाने बोलावले तर दोन तरुणींना त्यांचे (अनावश्यक)मत विचारले तर म्हणे “तो किती चांगला दिसतो असं करेल असे नाहि वाटत!” तिच गोष्ट सलमान खान सुटुन आल्यावर त्याच्या बंगल्या समोर शेकड्यांनी जमलेले लोक फटाके फोडुन आनंद मनवताची दृष्ये केवळ उबग आणणारी होती. आणि हे तर काहिच नाहि, ज्यांचे एन्काउंटर करायला कधीकाळी पोलिस बंदुका सरसावुन धावत होते. आज त्यांच्या Z+ सिक्युरीटिसाठी सरकार खर्च करतं कारण ते निवडुन संसदेवर जातात. ते जातात कसे हा प्रश्नच आंम्हाला कधी पडत नाहि.?? फुलन देवी, अरुण गवळी, पप्पु कलानी हे निवडले जातातच कसे? त्यांना निवडणुकिला उभे राहुच कसे दिले जाते? इतका का कायदा गाढव आहे? समाजात या सगळ्या बद्दल जागृती निर्माण होत नाहि तोवर हे असंच घडत राहणार.

हे सगळं लिहिल तर आहे, पण हे लक्षात कोण घेतो………? परत ये रे माझ्या मागल्या नाहि झालं म्हणजे मिळवलं.


- सौरभ वैशंपायन.
(२८/११/२००८))

Tuesday, November 18, 2008

जागो रे….

CCNA च्या परीक्षेसाठी आयडेंटिफिकेशन प्रुफ लागेल म्हणुन मी त्या डॉक्युमेंट्सची जमवजमव करु लागलो तेव्हा माझ्या लक्षात आले.............. मी अजुन माझे VOTER ID CARD काढलेलेच नाहिये. हे सांगणे काहि भुषणावह नाहिये, उलट २४ वर्षांच्या मुलाकडे अजुन VOTER ID CARD नाहिये हि अत्यंत चुकिची गोष्ट आहे. मागच्या निवडणुकिच्या वेळी मी लक्षच दिले नाहि. मात्र आता ती चुक सुधारेन म्हणतोय. तुमचे भारतीय नागरीकत्वा बरोबरचे राहत्या ठिकाणेचे प्रुफ म्हणुन तर तुम्हि त्याचा सगळीकडे वापर करु शकताच पण महत्वाचं म्हणजे तुम्हि तुमचा मतदानाचा हक्क बजावु शकता. तुमचे एक मत फरक पाडु शकते. मी अधिक माहिती करीता टाटा ने चालवलेल्या “जागो रे!” मोहिमेच्या साईटवर चक्कर टाकुन आलो. अतिशय छान आणि माहितीपूर्ण साईट आहे. आम्हि गरीबी, भ्रष्टाचार, अन्याय, सुरक्षा यांच्यावर ताशेरे ओढतो पण मतदानाला कितीजण बाहेर पडतात? खरतर ९०% पेक्षा कमी मतदान होणं हि आपल्या मतदारसंघाला लाज आणणारी गोष्ट आहे. कश्मिरात निदान अतिरेक्यांच्या धाकाने कमी मतदान होतं इथे आमचा आळस नडतोय! मग झोपडपट्टितले दादा पैसे घेतात आणि आजुबाजुची त्यांची अनुयायी आणि चेले मंडळी त्याच्या एका शब्दाखातर अथवा धमकिखातर सांगितल्या निशाणीवर ठप्पा लावतात. मग पैसे चारुन सत्तेवर येणारे अनेक महाभाग नगरपालिकेत, विधानसभेत आणि लोकसभेत बसतात. प्राथमिक इंग्रजी धड बोलु न शकणार्‍या शिक्षणमंत्र्यांच्या हातात आमच्या शिक्षणाचे सुकाणु दिले जाते, घोटाळे करणारे, मर्डर चार्ज असलेले गुन्हेगार उजळमाथ्याने पोलिस संरक्षणातुन फिरतात. आणि आम्हि ये रे माझ्या मागल्या करत “सिस्टिमला” दोष देत सकाळची ८:१०ची गाडि पकडण्याच्या चिंतेत हरवुन जातो.

सुशिक्षित म्हणवणारे आम्हि आमचा हक्कच बजावत नाहि. टाटाच्या त्या साईटवर – “तुम्हि या आधी कधी मतदान केले आहे का?” या प्रश्नावर ४५% लोकांनी “होय!” तर ५५% लोकांनी “नाहि!” असे उत्तर दिलेय. म्हणजे जे इंटरनेट वापरु शकतात, ज्यांना लिहिता-वाचता येते किमान पातळीवरील चांगल्या-वाईटाचा विचार करु शकतात त्यापैकी ५५% टक्के लोकांनी मतदानच केलेले नाहिये. दुर्दैवाने मीहि त्यातला एक आहे. पेज थ्री वरील लोकं फक्त फोटो काढुन घेण्यासाठीच मतदान केंद्रांवर येतात याबाबत मी नि:शंक आहे. झोपडपट्ति अथवा मेंढरे कॅटेगरीतली माणसं पैसे, दारु, चिकन यांना भुलुन सांगेल तिथे शिक्का मारतात. मग मध्यमवर्गिय माणुस काय करतो? घरी बसुन “हॅट सालं देशाचं काहि खरं नाहि! अमुक एक पार्टि आली तर देशाला विकुन खाईल, तमुक पार्टी आली तर धार्मिक तंटे वाढतील, सोम्याने इतक्या करोडचा घोटाळा केला होता तरी जिंकला! गोम्या चांगला आहे पण लोकं मागे नाहि त्याच्या! ” असे म्हणत मान झटकुन नेमेची येतात निवडणुका” या ठेक्यावर ते विचार उडवुन देतो!

VOTER ID CARD मिळवण्यासाठी काय करावं लागतं याची देखिल माहिती नसते. असली तरी बरेचजण त्याकडे लक्ष देत नाहि. असो, जास्त डोकं न खाजवता याबाबत माहिती हवी असेल तर सरळ TATAच्या http://jaagore.com/ या साईटवर जा. तिथे “REGISTRATION PROCESS” वर क्लिक करा - http://jaagore.com/faq.html#1 इथे तुम्हांला हवी ती सगळी माहिती मिळेल.

“अपने को क्या करनेका है!?” या मुंबईय़्य़ा भाषेतील प्रश्नाने सगळ्याची वाट लावली आहे. मात्र हा प्रश्न मी तरी पुन्हा विचारणार नाहि. येत्या ७-८ महिन्यात महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुका आहेत. त्यात ज्याचे माप त्याच्या पदरात टाकायला मी तयार होतोय. सगळे एक प्रश्न विचारतात – “सगळेच चोर आहेत साले,काय फरक पडणार?” तर त्यांना सांगतो – मग त्यातल्या त्यात कमीतकमी चोर असेल त्याला वोट करा.

उठा, दाखवा तुमची ताकद! “YOU” can make a difference!

निवडणुकिच्या दिवशी जर तुम्हि वोट करत नसाल तर तुम्हि झोपला आहात, आपणच झोपलो तर देश कसा जागेल? जागो रेऽऽऽ


- सौरभ वैशंपायन.

Wednesday, October 22, 2008

पालपुराण!

ईऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ असे ओरडुन तीने मला घट्ट मिठी मारली. मला नक्कि काय झाले ते समजले नाहि, पण लग्गेच फिल्म मध्ये दाखवतात तसे बासरीचे प्रसन्न background music कानात आपसुक वाजायला सुरुवात झाली. मुळात काय झाले हेच माहित नसल्याने तीने ती मिठी आनंदाने, दु:खाने कि घाबरुन मारली होती हे मला कळेनासं झाल. पण सुरुवातीला तिने जो ईकारान्त स्वर काढला होता त्यावरुन घाबरुन तिने मला मिठी मारली असावी असा अंदाज मी बांधला(कारण मुली ८०% वेळा हाच स्वर वापरतात आणि हा आनंदाचा देखिल असु शकतो you never know). तिच्या मिठीतुन सुटण्याचा अज्जिबात प्रयत्न न करता मी शांतपणे विचारले “काय झाल?”, “ भिंतीवर बघ” - ती, मी म्हणालो “घड्याळ आहे! मग काय झालं?” तशी माझावर डाफरली “इडियट, उजवीकडे बघ! २-२ पाली आहेऽऽऽऽत!” मग मी उजवीकडे बघितले दोन पाली एकमेकांकडे तोड करुन भिंतीवर चिकटल्या होत्या. मध्येच एक पाल चुकचुकली पण हे चुकचुकणे समोरच्या पालीसाठी होते कि हि सुंदर कन्यका माझ्या मिठीत आल्याबद्दल होते ते मला समजले नाहि. मी तिला म्हणालो “अग घाबरतेस काय? पाल म्हणजे काय मगर आहे कि डायनॉसोरस?” तशी रडवेल्या स्वरात म्हणाली “ते बरे, त्यांची भिती तरी वाटते किळस नाहि!” तसा मी अजुनहि शांत होतो. इथे कोणाला घाई होती मिठी सोडवण्याची? पण ती मध्येच माझ्यावर ओरडली “अरे बघतोस काय? हाकलव ना त्यांना!” आणि मग लहान मुले हॉरर फिल्म बघताना डोळ्यांच्या कडेतुन किंवा बोटांच्या फटितुन बघतात तशी एका डोळ्याने ती पालींकडे बघायला लागली.

नाईलाजाने मी पालींना “शुकऽऽ हुश्शऽऽहुर्रऽऽ“ असे त्यांना झेपतील असे आवाज काढुन हाकलवायचा प्रयत्न करु लागलो. हि एका डोळ्याने तो चित्तथरारक प्रसंग बघत होतीच. पण झाल उलटंच त्यातली शिशुपाल(लहान पाल) वर सरकण्याऐवजी चार बोटं खालीच सरकली तशी खसक्कन मान वळवुन “आंऽऽऽऽऽ“ असा अनुनासिक स्वर तिने काढला आणि माझ्या शर्टचा चोळामोळा करत तिने तिची पकड अजुन घट्ट केली. तिचे लक्ष नाहि असे बघुन मी हाताने पालीला “जा” ऐवजी “ये-ये” अशी खुण करु लागलो. परत मी “शुकऽऽ हुश्शऽऽहुर्रऽऽ“ असे आवाज काढुन बघितले, न जाणो हिच “पाली भाषा” असायची आणि त्या आवाजांपैकी एकाचा अर्थ “खाली ये” असा असेल तर? म्हणून मी नेटाने आवाज काढणे सुरु ठेवले होते. आता मात्र ती पाल वर-वर गेली, तशी दुसरी पाल परत चुकचुकली. प्रत्येक ५ सेकंदानी ’इकडुन’ प्रश्न येत होता “गेल्या का? – गेल्या का?” . मी उत्तर न देता फक्त “शुकऽऽ हुश्शऽऽहुर्रऽऽ“ असे आवाजच काढत होतो त्यावरुन त्या अजुन आहेत असे तिला आपोआप समजत होते व त्यामुळे ती जैसे थे स्थितीत उभी राहिली. व्वा! काय प्रसंग होता? पाली भिंतीला चिकटल्या होत्या आणि ती मला!

अखेर त्या दोन्हि पाली कुठल्याश्या कपाटामागे लुप्त झाल्या(बॅड लक). मी फारच जड अंत:करणाने तीला “हुं गेल्या गं!” असे सांगितले तशी मग ती दोन पावले मागे सरकली. परत-परत भिंतीच्या या टोका पासुन त्या टोकापर्यंत नजर भीरभीरवत ती बाजु झाली. मग जीवाचे असे हाल करुन वर लाडिक आवाजात “ओह सॉरीऽऽ“ असेहि म्हणाली. “मोस्ट वेलकम!” हे शब्द मी जीभेकडुन पडजीभेकडे ढकलले. “मला ना लहानपणा पासुन पालीची किळस वाटते! एकदा माझ्या अंगावर पडली होती, तेव्हापासुन पाल म्हंटलं कि ….यॅक !” असं म्हणुन तीने चेहरा शक्य तितका वाकडा केला. मी मनातल्या मनात त्या पालीची दृष्ट काढुन टाकली.

मग मला उगीच सुरसुरी आली –

मी: बर झालं ना मी बंगाली नाहिये ते?

ती: का?

मी: बंगाली असतो तर बहुदा माझे आडनाव “पाल” असते. (यावर ती खीखी करुन मनापासुन हसली.) पण मग मला सांग…

ती: काय?

मी: समजा माझे आडनाव “पाल” असते तर आत्ता तु मला मिठी मारली असती का? कि भिंतीवरची पाल आणि हा मनुष्य पाल यांच्यात गोंधळुन उभी राहिली असतीस?

ती: आता हा फालतु प्रश्न आहे, मुळात तुझे आडनाव पाल असते तर मी तुझ्याशी मैत्रीच केली नसती.(आईचा घो रेऽऽ! पोरगी स्मार्ट आहे यार, साला हा विचारच केला नव्हता!)

मी: “अगं घरात असावी एखदि पाल!”

ती: शीऽऽऽऽऽऽऽ ती कशाला?

मी: अगं म्हणजे झुरळं होत नाहित घरात (आता अजुन काय सांगणार? खर कारण म्हणजे मगाचा ऍक्शनरीप्ले होत रहावा हेच होतं)!

ती:यॅऽऽऽक, अशी पाल वगैरे असेल तर मी परत नाहि हं येणार तुझ्या घरी! त्या पालींना घराबाहेर काढ आधी.(आयला, आला का प्रॉब्लेम? समस्त पाल जमात माझ्यासाठी अडचण ठरत होती. उद्या केलं प्रपोज आणि फक्त घरात पाली आहेत म्हणुन ती नाहि म्हणाली तर?)

मी: बरं बाई! तु गेल्यावर हाकलवीन झालं समाधान?

ती गेल्यावर आधी त्या पालींना घरा बाहेर हुसकावलं(बिचार्‍यांनी माझ्या आयुष्यात काहि अतिसुंदर क्षण आणल्यावर असे करणे शुध्द कृतघ्नपणा होता हे मला समजत होतं, पण माझाहि नाईलाज होता. माझ्या लग्नानंतर नक्कि परत बोलविन या बोलीवर त्यांना बाहेर हुसकावले!) . आणि लगोलग काहि गोष्टिं ठरवुन टाकल्या – १)आम्रपाली हा चित्रपट बघायचा नाहि. २)अर्जुन रामपालचे चित्रपट बघायचे नाहित(तसहि कोण त्या ठोकळ्याला बघतोय?) ३)श्री नायपाल(कि नायपॉल? एकच ते) यांच्या पुस्तकाला कितीहि पुरस्कार मिळाले तरी ते वाचायचे नाहि ४)पाली गावात जायच नाहि, अष्टविनायकांपैकी सात जणांनाच भेट द्यायची. आणि ५)निदान “होकार” येईपर्यंत पाल अथवा पाली अश्या कुटल्याहि उच्चाराशी संबधित गोष्टिंची आपण संबध ठेवायचा नाहि.


तुर्तास इतकच!

------------------------------------------
डिस्क्लेमर: दुर्दैवाने हि घटना व यातली "ती" अजुन तरी पुर्णत: काल्पनिक आहे. हे ज्या दिवशी खरे होईल त्या दिवशी हा डिस्क्लेमर काढण्यात येईल याची आगाऊ नोंद घ्यावी.
------------------------------------------


- सौरभ वैशंपायन.

Monday, October 20, 2008

वेठबिगारी

सध्या घरात वेठबिगारीवर काम करतोय. म्हणजे दिवाळी आधीची आवराआवर!
दिवाळी टु दिवाळी काहि काम करायची असतात त्यापैकी एक म्हणजे माळा आवरणे, पलंग, मोठ्ठे लोखंडि कपाट, ह्या गोष्टि पोटात खड्डा पडेपर्यंत जोर लावुन (विनाकारण)जागेवरुन हलवायच्या असतात. चुकुन "अग जाऊदे ना! कोण कपाटं हवलुन त्याच्या मागे बघणार आहेत?" असा प्रश्न तोंडुन निघुन गेला कि "हे बघ हे मलाहि समजत तु अक्कल शिकवायची गरज नाहिये, सांगतेय ते नीमुटपणे कर, तुझ्यापेक्षा ३० पावसाळे जास्त बघितले आहेत मी, हां आता तु शिकव मला, मागच्या वर्षी देखिल हेच म्हणाला होतास, कपाटामागे किती जंजाळ आहे ते माहिती आहे का? दोन आठवड्यांपूर्वी रद्दी काढायला सांगितली होती ती तश्शीच, मित्र-मैत्रिणींच्या हमाल्या करायला सांगा एका पायावर तयार मी चुकुन काहि सांगितल तर तोंड वाकडे, आमची कींमतच नाहिये कोणाला!!!!" अशी सगळी हुकमी वाक्ये एका नजरेतुन टपाटप पडतात. म्हणुन मग काहिहि न बोलता हो हुक्म म्हणत झाडु, पोतेरी, पिशव्या, केरभरणी अशी अस्त्रे-शस्त्रे बळजबरी हाता कोंबली जातात. "अरे उंच आहेस ना? नुसता हात वर केलास तरी छतापर्यंत झाडु पोहचतो तुझा, मला मेलीला खुर्ची घ्यावी लागते!" अशी प्रस्तावना करत या गोष्टिंनी तुम्हांला एखाद्या बंदुकिप्रमाणे लोड केलं जातं.

कालहि आईने हसत-हसत चहाचा कप हातात दिला - "आज ओट्याखालची आवराआवर करायची आहे!" मी काहिहि उत्तर/रीऍक्शन/प्रतिक्रिया न देता पेपर मध्ये तोंड घातले.

आई: "अरे काय म्हणतेय मी?"

मी: "हं"

आई: "मग जरा थोबाड उघडुन करतो म्हण कि"

मी: "हं, करतो!"

आई:"हे बघ आधी पुढचे डबे काढुन इथे ठेव ओलं कापड देते डब्याची झाकणं पुसुन ठेवत जा दोन्हि कामं होतील!"

मी: "हे बघ मला ज्या गोष्टिंची अडगळ वाटेल ते मी फेकणार थांबवणार नसशील तरच ओटा डिपार्टमेंटला हात लावणार. एकतर ओटा हा फारच संवेदनशील भाग आहे घरातला. दिवसभरातुन किमान एक हजार एकशे एक वेळा पुसला जातो!"

आई: "...आणि म्हणुनच तो स्वच्छ राहतो. मेलं एक दिवस काय काम करायला सांगितलं तर अटि घालतात, आमची किंमतच कुठे आहे!"

मी: "ऑफर आपके सामने है! हां या ना?"

आई: "ठिक आहे पण मला दाखव आणि मगच टाक."

मी: "म्हणजे थोडक्यात जैसे थे?"

आई: "चहा पिऊन झाला कि लग्गेच कामाला लाग, मला नंतर तिथे स्वयंपाक करायचा आहे!" (माझ्या प्रश्नाला आईने मुरलेल्या राजकारण्या प्रमाणे "कट" मारला होता.)


भारतात बालमजुरांची वयोमर्यादा फक्त १४ असल्याचे दु:ख झालेल्या काहि क्षणांपैकी काहि क्षण गोंजारत मी कामाला सुरुवात केली. या "बायका" कॅटेगरीचं मला फाऽऽऽऽऽऽर कौतुक वाटतं. "लागेल कधीतरी" या घोषावर अनेक चित्रविचित्र किंवा त्याच त्याच गोष्टि जमा केल्या जातात. मी सामान काढलं तसं मागे उभं राहुन "हळु, तेल आहे!" किंवा "ग्लासचा बॉक्स सांभाळुन काढ. मागच्यावेळी बाबांनी त्यातला एक फोडुन झालाय ऑलरेडि!" अशी हतविर्य करणारी वाक्ये(हुकुम) "चॅलेंज" खेळल्या सारखी "मेरा एक और" करत टाकली जात होतीच.

डब्यांची पहिली रांग संपल्यावर मग अलीबाबाची खरी गुहा उघडली. रीकाम्या बरण्या, बरण्यांची झाकणे, टप्परवेअर(हा एक घाणेरडा प्रकार असतो, बायकांना जाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽम कौतुक असतं या प्रकाराचं. इतका बेक्कार प्रकार मी अजुन पाहिला नाहिये.) दुधाचे २ कुकर, चकलीचे साधारण ५ सोर्‍ये( सोर्‍येच ना?) पिशवीत पिशवी पिशवीत पिशवी असे काहितरी काळॆ-मिठ किंवा तत्सम काहितरी हाताला लागत होते.

हे सगळं काढताना मी चेहर्‍यावर आयुष्यभराचे त्रासिक भाव आणुन "काय हे? बरण्या-बरण्या-बरण्या-बरण्या, सोर्‍ये-सोर्‍ये-सोर्‍ये-सोर्‍ये, झाकणं-झाकणं-झाकणं-झाकणं" अशी प्रत्येक गोष्टिची चारवेळा यादि करत होतो. मागुन आईने एकदा ऐकल, दोनदा ऐकलं मग आईने ऐकवलं - "बघु ना! तुझी बायको आली कि बघुच! तेव्हा तीने काहिहि केलं तरी चकार शब्द काढणार नाहिस. लिहुन ठेव!" मग मी "काहि म्हणालीस का?" असे भाव करुन परत ओट्याखाली डोकं घातलं. मग परत डोकं बाहेर काढुन आईला विचारलं - "आई!! आजीनी बाबांना असंच म्हंटल असेल का गं?" असा सरळ साधा प्रश्न केला. त्यावर आईनी "अनुल्लेखाने मारणे" हा उपाय वापरला. मला आजकाल आईची भीती वाटते काहिहि झालं तरी आई माझ्या होणार्‍या बायकोवर जाऊन पोहोचते. ती कोण आहे ते अजुन तरी मला माहित नाहि(म्हणजे तश्या मी बर्‍याच जणी आईला सुन म्हणुन ठरवुन ठेवल्या आहेत!) पण तिला जिथे असेल तिथे बर्‍याच उचक्या लागत असतील हे नक्कि!(त्यातल्या प्रत्येकिला विचारलं पाहिजे "काल तुला उचक्या लागल्या होत्या का?" म्हणजे पत्रिका वगैरे बघायला नको ना!)

असो, तर सध्या वेठबिगार म्हणुन काम करतोय, मोबदला म्हणुन दोन कप चहा, दोन वेळच जेवण आणि झोपायला थोडि जागा दिली जाते. विनोद सोडा पण आवरायला काढलेली जागा दुसर्‍या दिवशी बघुन "वा! बर झालं आवरलं. आता पुढच्या दिवाळीपर्यंत आराम!!" असा विचार येतो आणि सुटलो बाबा एकदाचा म्हणुन निश्वास टाकतो न टाकतो तोच "अरे पंखे पुसायचे आहेत आज!" असा आईचा खुऽऽऽऽऽप प्रेमळ आवाज येतो तिच्या हातात एक चहाचा वाफाळता कप असतो आणि चेहर्‍यावर "आज इतक तर कर उद्या काय करायच ते आज ठरवुन ठेवते!" अश्या आशयाचे स्मित असते. मग चहा संपवुन परत "बालमजुर" वेठबिगारीला जुंपला जातो!

- सौरभ वैशंपायन.

Friday, October 17, 2008

विक्रमादित्य



११,९५३ – ११,९५३, अरे नाहि नाहि शेअरमार्केट चा निर्देशांक नाहिये हा. सकाळी प्रत्येक क्रिकेट रसिक हि संख्या घोकतच उठला असेल. करोडो रुपयांचे कोलगेट स्माईल देणार्‍या, स्विपशॉट किंवा लॉंग ऑफ ला चेंडु तडकावणार्‍या सचिन तेंडुलकरच्या एखाद्या पोस्टरला त्यांनी मनोभावे नमस्कार केला असेल आणि “सच्चिन धाऽऽऽऽऽऽऽऽऽव रे! धाव!” अशी आर्त साद त्या क्रिकेटच्या देवाला घातली असेल. “सचिन तेंडुलकर लारापेक्षा फक्त १५ धावा मागे”, “सचिन विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर” अश्या मथळ्यांशिवाय “आज सचिन विश्वविक्रम घडविणार” या वाक्यासमोर “उद्गारचिन्हा” ऐवजी “प्रश्नचिन्ह” बघुन माझ्याप्रमाणेच अनेकांची “खचकली” असेल. “इडियट सालेऽऽ हा काय प्रश्न झाला का?? झक मारायला पत्रकार आणि क्रिडा समिक्षक झाले का?? तेंडल्या म्हणजे काय यांना म्युनसिपाल्टिचा बेजबाबदार अधिकारी वाटाला काय??” असे प्रश्न चेहर्‍यावर आपसुक आले असतील. तर काहि विघ्नसंतोषी समाजकंटक किंवा ऑस्ट्रेलियाचे कट्टर भारतीय समर्थक “सचिनने आज १३ धावा केल्या तरी बस झालं!” , “सचिन म्हातारा झालाय, सचिनला हाकला” असे म्हणत कडकडा बोटं मोडत बसले असतील.

पण “सचिन संपला” हि गोष्ट ०८-०८-२००८ किंवा ०९-०९-२००९ या दिवशी जगबुडि होणार इतकीच धादांत खोटि आहे. जेव्हा डॉन ब्रॅडमन म्हणाले “सचिन माझ्यासारखाच खेळतो!” तिथे अवघा संदेहो तुटला आहे. सचिन हा प्रत्यक्ष इश्वरी अवतार आहे या एकाच गोष्टिवर मी डोळॆ झाकुन विश्वास ठेवतो. ब्रायन लारा हा देखिल माझासाठी देव असला तरी तो गावकुसा बाहेरचा देव झाला. माझ्या देव्हार्‍यात सचिन-गावस्कर-कपिल-कुंबळे-गांगुली हे पंचायतन आहे. यातल्या शेवटच्या ३ नावांवर काहिजण हसतील देखिल पण हसोत बापडे, भारत जिंकावा म्हणुन मी व अनेकांनी केलेले अनेक नवस याच पंचायतनाने पूर्ण केले आहेत यात वाद नाहि. गावस्कर-कपिल यांना प्रत्यक्ष खेळताना पाहिल्याचं फारच अंधुक आठवतय. कपिलने विश्वचषक उचलला तेव्हा माझा जन्म देखिल झाला नव्हता. पण तरी त्यांचं देव्हार्‍यातील पारंपारीक स्थान मी हलवले नाहिये. पाकिस्तानच्या १० गड्यांना एकहाती तंबुत पाठविणार्‍या कुंबळेचा बॉल बर्‍याचदा सुतापेक्षाहि सरळ जातो हे माहित असुनहि मी त्यावर तुडुंब खुष आहे. त्याला कोणी कितिहि डिवचल तरी त्याला जे काहि सांगायच-करायचय ते तो मैदानात सिध्द करतो. सौरव गांगुलीबाबत म्हणाल तो उद्दाम आहे पण महाराजा उद्दाम वागणारच. साध्या सोज्वळ भारतीय संघाला त्यानेच “अरे” ला “का रे?” विचारायची हिंमत दिली हे कोणी नाकारु शकत नाहि. इंग्लंडला नॅटवेस्ट सीरीज जिंकल्यावर त्याने टि-शर्ट गरगरवुन फ्लिंटॉप आणि कंपनीला जी काहि म्हणुन खुन्नस दिली होती त्यासाठी मी त्याच्यावरुन १०० ग्रेग चॅपेल ओवाळुन टाकले आहेत. मध्ये त्याच्या माजोरडेपणामुळेच वर्षभर त्याला टिममधुन बाहेर ठेवलं होतं. पण पिंजर्‍यात गेला म्हणुन वाघ गवत खात नाहि हेच त्याने धडाकेबाज पुनरागमन करुन सिध्द केलं. सध्या महाराजाचं संस्थान खालसा होण्याच्या मार्गावर आहे पण तो महाराजा होता आहे आणि राहिल. तर सचिन – सौरव गांगुली किंवा कुंबळे यांना हातात कधी बॅट न पकडलेल्यांनी किंवा सोबर्सला आपणच बॅटिंग शिकवली होती अणि वॉर्नला आम्हिच चेंडु वळवायला शिकवल होतं अश्या तोर्‍यात टाकुन बोलणार्‍यांचा मला मनस्वी राग आहे. तसा तर सचिनला किंवा अनिल कुंबळेला नावे ठेवणारा प्रत्येक जण माझासाठी समाजकंटक असुन त्यांना किमान ५ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा द्यावी अशी एक जनहित याचिका मी न्यायालयात दाखल करायच्या विचारात आहे.

असो, तर मुळ मुद्दा ११९५३ या संख्येचा आहे. सचिन रमेश तेंडुलकर हा (देव)माणुस ब्रायन लारा नामक व्यक्ती पेक्षा फक्त १५ धावांनी मागे होता. बंगरुळ कसोटितच हा विक्रम तो मोडणार असे वाटत असताना हाय रे दैवा घात ची झाला. वैयक्तीक १३ धावांवर असताना तो बाद झाला होता. मात्र आज(१७-१०-०८) त्याने ८८ धावा ठोकत आपल्या अर्धशतकांचेहि अर्धशतक साजरे केलेच पण त्याने लाराचा ११,९५३ धावांचा विक्रम मोडला आता १२,०२७ धावांसहित तेंडुलकर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. तसे बघता सचिन विक्रम करण्यासाठी कधीच मैदानात उतरत नाहि पण तो मैदानात उतरला कि किमान ५ सामन्यांमागे एखादा विक्रम त्याच्या नावावर आपोआप घडत जातो. आज फलंदाजी मधले कुठले असे विश्वविक्रम सचिनच्या नावावर उरले आहेत हा पीएच डि करण्यासारखा विषय आहे. आता त्याच्या पाठी लारा ११,९५३, ऍलन बॉर्डर ११,१७४, स्टीव वॉ १०,९२७, राहुल द्रविड १०,३४१ आणि रीकी पॉंन्टिंग १०,२३९ असे पाच जण त्यातल्या त्यात ’जवळ’ आहेत त्यापैकी लारा, बॉर्डर आणि स्टिव वॉ हे तर क्रिकेट मधुन निवृत्त झाले आहेत. आणि द्रविड-पॉन्टिंग त्यापेक्षा किमान १६०० धावांनी मागे आहेत.

१५ नोव्हेंबर १९८९ या दिवशी त्याने वयाच्या १६व्या वर्षी कराचीत पाकिस्तान विरुध्द आपल्या कारकिर्दिची सुरुवात केली. आणि ३५ वर्षांचा सचिन आजहि भल्या-भल्यांच्या तोंडचे पाणी पळवत धावतोच आहे. आजवर त्याने ४१७ एकदिवसीय सामन्यांत एकुण ४२ शतके व ८९ अर्धशतकांसहित, ४४.३३ च्या सरसरीने १६,३६१ धावा कुटल्या आहेत. यात सर्वोच्च धावसंख्या आहे १८६* आहे. गोलंदाजीत ४४.१२ च्या सरासरीने १५७ विकेट्स मिळवल्या आहेत. १५२ कसोटी सामन्यांत एकुण ३९ शतके व ५० अर्धशतकांसहित ५४.०२ च्या सरासरीने १२,०२७ धावा काढल्या आहेत. २४८* या कसोटितील सर्वोच्च धावा आहेत.

सचिनला कॅप्टनशीप फारशी मानवली नाहि. नाहि म्हणायला टायटन कप जिंकला वानखेडेवर, पण तो अपवाद ठरला. त्याकडुन कर्णधारपद काढुन घेतले आणि परत त्याची फलंदाजी बहरली. तो नंतर गांगुली, द्रविड, सेहवाग, कुंबळे, धोनी यांच्या सोबत खेळाला पण त्याने कुठेहि आपण फार कोणी मोठे असल्याचे दाखवले नाहि. कर्णधार-प्रशिक्षक-निवड समिती यांच्या बरोबर त्याचे कधी वाद झाले नाहित. त्यांनी ठरवल त्या क्रमांकावर तो फलंदाजीला उतरला. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा सचिन म्हणुनच सर्वांचा आदर्श ठरला. हरभजन-सायमंड वादात तोच सर्वप्रथम हरभजनच्या मागे खंबीरपणे उभा राहिला. वैयक्तीक आयुष्यात देखिल त्याने कधीहि वाद-विवादांना उपजु दिले नाहि. तो मध्ये सलग ३-४ सामन्यांत एकेरी धावसंख्येवर बाद झाला तेव्हा प्रेक्षकांनी त्याचे हुर्यो उडवली होती. पण सचिन खचला नाहि. खुद्द लतादिदि त्याच्यामागे उभ्या राहिल्या व त्यांनी विनंती केली "सचिनवर प्रेम करा, त्याची हुर्यो उडवु नका!" आणि सचिन "परत" आला.

सचिन तेंडुलकर एक गारुड आहे. सगळ्यांना लहानपणी तेंडुलकर व्हायची स्वप्ने पडतात. सगळ्यांना सचिनची प्रसिध्दी दिसते, त्याचे मान-मरातब दिसतात, त्याची पारीतोषके, दिसतात, त्याच्या जाहिराती आणि त्याची फेरारी दिसते पण सचिनची मेहनत किती जणांना दिसते? सचिनला एका मुलाखतीत विचारले तुझ्या यशाचे रहस्य काय? त्यावर सचिन उत्तरला: “there in no shortcut to success! Hardwork is the only way!” मेहनत-मेहनत-मेहनत हिच सचिनची त्रिसुत्री आहे. विनोद कांबळीची एक आठवण इथे सांगण्यासारखी आहे – "मागे एकदा इंग्लंड दौर्‍यावर गेले असताना सकाळी ६ वाजता भिंतीवर पलीकडुन काहितरी सतत धपऽधप असं आपटत होत, मी बघितले तर शेजारच्या खोलीत सचिन रबरी चेंडु घेऊन मॅचची तयारी करत होता!!" कदाचित बाकिचे खेळाडु व सचिन यांच्यात हा फरक आहे आणि म्हणुनच सचिन ग्रेट आहे.

सचिनने निवृत्त व्हावे असे म्हणणारे आता किमान पुढील २ सीरीजपर्यंत गप्प बसतील. तरी सचिन २०११ चा वर्ल्डकप खेळेल याबद्दल मला खात्री आहे. किंवा किमान त्याने एकदिवसीय सामन्यात ५० शतके व १०० अर्धशतके करावीत तर कसोटीत देखिल ५० शतके व ७५ अर्धशतके करावीत आणि मग वटल्यास निवृत्त व्हावे अशी "रास्त" अपेक्षा आहे. इथे त्यावर अपेक्षा लादल्या जात आहेत असे वाटेलहि पण सचिनला पुढील ३ वर्षात एकुण १९ शतके अज्जिबात कठीण नाहियेत.

आज सचिन सर्वोच्च धावा काढणारा फलंदाज झाला आहे. एक भारतीय आणि त्यातुन मराठी माणुस असे झेंडे उभारत चालल्याचा सार्थ अभिमान आहे. त्याचे नाव आता विक्रमादित्यच ठेवायला हवे. समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवराय या दोन मराठी दैवतांची माफी मागुन या तिसर्या दैवतासाठी मी म्हणेन – “विक्रमांचा महामेरु। भारतीय संघासी आधारु। अखंड स्थितीचा निर्धारु। “श्रीमंत” योगी॥“


- सौरभ वैशंपायन.

Thursday, September 11, 2008

आठवण....

आठवते का? आकाशावर उमटुन गेली होती लाली,
आठवतो का? तोच रक्तीमा फुलला होता तुझ्याच गाली. - १

आठवले का? हळवे स्पर्श, नीसटती त्यांची हुरहुर,
आठवली का? उशीर होता लटक्या रागाची कुरबुर. - २

आठवतो का? ओंजळित फुलला होता चाफा धुंद,
आठवला का? सुवास कसला? चोरला त्याने तुझाच गंध. - ३

आठवली का? अधीर वचने अधराची अधराला,
आठवले का? चुकार अश्रु बिलगते पदराला. - ४

आठवते का? मी निघतो म्हणता घट्ट मीठि विणलेली,
आठवली मज, मला शोधती नजर तुझी शिणलेली. - ५

- सौरभ वैशंपायन(मुंबई).

Tuesday, September 9, 2008

श्यामसखा

कुणी नसावे दुरवर परी,
श्यामसखा जवळी असावा,
श्रावणधारांसवेच अलगद,
श्यामसखा बरसुनी जावा - १

श्यामसख्याच्या निळाईत अन मग,
गौरतनु हे रंगुन जावे,
वेणु त्याने लावताच ओठी,
सप्तसुरात दंगुनी जावे - २

श्यामसखा असा बरसता,
चंद्र लाजुनी चुरुन जावा,
सैलावल्या केसात अन मग,
स्पर्श जरासा उरुन जावा - ३

- सौरभ वैशंपायन.

Tuesday, August 12, 2008

कॅलेंडर - ५७ ते ४७

प्रत्येक भारतीयाच्या घरात हे कॅलेंडर लागावे अशी इच्छा. मी सध्या १८५७ ते १९४७ या दरम्यान "क्रांतिकारकांनी" जे "सशस्त्र क्रांतीचे" प्रयत्न केले त्याचा मागोवा तारखे नुसार घेतला आहे. ज्यांना क्रांतिकारकांशी संबधीत(जन्म-मृत्यु-कार्य) अश्या घटना माहित असतील तर त्यांनी मला ती माहिती द्यावी.



जानेवारी.
२ - १)हुतात्मा विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ भाई कोतवाल पुण्यतिथी(१९४३). २)हुतात्मा हिराजी पाटिल पुण्यतिथी.



फेब्रुवारी.
३ - क्रांतिसूर्य उमाजी नाईक पुण्यतिथी(१८३४).

१७ - आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी(१८८३).

२६ - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आत्मार्पण दिन(१९६६).

२७ - चंद्रशेखर आझाद पुण्यतिथी.

मार्च
२३ - भगतसिंग-राजगुरु-सुखदेव पुण्यतिथी (१९३१).


एप्रिल
१९ - अनंत कान्हेरे पुण्यतिथी(१९१०).

१८ - १)सेनापती तात्या टोपे पुण्यतिथी(१८५९). २)दामोदर हरी चापेकर पुण्यतिथी(१८९८).

३० - खुदिराम बोस यांनी मुझफ्फरपुरमध्ये किंग्जफोर्डच्या बग्गीवर बॉम्ब टाकला(१९०८).

मे.
१ - हुतात्मा विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ भाई कोतवाल जयंती(१९१२).

८ - वासुदेव हरी चापेकर पुण्यतिथी(१८९९).

१० - १८५७ च्या स्वातंत्र्यसमराची सुरुवात.

१२ - बाळकृष्ण हरी चापेकर पुण्यतिथी(१८९९).

२८ - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती(१८८३).



जुन
१८ - राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी(१८५८).

२२ - आयस्टर व रॅंड वध(१८९७)(चापेकर बंधु). वीर सावरकर व नेताजी बोस भेट(सावरकर सदन, मुंबई, १९४१)

२५ - दामोदर हरी चापेकर जयंती(१८६९).

जुलै
१ - कर्झन वायली वध(१९०८)(मदनलाल धिंग्रा)

८ - मार्सेलिस इथुन वीर सावरकरांचा निसटण्याचा प्रयत्न(१९१०).

२३ - १)लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती. २)चंद्रशेखर आझाद जयंती.

ऑगस्ट
१ - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी(१९२०)

१८ - खुदिराम बोस पुण्यतिथी(१९०८)

३ - क्रांतिसिंह नाना पाटिल जयंती(१९००).

सप्टेंबर.


ऑक्टोबर.
२१ - राणी लक्श्मीबाई जयंती(१८३५).

नोव्हेंबर.
४ - आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जयंती(१८४५).

१२ - सेनापती बापट जयंती(१८८०).

१६ - विष्णू गणेश पिंगळे पुण्यतिथी(१९१५).

२८ - सेनापती बापट पुण्यतिथी(१९६७).

डिसेंबर.
६ - क्रांतिसिंह नाना पाटिल पुण्यतिथी(१९७६).

१७ - सॉंडर्स वध(१९२८)(भगतसिंग-राजगुरु-आझाद).

२१ - जॅक्सन वध(१९०९)(अनंत कान्हेरे).

Tuesday, July 22, 2008

आर्य

१>गिधाड!

मध्यानीच्या सुर्यालाहि झाकुन टाकावं इतकी गिधाडं आकाशात गरगरत होती. आज त्यांना बर्‍याच दिवसांनी पोट फुटेतोवर खायला मिळणार होते. त्यांच्या चोचींना लाल रंग चढणार होता आणि त्यांच्या जिभेला गरम रक्त लागणार होतं. खाली हजारो प्रेते रक्ताच्या चिखलात पडली होती. त्यात लहान-मोठे, स्त्री-पुरुष असा कुठलाच भेद नव्हता. वाचलेली लहान मुले त्या प्रेतांजवळ फतकल मारुन भीतीने रडत ओरडत होती. त्यातहि ज्यांच वय नेमकं काय झालय हे कळण्या इतपत होतं त्यांची पाचावर धारण बसली होती. भीत-भीत ते त्या प्रेतांच्या खचात आपले नातेवाईक शोधत होते. काहि मरणपंथाला लागलेले जीव तळमळ करत एक घोट पाण्याची अवास्तव अपेक्षा करत यमदुतांच्या वाटेकडे डोळे लावुन बसले होते. आजुबाजुला फुटकि भांडि-कुंडि, घोड्यांनी तुडवुन काढलेले तंबु, गळुन पडलेली रक्ताळलेली शस्त्रे असं बरच सामान विखुरलेलं होतं. जे या यातनातुंन सुटले होते ते नशीबवान होते म्हणायचे, निदान ज्या स्त्रीया पहिल्या हल्ल्यात मेल्या त्या सुटल्या कारण ज्या जिवंत राहिल्या त्यांच्या अर्धमेल्या देहाला सिकंदराच्या ग्रीक लांडग्यांनी ओरबाडुन त्यांची लक्तरे केली होती. आणि आता वरची गिधाडे त्यांच्या मरणाची वाट बघत होती. आणि हळु-हळु गिधाडे गिरक्या घेत खाली उतरु लागली, थोड्याच वेळात रक्ताचा वस हुंगत कोल्हि-कुत्री देखिल आली आणि त्या ठिकाणाला यमपुरीहुन वाईट दशा आली.

गांधार, राणीगत, उत्तखंड सारखी अनेक राज्य आणि गणराज्य जिंकत सिकंदर तक्षशीलेपर्यंत आला होता. आता त्याचा मोर्चा केकय साम्राज्याकडे वळला. मात्र केकयच्या आधी मस्कावतीनं त्याची वाट रोखली. चुटकीसरशी जिंकु या भ्रमात असलेल्या ग्रीक सैन्याचे डोळे पांढरे व्हायची वेळ यावी असा तिखट प्रतिकार मस्कावतीनं केला. खरं तर असा प्रतिकार त्याला प्रत्येक राज्याकडुन होत होता अपवाद फक्त तक्षशीलेच्या अंभीचा होता. स्वत:हुन त्याने सिकंदराशी हात मिळवणी केली होती, कारण त्याला पौरव राजाला हरवायच होतं आणि त्यासाठि तो कुठल्याहि थराला जायला तयार होता. तक्षशीलाच फितुर झाल्यावर सिकंदराला भारताचे दरवाजे सताड उघडे झाले. आणि आता तो त्या भागातल्या एकुलत्या एक बलशाली राज्यावर चाल करुन जात होता, केकयवर- पौरव राजावर. पण केकयवर जाताना मस्कावतीनं वाट रोखली. एखाद्या मद चढलेल्या हत्तीला मुंगीनं हैराण करावं तसं मस्कावतीनं आपली चिमुटभर ताकद सिकंदरा विरुध्द वापरली. मात्र नाईलाज झाला. मनुष्यबळ, शस्त्रास्त्रे, पैसा या बाबतीत सिकंदर शेकडो पटीने बलाढ्य होता. सिकंदर जग जिंकायच्या महत्वाकांक्षेने पिसाट झाला होता. त्या मस्कावतीच्या नागरीकांना-सैनिकांना बिचार्‍यांना आपले राज्य वाचविणे हाच एक उद्देश होता. पिसाट वृत्तीने मस्कावतीचा बचाव मोडुन काढला. गणराज्याचा नेताच पडला म्हणून वेळ पडली तेव्हा त्या राज्यातल्या स्त्रीयाहि त्या नेत्याच्य पत्नीच्या बरोबर तलवार घेऊन मैदानात उतरल्या. पण असा कितीसा टिकाव लागणार होता? अखेर मस्कावतिनं हत्यार ठेवलं.

सिकंदरानं गणराज्यातील काहि प्रमुखांना बोलावुन त्यांना सांगितले - "आमच्यात सामिल व्हा आणि पुढे लढाईत मदत करा, किंवा हे राज्य सोडुन दुर निघुन जा! दोन्हि मान्य नसेल तर तुमचा विनाश ठरलेला आहे!! आम्हाला सामिल झालात तर योग्य मोबदला देऊ किंवा जायचे असेल तर निघुन जायला तुम्हाला २ दिवसांची मुदत देतो!! तिसरा दिवस विनाश घेऊन उगवेल!" पराभूतांना स्वत:च मत नसत. बिचारे काय करतात? विचारांती ठरवलं - आपण दुर निघुन जाऊ, निदान त्या अंभी राजा सारखी आपली तलवार स्वकियांच्या रक्तानं माखवण नको. आपल्या पिल्लांचे आयुष्य इथुन दुर सुरक्षीत तरी राहिल. मोठ्या जड अंत:करणाने, जिथे उभं आयुष्य काढलं ती मातृभूमी सोडुन तिथले नागरीक निघाले. पण इतक्या हजारो लोकांचा प्रवास सहाजिकच धीम्या गतीनं होऊ लागला. पहिलाच मुक्काम नगराच्या वेशी बाहेर थोड्याच अंतरावरील माळावर पडला. सकाळी उठुन निघण्याच्या तयारीत असताना अचानक धुळीचे ढग उठले. घोड्यांच्या टापांचा आवाज वाढत गेला आणि आली - सिकंदराच्या सैन्याची गिधाडि धाड मस्कावतीच्या बेसावध नागरीकांवर पडली. सिकंदरानी शब्द मोडला होता....कपटाने त्यांचा काटा काढला होता...जग्जेता म्हणवणार्‍याकडे शब्द राखण्याचीहि दानत नव्हती. क्षणभरात अमानुष कत्तल उडाली. सारे मातीमोल झाले. कापाकापी, बलात्कारांना ऊत आला. जे या तडाख्यातुन वाचले ते नेसत्या वस्त्रानिशी परागंदा झाले. मागे राहिले आक्रोष, शाप, अश्रु आणि मृत्युचे शिसारी आणणारे तांडव.

- सौरभ वैशंपायन(मुंबई).

Thursday, July 17, 2008

रारंग ढांग

"श्री प्रभाकर पेंढारकर" यांच्या "रारंग ढांग" या पुस्तकातील मला आवडलेले २ उतारे इथे देतोय. हे दोन्हि उतारे त्या पुस्तकातील "मिनू खंबाटा" या पात्राने गाजवले आहेत. झक्क्क्क्क्क्कास आहे. वाचा नक्कि प्रेमात पडाल.



१]

नाइन्थ फील्ड कंपनीत मिनूचं काम होतं की नाहि ते माहित नाहि. मात्र तेथुन पुढं डिटॅचमेंट थ्रीला तो विश्वनाथला सोडायला आला. कालचीच ओळख पण अगदि पूर्वापार जानी दोस्ती असल्यासारखी. विश्वनाथ एकटाच राहणार आहे म्हणुन त्यानं उंची व्हिस्किची छोटि बाटली आणलेली.

"दोस्त, हि जागा मोठि सुरेख आहे." खोलीची पहाणी करत मिनू म्हणाला. तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्याच्या ह्या खोलीत त्याला काय छान दिसलं ह्याचा विश्वनाथला अंदाज येईना. त्यानं विचारल तसं मिनू हसुन म्हणाला "हनीमूनला अशी जागा शोधुन सापडणार नाहि. हा इथला एकांत, नि:शब्द शांतता, दूरवर दिसणारा किन्नोर कैलास, एका बाजुला रारंग ढांग....आणि खालुन वाहत जाणारी सतलज. निळ्या निळ्या आकाशाखाली, खुल्या निसर्गाच्या सान्निध्यात नुकतं लग्न झालेली पण अद्याप प्रियकर आणि प्रेयसी असलेली फक्त दोघं जण! आलीच तर पावसची एखादि सर! उफ, अश्या भिजलेल्या ओल्या ओठांच तू कधी चुंबन घेतलं आहेस? - नाहिऽऽ?? अरे दोस्ता, त्याइतकं सौदर्याच दुसरं ऍप्रिसिएशन नाहि. प्रेमाला दिलेलं दुसरा इतका मोठा कॉंम्ल्पिमेंट नाहि!!"
विश्वनाथ नुसता हसला. विव्हल होत मिनू म्हणाला "दोस्ता, हसु नकोस. चुंबना बाबत आपण बोलतो आहोत. काहि जणी चुंबन घेतलं कि लाजुन लाल होतात, काहि रागावतात, काहि चावतात, काहि मारतातहि. ह्या सर्व परवडल्या. पण तुम्हि भावनेच्या आवेगात, भान हरपुन चुंबन घेतलत कि काहि चक्क हसत सुटतात. ह्या इतकि दारुण फजिती दुसरी कोणती असेल? तेव्हा तु तरी हसु नकोस."


२]

सर्व खटाटोप करणं सार्थकि लागलं असं वाटाण्या जोगी हि नारळांची आणि तांदळाच्या पिठाची चीज बनली होती. पुटुची चव अफलातुन जमली होती.
तोंडात घातलेला मोठा तुकडा खात विश्वनाथनं विचारलं,
"तुम्हांला कशी काय हि केरळातली चीज माहित?"
केरळ...लॅंड ऑफ लगुन्स....लॅंड ऑफ गोल्डन पाम...ऍंन्ड लॅंड ऑफ कथकली - एवढचं वर्णन टूरीस्ट गाईडमध्ये केरळच दिलं असतं. अत्यंत अरसिक, कल्पकताशून्य लोक सरकारी नोकरी धरतात आणि वर चढतात. त्यांनी लिहिलेलं वर्णन हे त्यांच्यासारखच रुक्ष आणि साचेबंद."
"तुम्हाला कसा दिसला केरळ?" विश्वनाथनं विचारलं.
"केरळ - माझ्या डोळ्यातुन पहायचा आहे तुला? केरळ लॅंड ऑफ पुटु ऍंड दि लॅंड ऑफ मुंडु!"
"मुंडु? हे काय प्रकरण आहे?"
"दॅट्स इट! ह्या वर्णनाबरोबर उत्सुकता जागी झाली पाहिजे. हा काय पदार्थ आहे? पहायचा? ऐकायचा? खायचा कि अनुभवायचा? पुटु तुला खायला इथे मिळाला पण मुंडु साठि तुला केरळलाच गेलं पाहिजे. mundu has made Keral the land of beauties!"
मिनू हवेत तरंगल्यागत बोलू लागला. त्याचे पाय जमिनीवरुन सुटले होते हे खरं, पण ते केरळच्या आठवणीमुळे कि त्यानं नुकत्याच रिकाम्या केलेल्या रमच्या चवथ्या ग्लासमुळे, विश्वनाथला समजेना.
"सुकुमारन नायर.... ह्या विशुला सांग... what is mundu..? mundu in chirikal!"
"नाहि. मी चिरीकलला कधी गेलो नाहि."
"अरेरे सुकू, मग तु कसला केरळचा? फुकट फुकट घालवलस तू आजवरचं आयुष्य! दोस्ता ग्लास भर जरा....ह्या चिरीकलीच्या आठवणीनं नशा आला, त्यात थोडि इथली रम मिसळु दे. चिरीकल....एक छोटसं खेडं. समुद्रकिनारी वसलेलं! तिथल्या मोपला मुली. संध्याकाळाची वेळ. नदिवरुन परतत आहेत. कमरेवर भरलेली घागर....अंगात लांब हातांचा ब्लाऊज. चिटाच्या कापडाचा, मोठ्या डिझाइनचा. डोक्यावर सफेद रुमाल आणि खाली लुंगी...केरळच्या भाषेत ’मुंडू’!"

विश्वनाथ थक्क झाला. मुंडू म्हणजे लुंगी हे त्याला कल्पनेतही वाटलं नव्हतं. केरळच्या खेड्यात हरवलेला मिनू पुढं सांगु लागला,
"ह्या लुंगीच्या दोन्हि कडा समोर आलेल्या. ह्या कडा चालताना उघड्या पडतात; कधी कधी पाय पुढं लुंगी मागुन येते. हात कमरेवरची घागर सावरण्यात गुंतलेले. कधी जोराचं वार येतं. लुंगी उडते, गोरे गोरे पाय, नाजुक पण भरलेल्या पोटर्‍या....असच जोरदार वारं येईल तर... नजरेत सगळी उत्सुकता दाटते. पण दोस्त. झंझावात आला तरी मुंडू तिथच. वर सरकतच नाहि. This far & no further! म्हणुनच त्या मुंडूच आकर्षण कधी कमी होत नाहि. मिनी मॉड स्कर्ट आले आणि गेले...पण मुंडू तो मुंडूच!"
बोलता बोलतामिनू विश्वनाथ जवळ आला. खांद्यावर हात ठेवत त्यानं विचारलं, "विशू, दोस्त, चल येतोस केरळला?"
"चला..."
मिनू खुर्चीवर बसला. रमचा ग्लास उचलत तो म्हणाला, "पण येऊन काय करणार तु? ह्या रारंग ढांगाच ओझ तुझ्या डोक्यावर! आणि त्यापलीकडं स्वत:च्या सात्विकतेचं, सज्जनपणाचं ओझ! ते विसरायला जमायच नाहि तुला!"
मिनूनं ग्लास अर्धाधिक रीकामा केला. धुंद डोळ्यांनी विश्वनाथकडे पाहत त्यानं विचारलं -
"दोस्ता, खर सांग, कधी वडिल माणासांचा डोळाअ चुकवुन सिगरेट ओढलीस?"
"नाहि!"
एकदा तरी ड्रिंक घेतलस, किमान बिअर तरी?"
"नाहि."
"कुणाच्या मिठीत, काळ्याभोर केसांच्या धुंद वासात स्वत:ला हरवुन गेलायस?"
"नाहि."
"लाल-गुलाबी, नाजुक ओलसर ओठांचा हलकेच मुका घेतलायस?....नाहि? बर, निदान कधी कुणावर तुझ्यासारख्या पथ्यकारक प्रकृतिला मानवेल असं प्लॅटॅनिक प्रेम तरी केलयस?"
"अद्याप तरी नाहि."
"मग शहाण्याऽऽ ती उमा कोण???"
ह्या एकदम अनपेक्षीत प्रश्नानं विश्वनाथ चक्रावलाच. आजच आलेलं उमाच पत्र त्याच्या शर्टाच्या खिशात होतं. ते पाहिलं कि काय ह्याने?
चाचरत त्यानं प्रश्न केला - "कोण उमा??"
"तुला माहित नाहि उमा कोण ते? ठिक आहे! मी सांगतो, जे. जे. स्कूल ऑफ आर्टची विद्यार्थीनी. गोरीपान, गुलाबी कांतीची, लाजर्‍या डोळ्यांची! माहित नाहि तुला?"
विश्वनाथ पार गडबडुन गेला. "खरच तुमची नी तिची ओळख आहे?"
मिनू हसला आणि म्हणाला "मुंबईतली कोणती मुलगी आहे, जी दिसायला सुरेख आले आणि मला माहित नाहि?" बोल, आणखि तिची काय माहिती पाहिजे तुला?
ह्या प्लेबॉय पारश्याची आणि तिची ओळख कशी? हे कोडं विश्वनाथला सुटेना. मनात प्रश्न अनेक पण बाहेर एकहि येईना. त्याच्या मनातल बरोबर ओळखल्या सारख मिनू म्हणाला -
"तिची माझ्याशी ओळेख कुठे झाली, कशी झाली, ऐकायचय? - तिची माझी ओळख काल झाली. इथं हिमालयात झाली."
"म्हणजे?"
"ए चक्कर, तुझ्या खोलीत त्या चित्राखाली ठणठणीत अक्षरात लिहिलय - ’उमा’."
"म्हणजे गोरीपान, लाजरी......"
"ज्यांच्या प्रेमात तुझ्यासारखे भाबडे तरुण पडातात अशा नव्वद टक्के मुली गोर्‍यापान असतात, लाजर्‍या असतात, पण त्यांचे डोळे मोठे बोलके असतात. आणि ह्यापैकी काहिही नसल्या तरी तुझ्या सारख्यांना निदान त्या तशा वाटतात. हे तसं वाटण म्हणाजे प्रेमाच पहिलं लक्षण आहे."
"पण मी कुठ सांगितलं कि मी तिच्या प्रेमात पडलो आहे?"
"पडला नसलास अद्याप तर मग पड! आणि काय रे? तिच्या प्रेमात पडला नसतास तर ते समुद्राच चित्र कशाला आणालस? सत्यसाईबाबाचं आणायच होतस!"
"ते चित्र चांगल आहे!"
त्यापेक्षा ते तिने काढलय हे खर कारण आहे. तुला पटायच नाहि. अस कर उठ इथुन. ती क्वीन्सची बाटली घेऊन ये. अख्खी पाजतो तुला ती पोटात गेली कि तुझ्या तोंडुन जे मनाच्या तळाशी असेल ते बाहेर येईल ते तुला ऐकवतो. तुझा स्वत:चाच तुला परीचय होईल!"
मिनू नशेतहि फार मोहक मिस्किल हसला.
"तू असं कर त्या क्वीन्स च्या बाटलीतली दारु बाहेर ओतुन टाक. स्वच्छ पाणी भर आणि त्यात मनी प्लॅंट किंवा एखादं फुलझाड लाव.अन त्या हिरव्या पानाकडं किंवा एखद्या कळी कडे कौतुकान बघत बैस. तेव्हढच तुला झेपेल. कारण प्रेमाला सामोर जायला मोठ धैर्य लागतं. प्रीतीची बेहोशी अनुभवायला दिल लागतो दोस्त! तो असता तर तर पहिल्या रात्री मी सांगितल होतं ना, डिटॅचमेंट थ्री मधली तुझी खोली हि मधुचंद्र साजरा करायला योग्य जागा आहे हे तु उमाला लिहिल असतस आणि विचारलं असतस "येतेस का? मी वाट पाहतो आहे!" दोस्त तुझ्या त्या दोन ओळींच्या पत्रावर तिनं आयुष्य झुगारुन दिलं असतं."

Tuesday, July 15, 2008

पोटा कडुन PETA कडे .........

People for the Ethical Treatment of Animals (PETA) हि संस्था मुक्या प्राण्यांच्या छळा विरुध्द आवाज उठविते. त्यात मांसाहार करु नका, प्राणीजन्य सौंदर्य साधने वापरु नका हे आणि असे अजुन बरेच मुद्दे ते लोकांसमोर मांडतात. मांसाहार करावा कि नाहि हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तसेच एखाद्या जातीने मांसाहार करावा किंवा करु नये यावरहि माझे काहि म्हणणे नाहि. मी स्वत: शाकाहारी आहे(खरंतर मी अंड खातो, पण गेल्या वर्षी ट्रेकला मोजुन १ अंड खाल्ल होतं, त्या आधी जवळपास २-३ वर्ष तेहि खाल्ल्याचं मला आठवत नाहि.)


मांसाहार न करण्याची माझी कारणे -

१)फक्त माझ्या जीभेला चांगलं लागतं म्हणुन हाल-हाल करुन एखाद्याचा जीव घेणं मला पटत नाहि.

२)वरील वाक्यावर काहि "विद्वान" म्हणतात मग झाडांना जीव नसतो का? पण त्यात फारसे तथ्य नाहि, कारण झाड(धान्ये,पाला,फळे etc.) परत उगवु शकते. मुठभर गव्हापासुन किलोभर गहु सहज परत मिळु शकतो. किंवा साधी कोथींबिर जरी बाजारातुन आणली आणि एखाद्या भांड्यात पाणी भरुन ठेवली तर हिरवीगार राहु शकते. फाळातल्या बी पासुन शेकडो फळे देणारे नविन झाड उगवु शकते. कोंबडि किंवा बकरीचा एक पाय तोडुन तिला बाजुला ठेवली तर तिथे दुसर पाय़ फ़ुटणार आहे का? किंवा कोंबडिचं पिस खुराड्यात ठेवले तर नविन कोंबडि मिळणार आहे का? म्हणुनच व्हेज अन्नात हिंसा कमी असते. आणि निर्मीती जास्त असते. अगदी काहि रोगांवर देखिल गव्हचे सत्व वापरतात.

३)तुम्ही ज्या क्षणी प्राणी/पक्षी मारता त्या क्षणी "विघटन" सुरु होते. विघटन म्हणजे कुजणे-सडणे. आता विघटन हि फारच नैसर्गीक क्रीया आहे. काहिवेळा तर ’-५’ टेंप्रेचर मध्ये देखिल अतिशय संथ पध्दतीने विघटन चालु असतेच असते. ’-५’ मध्ये जगु शकणारे जंतु असतात. त्यामुळे ते सुगुना चिकन असो किंवा दुर्गुना चिकन असो, स्वच्छ वगैरे असत नाहि. तसे भाजीचे नसते. भाजी जोवर सतत ओली होत नाहि तोवर कुजत नाहि. म्हणजे भाजी जास्त स्वच्छ राहु शकते.

४)मासे कोणी २ दिवस एखाद्या खोलीत उघड्यावर ठेवले आहेत का(वाळवलेले किंवा सुकट/ड म्हणत नाहिये)? किंवा कोणी ठेवेल का? नाहि ना? आम्ही कोबी, मेथी, सीमला मिर्ची ४ दिवस ठेवतो. आणि त्याचा वासहि येत नाहि. कदाचित ती सुकतील पण त्यांच्या वासाने घरात थांबवत नाहिये असं कधी होत नाहि(भाजी "कुजली तर? चा प्रश्न वेगळा आहे, खोलीत ठेवलेली भाजी जर पातळ कपड्याने झाकुन ठेवली(जेणेकरुन स्वच्छ राहिल पण दमट होणार नाहि) तर भाजी ४-५ दिवस सहज टिकते.)

५)मांसाला स्वत:ची अशी फारच कमी चव असते. म्हणजे कोंबडि आणि बदक किंवा बोकड आणि ससा यांच्या मांसात चव वेगळी असेलहि, असायलाहि हवी(नाहितर फायदा काय?) ते चावण्यासाठि देखिल वेगळे कष्ट घ्यावे लागत असतील(मऊ/वातड). पण "बघा कोंबडी कशी तिखट आहे आणि बदक असे आंबट आहे, मात्र अजुन थोडे मोठे झाले असते तर मात्र गोड लागले असत हं!" असे कोणीहि मांसाहारी म्हणु शकत नाहि. व्हेज वाले हे नक्किच म्हणु शकतात.

६)वनस्पतींना खाउन "प्लांट-गुनिया" होत नाहि . काहि वनस्पती विषारी असतात पण त्यांचा वापर आपण भाजीत करतच नाहि. हांऽऽ आता मी धोतर्‍याचेच बी खाणार असं कोणी म्हणालं तर मात्र काहि इलाज नाहि.

७)कढिपत्ता जरी सुकला तरी त्याला १० मिनिटे पाण्यात टाकले कि परत हिरवट होतो, बरं चवहि तीच राहते. मांसाहाराचं असं असतं का?

८)कच्च मांस तुम्ही खाऊ शकता का?(खाऊन दाखवु का? हा मुद्दा नाहिये मी म्हणिन तेव्हा आणि ते खायच मग बड्याचं आणि छोट्याच हा फरक नकोय) पण आम्ही कच्चे कोबी, सिमला मिर्ची, खातो. आजकाल तर चायनीज मध्ये या कच्च्या भाज्यां शिवाय पानहि हलत नाहि.

९)मांसाहारात किती प्रकारच्या चवी देउ शकता? गोड मासे, तुरट कोंबडि आणि कडु बोकड असे कोणी ऐकले अथवा खाल्ले आहे का? नाहि ना? आम्ही मात्र देऊ/खाऊ शकतो.

१०)जेव्हा मांसाहारात variety असते लोकं म्हणतात तेव्हा, शाकाहारात त्याच्या १०० पट जास्त variety आहे हे विसरतात का? इतकिच चव डेव्हलप करायची असेल तर व्हेज पदार्थ जगातल्या सगळ्या चवी देऊ शकतात.
गोड(साखर-गुळ-फळे), आंबट(आमचुर, आमसुल, लिंबु), तिखट(अर्थात मीरची), तुरट(आवळ्याचे लोणचे,/ढेणसे(टॉमेटो सारखा प्रकार)), कडु(कारले,मेथी), जळजळीत(लवंग, काळी मिरी), पांचट(गवार, भोपळा), जळकट(बटाट्याच्या भाजीची खरपुंडि), उग्र(लसुण, कांदा), खरपुस वगैरे वगैरे. या शिवाय - कोबी, कोथिंबीर,शेपुची भाजी या कोणत्या चवीत बसतात हा संशोधनाचा मुद्दा आहे(आणि ते संशोधन दुसर्‍याने करावे, मला भोपळा आणि या तीन गोष्टि अज्जिबात आवडत नाहित!! )
तिखट, जळजळित किंवा जळकट चवी शि्वाय अजुन कोणत्या चवी मांसाहार देऊ शकतो?????



सांगण्याचा मुद्दा इतकाच. आपल्या एखाद्या रविवारची सुट्टि एखाद्या कोंबडिची कायमची सुट्टि तर करत नाहि ना? याचा विचार व्हावा.

Tuesday, July 1, 2008

सप्तर्षि

सरनौबत प्रतापराव गुजरांनी शरण आलेल्या बहलोलखान पठाणाला धर्मवाट दिली. महाराजांना ही बातमी समजताच. त्यांनी टाकोटाक सरनौबतांना पत्र लिहीले - "स्वत:ला सरनौबत म्हणवता? तुम्ही तो केवळ शिपाईगिरीच केली! बहलोल इतुका बहुत वळवळ करीत आहे, त्यांस मारुनी फ़त्ते करणे अन्यथा आम्हांस तोंड न दाखविणे!". तीच चिड मस्तकात घेउन सरनौबत प्रतापराव गुजरांनी नेसरी येथे अवघ्या सहा अंगरक्षकांसहीत बहलोलखान पठाणाच्या फ़ौजेवर हल्ला चढवला आणि अजुन एक खिंड पावन झाली.





काय घडविले? कसे म्हणावे सेनापती सुजाण?
कुणा विचरुनी दिला सोडुनि, खासा बहलोल पठाण? -१

पुनश्च अडवा, धुळीस मिळवा, प्रयत्ने भगिरथ करुनी.
तोवर अमान्य असें अम्हांसी, बघणे तव मुख फ़िरुनी. -२

शब्द नव्हे ते कट्यार फ़िरली, उभी काळजा वरती.
गळुन पडला खलिता खाली, नयनांत आसवे भरती -३

रक्त तापले, श्वासागणिक फ़ुलु लागली छाती.
मांड टाकली घोड्यावरती, उडु लागली माती. -४

सात अश्व चौखुर उधळले, तडीताघातासाठी.
म्यानातुनी जणु वीज घेतली, ढाल घेतली पाठी. -५

पठाण दिसता वेग वाढला, ढळुन गेला तोल.
पतंग येता अग्निवरती, खुशीत ये बहलोल. -६

अरीसेनेसी छेदत सुटले, सात शिवाचे बाण.
छातीवरती घाव झेलले, अखेर सुटले प्राण -७

सप्तदलांचे बिल्वपत्र ते, पायी शिवाच्या पडले.
श्वास रोखुनी धरती सारे, आक्रितची हे घडले. -८

बेभान होउनी लढले-पडले, वीर मराठी सात.
तम छेदूनी उर्ध्व दिशेला, झाले सप्तर्षि नभात. -९


- © सौरभ वैशंपायन(मुंबई).

Monday, June 23, 2008

"ग-म-भ-न"




व्हाईटनी ब्राऊन यांचे एक वाक्य आहे - "Our bombs are smarter than the average high school student. At least they can find Kuwait." त्यामागचे संदर्भ घेण्यापेक्षा त्यामागची वस्तुस्थिती लक्षात घेणे इथे महत्वाचे आहे. पु.लं. देखिल ’बिगरी ते मॅट्रिक’ मध्ये म्हणतात - "माझ्या बिगरी पासुन ते मॅट्रिक पर्यंतच्या शिक्षणाला "खडतर" या खेरीज दुसरा शब्द नाहिये!!"(महान माणसांची मते बर्‍याचदा जुळतात, म्हणुन कदाचित मला यांची मते पटत असावित.)असो, गिरीशने मला कॉल करुन विचारले "मी आत्ता "ग-म-भ-न" ची तिकिटे काढतोय येणार का?" नाटकाची आधी बरीच स्तुती आधीच ऐकली होती. शिवाय "श्री. मिलिंद बोकिल" यांच्या "शाळा" या कादंबरी वरुन हे नाटक बसवले आहे,असं ऐकुन होतो. मी स्वत: अजुन तरी ती वाचली नाहिये. पण तिच्याबद्दल खुप ऐकले आहे. म्हणुन त्याला हो काढ कि! म्हणुन मंजुरी दिली. "सुहास शिरवळकरांच्या" कॉलेज लाईफवरची "दुनियादारी" सारखिच हि कादंबरी गाजते आहे. शिरवळकरांची त्यात बर्‍यापैकी शिवराळ आहे पण ते वाचताना देखिल ऑड वाटत नाहि. उलट ती भाषा नसती तर वाचताना खटकलं असतं. तसच काहिसं "ग-म-भ-न" बघताना वाटतं.

नाटकाची "खरी" सुरुवात हि १० मिनिटांनंतर "भ"च्या बाराखडितील शिवी ने झालीये. त्याक्षणी क्षणभर "हांऽऽऽऽऽऽ! हेच ते! हेच ते! जे शोधत होतो. उगिच काहितरी सुविचार कोंबुन शाळा उभी करायची आणि मग त्याचा कोंडवाडा बनवायचं थांबवा आत!" असं वाटुन गेलं. तिथुन नाटकाने जी काहि पकड घेतली आहे ती शेवट्पर्यंत. अगदी शेवटी अर्रर्रर्र संपलं??? असं होतं. नाटक पुढे चालुच रहावं असं वाटत असताना थांबणं हिच त्या नाटकची ताकद असते. "ग-म-भ-न" मधील सगळ्यांनी ते नाटक इतकं उत्तम वठवलय, कि नाटकाची गती कुठे कमी पडत नाहि, कुठे बोअर होत नाहि. उलट काहि "पंच" असे आहेत कि टाळ्या मोठ्या मुश्किलीने थांबतात.

मी काहि नाटकचे परीक्षण लिहित नाहिये(मला कुठे त्याचे पैसे मिळतात??) किंवा नाटकाची स्टोरी देखिल मी इथे सांगणार नाहिये, प्रत्यक्षात जाऊन बघा. पण त्यातले प्रत्येक कॅरेक्टर हे आपल्या शालेय जीवनात येउन गेले आहेत हि जाणीव आपल्याला प्रत्येक वेळी होत राहते. बर्‍याचदा स्टेज वर आपणच उभे राहतो. अरे आपण देखिल हेच करायचो याऽऽऽऽर. मुलींची टिंगल, आचरट कमेंटस पास करणं, शिक्षकांवर राग काढणं, मारामार्‍या, शिवीगाळ, "अवांतर" वाचनाची पुस्तकं त्यांच्यावर तुटुन पडणं, मग ती पुस्तके कोणाच्या घरी सुरक्षीत राहतील? कोणाकडे पकडली जातील? यावर गंभीर चर्चा. सगळं-सगळं जसं च्या तसं डोळ्यासमोर उभे राहिले. माझी शाळा कर्जत मधील अभिनव ज्ञान मंदिर. मुला-मुलिंची शाळा आठवीपर्यंत वेगवेगळ्या वेळी. मात्र नववी-दहावी मुला-मुलींची शाळा एकाच वेळी पण वर्ग वेगवेगळे अशी व्यवस्था होती. त्यामुळे एकत्र शिकण्याची "संधी" मिळाली नाहि. पण गणित-विज्ञान-संस्कृत चा क्लास एकत्रच असायचा. मग प्रत्येकाची "लाईन" ठरलेली. एखादि सुंदर मुलगी असेल तर चार जणांच लक्ष तीच्यावरच खिळलेलं. तिच्या येण्या-जाण्याच्या वाटेवर मित्रांसाठि लावलेलं सेटिंग, अतिशाहण्या मुलिंवरचा राग त्यांना क्लास मध्ये त्रास देउन काढणे. "ग-म-भ-न" बघताना सगळं कसं डोळ्यासमोर उभं राहत होतं. मी तसा सभ्य(दिसायला म्हणतोय मी) आणि अभ्यासात बरा विद्यार्थी होतो, त्यामुळे शिक्षक वगैरे चटकन माझ्या वाटेला जात नसत. मग आचरटपणा करुन नामानिराळे राहणे मला फारसे जड जात नसे. शिवाय नववीत असताना शाळेसाठि "अणुस्फोट" हा विषय घेऊन मी जिल्हा पातळीपर्यंत धडक मारली होती, त्यामुळे मी सगळ्या शाळेत "scientist" नावाने प्रसिध्द होतो. आणि इथे "ग-म-भ-न" मध्ये देखिल एक scientist आहे चित्रे म्हणुन. खरं सांगतोय नाटक बघुन आलो आणि रात्री २ वाजेपर्यंत अख्खि शाळा डोळ्यांसमोर नाचत होती. शाळेचे ते ३ जिने, शाळाभरल्यावर एकाचा दुसर्‍याशी न जुळाणारा सुर लावुन म्हंटलेली प्रार्थना, प्रार्थना म्हणताना सुध्दा एकमेकांना हळुच मारलेल्या लाथा आणि टपल्या, कंटाळावाण्या विषयांच्या तासाला खिडकितुन दिसणारे शाळेचे मागचे मोठ्ठे मैदान, त्यावर पावसाळ्यातला फुटबॉल, N.C.C., M.C.C., स्काऊट. मग परेड करताना चुकले कि उघड्या पोटरीवर बसणारे केनचे फटके. त्याचे कॅंप-शाळेची सहल. जाताना म्हंटलेली गाणी. गॅदरींग मधे व्हॉलेंटिअर होऊन भाव खाणे. व्हॉलेंटिअर बनल्यावर मिळाणारा(ढापला जाणारा) श्रमपरीहार-फराळ मग अश्या निमित्तांनी रविवारी देखिल शाळेत जाउन शाळेची सजावट. सगळी व्यवस्था. एरवी कोणी स्टाफरुम मध्ये जात नसे त्या दिवसांत कोणाचीहि परमिशन न घेता अख्खि स्टाफरुम आंदण दिल्या सारखि वापरणे आणि दुसर्‍या दिवशी अरे स्टाफ रुम मध्ये तंगड्या वर करुन बसलो होतो! हे वाढवुन सांगणे. असं सगळ सगळ डोळ्यासमोर नाचायला लागलं. शिवाय नावडत्या शिक्षकांना बॉम्ब ने उडवायचे विचार सगळेच करतात हे "ग-म-भ-न" बघताना प्रकर्षाने जाणवलं आणि त्याचा आनंदच झाला. शिवाय मित्राला किंवा "तिला" एखादा शिक्षक मारत असला कि त्याचा येणारा राग. मित्राच्या वाटचे आपण खाल्लेले फटके. सगळं सगळं आठवलं.

मध्ये मी "तोत्तोचान" हे एका जपान मधल्या मुलीवरचे छोटेसे पुस्तक वाचले. ती मुलगी मुक्त-शाळेत जात असते. म्हणजे झाडाखालची शाळा. तिथे तुम्हाला आवडणार्‍या गोष्टि करायच्या. कोणी ओरडणार नाहि. निळ्या रंगाचे झाड आणि हिरव्या रंगाचे आकाश काढले तरी कोणी रागावणार नाहि. मुलं-मुली एकत्र शिकणार, एकत्र खाऊ खाणार. पुस्तक वाचताना गुरुदेवांच्या "शांतीनिकेतनची" आठवण झाली. टागोर मुलांची होणारी घुसमट समजुन होते, म्हणुनच त्यांनी शांतीनिकेतनची स्थापना केली. आम्हाला अशी शाळा नाहिच मिळाली. पु.लं. म्हणातात तसे "गप्प बसा!" संस्कृतीत आम्हि वाढलो-शिकलो-मोठे झालो. काहि जण शाळा सोडुन गेले. आजहि मी अक्षय कुलकर्णीला सगळीकडे शोधतोय, त्याचे बाबा जज होते. त्यांची बदली झाली आणि पत्ता न देता-घेताच एके दिवशी तो निघुन गेला. मी देखिल मुंबईला आलो. सगळं सुटत गेलं. काहि मित्र-मैत्रीणी आहेत अजुन कॉन्टॅक्ट मध्ये अजुनहि जमलो कि जुने विषय निघतात. मग ग्रुप मधली भांडणं, रुसवे-फुगवे, परत एकत्र येणं. शाळेतली ह्याची-त्याची "लाईन" यांची आठवण काढुन आपण किती बालिश होतो म्हणुन आम्हि आता पोटभर हसुन घेतो. पण आज मी शाळेला खुप miss करतोय. पण त्या अडिच-तीन तासात "ग-म-भ-न" ने मला माझी शाळा मिळवुन दिली त्या बद्दल "ग-म-भ-न" च्या अख्ख्या टिमला थॅंक्स. शाळेच्या आठवणीने पोटभर हसता-हसता प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडेवर नकळत जमा झालेलं थेंबभर पाणी हिच "ग-म-भ-न" ची खरी कमाई आहे.


-सौरभ वैशंपायन.

Monday, June 16, 2008

पहाट

पहाटेचा गार वारा, चांदण्याहि उठुन गेल्या,
जवळ घेताच तु मला, पापण्या अलगद मिटुन गेल्या. - १

संथ लयीतले तुझे श्वास, सुरासारखे फिरु लागले,
अन दुणावलेले श्वास माझे, त्यामध्येच विरु लागले. - २

मोहरल्या गात्रांमधुनी, थरथरे अजुन उरली रात,
अजुन अन घुमतात, गुज तुझे कानात. - ३

आताशा जराशी सैल, मजभोवती रेशीमगाठ,
त्यातच गुंतत होतो, इतक्यात झाली पहाट. - ४


- सौरभ वैशंपायन.

Saturday, May 24, 2008

पाऊलखुणा.......

मे महिन्याच्या दिवसात, दुपारी जेवणात मोठ्ठ्या वाटित आमरस घ्यावा त्यात २ चमचे तुप सोडावे व तो ओरपावा, अशा साधारण ४ वाट्या पोटात गेल्या कि मग झकास अंधार होईल अश्या दारे-खिडक्या लावाव्यात. एक उशी जमिनीवर टाकावी. पंखा फुल्ल स्पिडवर करुन त्याखाली प्रफुल्ल मनाने आडवं व्हावं, म्हणजे खरंतर टेबलवर ’डिसेक्शनला’ आलेल्या बेडकासारखं तंगड्या ताणुन झोप घ्यायची, यासारखं सुख दुसरं नाहि. निदान मे महिन्याच्या टळटळित दुपारी तरी हि सुखाची इतपत हिरवळ देखिल खुप होते! पण सुख बोचतं-बोचतं म्हणातात तसं काहिसं होऊन, घराच्या बाहेर सोडुन द्या, मी प्रत्यक्ष मुंबई बाहेर निघालो. मी-मिनल आणि अमित. व्याघ्र-गणनेसाठी कोयना धरणाजवळ. मुंबई-परळहुन रात्री १०:३०ला सातार्‍यासाठि निघालो. सकाळि ०४:४५ ला सातारा. गाडित अर्थात सुखाची झोप मिळालीच नाहि. परत कोयनानगरकडे जाणारी गाडि कधी?? यावर उत्तर मिळालं ०७:१५ म्हणजे किमान २ तास तरी "हरी-हरी". पण शेवटि थोडं फ्रेश होऊन सातारा S.T. कॅन्टिन मध्येच २ मिसळ/शिरा/उपिट आणि चहा हाणंल आणि गाडिची वाट बघत बसलो. शेवटि साधारण ०६:५०ला सातारा-रत्नागिरी गाडि लागली. हि कोयनानगरमार्गे जाते. त्याच गाडित बसलो. धावाधाव करुन जी जागा मिळवली होती ते आरक्षित होती - बोंबला!! पण ’जिसका कोई नहि होता उसका खुदा होता है!’ गाडित पाठिमागे आम्हाला ३ जागा मिळाल्याच ते देखिल पुढिल अडिच तास. आमच्याच शेजारी पंडित नावाचे गृहस्थ होते तेहि आमच्यासारखेच Tiger Census साठि जात होते. हळु हळु गप्पांचा ओघ व्यंकटेश माडगुळकर-चित्तमपल्ली-गो.नि.दां. कडे वळला आणि मग आमच्या बाजुच्या सीट्वरुन एक मध्यम वयाचे गृहस्थ नाटकात संवाद म्हणत-म्हणत रंगमंचावर येतात तसे आमच्यात घुसले. आणि मग पुढले दिड तास ते किर्तन करत होते आणि आम्ही श्रवणभक्ती. त्यांना रत्नागिरीला उतरायचे होते म्हणुन त्यांच्याकडे आमच्यापेक्षा मोप वेळ होता. त्यांच बोलण चालु असताना मध्ये वाटायच कि आम्ही वाचलेल्या पुस्तकांची यादि त्यांना द्यावी निदान त्याने तरी ते गप्प बसतील. शेवटि कोणत्यातरी थांब्यावर ते चहा पिऊन आले, तदनंतर वर्तमानपत्रात डोकं खुपसलं म्हणुन निभावलं. अखेर कोयनानगरला पोहोचलो. गाडितुन उतरल्यावर एक व्यक्ती अमितपाशी आली आणि "Tiger Census" साठि आलात का? वगैरे विचारु लागले. तेहि त्याचसाठि आले होते, त्यांच आड्नाव डोईफोडे होतं. त्यांच्याबरोबर चिपळुणचे दोघेजण होते - दिक्षीत आणि काणे. त्यांच्याशी ओळख करुन घेतली. परत थोडं खाऊन आम्ही वन अधिकार्‍यांच्या कार्यालयाकडे कुच केले. ’मोहितेसाहेब’ आत आलेल्यांची नावे नोंदवुन घेत होते. अमीतला बघताच त्यांनी ’या मेंगळे’ करुन आत बोलावुन घेतलं. अमीत सलग चौथ्यावर्षी येत असल्यानं त्याला ते ओळखत होते. आम्हाला नंतर वाघाचे ठसे कसे घ्यायचे? कसे मोजायचे? ते कागदावर कसे उतरवायचे आणि सरते शेवटी त्यांचा साचा कसा तयार करायचा याची सीडीच दाखवली. सीडी दाखावल्या नंतर आम्हाला मागच्या अंगणात नेले तिथे कोयनानगरचे प्रमुख अधिकारी नाईक साहेब बसले होते. त्यांनी माहिती द्यायला सुरुवात केली - "जंगलात सिगारेट, दारु, तंबाखु, बिडी, गुटखे हे प्रकार चालणार नाहित. जंगलातुन तुम्हाला काहिहि बाहेर नेता येणार नाहि, २५००० रु. चा दंड होईल तो वेगळाच. जंगलातल्या प्रत्येक काडिवर फक्त जंगलाचाच हक्क आहे. तुमचे ग्रुप लिडर जसे सांगतील तसेच वागा. स्वत:ची अक्कल लावु नका. एकटे-दुकटे विनाकारण झाडि-फांदितुन फिरु नका. वाघ-बिबट तुमची चाहुल लागताच लपतील, पण चुकुन अस्वल समोर आले तर मोजुन मिनीट्भरात तुमच्या बरगड्या मांसातुन मोकळ्या करेल. ते खाणार नाहि तुम्हाला, मात्र चोथा बनवुन फेकुन देईल. म्हणुन प्राण्यांना त्रास होईल असे वागु नका. तुम्ही पाहुणे आहात ते मालक आहेत, पाहुण्यांसारखेच वागा. तुम्हाला वाघाचे आणि बिबट्याचे ठसे मिळवायचे आहेत. आत्ता आत जसं दाखवलय तसे त्याचे साचे बनवायचे आहेत. कदाचित दोन वेगवेगळ्या खोर्‍यातल्या ग्रुप्सना एकाच वाघाचे ठसे मिळतील, काहि प्रॉब्लेम नाहि उलट आपल्याला वाघाचे क्षेत्र समजेल. आणि ज्यांच नशीब असेल त्यांनाच वाघ बघायला मिळेल. मी गेली ३२ वर्ष सर्विस करतोय महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जंगलात पण मला फक्त ३ वेळाच समोरा-समोर वाघ दिसलाय. फार बुझरं जनावर आहे ते. घाबरत नाहि पण समोर यायला लाजतं. म्हणून काळाजी घ्या परफ्युम्स-डिओ असल्या गोष्टि जवळ बाळागु देखिल नका, इथेच काढुन ठेवा. जंगल हे परफ्युम लावुन फिरण्याचं ठिकाण नव्हे. तुमचाच वास प्राण्यांना १-२ km पर्यंत सहज समजतो, त्यातुन डिओ वापरलेत तर जनावर दिसणं देखिल मुष्किल होईल. वाघ सोडाच दुसरा कोणताहि प्राणी देखिल दिसणार नाहि. आणि महत्वाची गोष्ट - झुंगटि, मालदेव, पाली, आणि बामणोली या ४ ठिकाणी वाघाचा ठसा मिळायलाच पाहिजे!!! ४६४ रनिंग km. च्या जंगलातुन तुम्हाला हे सगळं शोधायचं आहे. मेहनत घ्या नक्कि ठसा-विष्ठा मिळेल, किंवा म्हणालो तस नशीब असेल तर वाघ-बिबटहि बघायला मिळेल. आता इतर महत्वाच्या सुचना - कोणाला काहि गंभीर आजार? त्याची औषधे? सगळं व्यवस्थित आहे ना? कारण देव न करो पण कोणाला काहि झालेच तर तुमच्या मदतीसाठि यायला आम्हाला किमान ३ तास आणि परतीच्या प्रवासाला ३ तास असे ६-७ तास कोयनानगरला पोहोचायला लागतील. कोणाला दमा-ब्लड्प्रेशर असे त्रास असतील तर त्यांनी आत्ताच सांगा. त्यांना फिरण्या ऐवजी तितकेच दुसरे महत्वाचे काम देऊ! नंतर तुम्हा-आम्हाला त्रास नको. शिवाय आता रेडिओ-गाणी ८ दिवस विसरा, जंगलात मोठ्याने बोलायचे-हसायचे नाहि. कोणी इथे पिकनिक किंवा ट्रेकसाठि आलेलं नाहिये. हिमालयात ट्रेक केला याची मिजास इथे नकोय, इथल्या दगड-माती समोर टिकाव लागेल याशी शाश्वती नाहि. असो All the best!!" आमच्या ७०-७५ जणांचे छोटे ग्रुप करुन कोयनेच्या वेगवेगळ्या खोर्‍यातले विभाग वाटुन दिले. आम्हाला "झुंगटि" विभाग आला होता. आमच्या तिघांबरोबर तेजस डांगरे हा चौथा भिडु देखिल दिला. शिवाय अभयारण्याची माहिती असलेला माहितगार माणुस आम्हा प्रत्येक ग्रुपला दिला. आमच्या ग्रुपचे लिडर होते - "बापू गुरव" पण ते कोयना नगरला आले नव्हते. ते आम्हाला लॉंच मधुन जाताना अवसारी सब-स्टेशनला भेटणार होते. यानंतर सगळे जेवायला पांगले. आम्हाला उन्हात चालत जाऊन हॉटेलमध्ये जायचा कंटाळा आला होता. म्हणुन मिनलने आणलेले ४-४ ठेपलेच आम्ही घश्याखाली उतरवले आणि गप-गुमान लॉंचकडे घेऊन जाणार्‍या जीपची वाट बघत बसलो. जवळपास दिड-दोन तास वाट बघावि लागली. मधल्या वेळेत आम्हाला एक काच, स्केच-पेन,मोठ्ठा प्लास्टिक मग, ट्रेसिंग पेपर्स, प्लॅस्टर ऑफ पॅरीसआणि ७-८ किलोचा तांदुळ-तेल-मसाले असा शिधा दिला. आधीच आमच्याकडे सामान भरपूर त्यातुन काच आणि बरोबर ८ किलोचा शिधा. बर!!तो शिजवणार कशात हा आमच्या पुढिल यक्षप्रश्न होता, कारण आम्हि बरोबर भांडि आणलि नव्हती. पण मग मोहिते साहेबांनी अवसारी स्टेशनला नोरोप ठेवला कि बापू गुरवांबरोबर २ भांडि-पातेलि पाठवा. अखेर दोन तास उन्हात तिष्ठत काढल्या नंतर एक जीप्सी-जीप आली आणि म्हणता-म्हणता भरली देखिल. मला आणि तेजसला मागे लटकुन उभ रहावं लागलं. ५ मिनीटांचा वळण-वाटांचा रस्ता संपवुन "कोयना धरण" अशी पाटि लावलेल्या महाद्वारातुन आत गेलो. आत शिरताच उजव्या हाताला प्रचंड मोठ्ठे धरण आणि डावीकडे नजर जाईल तिथपर्यंत पाणीच-पाणी. भणाण वारा सुटला होता. जीप थांबली तिथे समोर थोडं खाली ३-४ लॉंच लाटांवर डुलत होत्या. आम्हाला एका मोठ्या लॉंच मध्ये बसण्यास सांगितले त्यात ऑल्रेडि एक पुण्याचा ग्रुप बसला होता. आम्हि सामान आत टाकुन फतकल मारली. अजुन काहि ग्रुप आले कि निघु हे उत्तर आम्हि जवळपास दिडतास ऐकत होतो. आम्हि बसलेल्या ठिकाणी उन येत होत. अखेर एक-एक ग्रुप येऊ लागला. आम्हि मांडि सोडुन शेवटि फोर्थ सीट वरती आलो. सामान आणि माणसं यांनी लॉंच खच्चुन भरली आणि सरते शेवटि संध्याकाळी ०५:१० ला आम्हि कोयनानगरचा किनारा सोडला. लॉंच पाण्याच्या मध्यभागी आल्यावर कोयनेचं पाणी आमच्या अंगावर उडु लागलं. अर्ध्या तासाने मात्र त्या अवघडुन गेलेल्या लॉंचचा आम्हाला कंटाळा येउ लागला. अधुन-मधुन मिनल-अमीत बरोबर गप्पा चालु होत्या. शिवाय पुण्याच्या त्या ग्रुप मध्ये २ मुली होत्या, त्यातली एक दिसायला चांगली होती! तेव्हढाच कंटाळा कमी करायला तिचा हातभार लागत होता. अखेर तासभर लॉंच गेल्यावर अवसारी आलं. तिथे २ माणसं लॉंच मध्ये चढली. त्यातच आमचे ग्रुप लिडर "बापू गुरव" होते. साधारण साठिकडे झुकणारं वय, बारीकशी पण काटक अंगकाठि, काळा रंग, समोरचा एक दात पडलेला, अर्ध टक्कल आणि उरलेल्या केसांची चांदि झालेली एक मध्यम उंचीची मुर्ती ३-४ पिशव्या आणि खांद्याला बंदुक लावुन लॉंच मधे शिरली. लॉंच मधील गर्दी अजुन वाढली. त्यांनी बरोबर २ पातेली आणली आहेत हे कळल्यावर आमचा जीव त्याच २ भांड्यांमध्ये पडला एकदाचा. त्यापुढे जवळपास दिड-पावणेदोन तास लॉंच चालुच होती. लॉंचची अवस्था "स्वदेस" मधल्या त्या तराफ्या सारखिच झालि होती. अमितचे हे चौथे वर्ष असल्याने आम्हि त्याला त्याचे अनुभव विचारत होतो. अमित सांगत होता - "सर्वात महत्वाची गोष्ट म्हणाजे अर्ज विनंत्या करुन देखिल वर्षभर कोणालाहि आत सोडत नाहित. अशा ठिकाणी आपण ७ दिवस राहणार आहोत. इतक्या कोअर एरियात कोणालाच जाऊ देत नाहित. खुप घनदाट जंगलात आपण जाणार आहोत, जिथे सुर्याचे किरणहि जमिनीला स्पर्ष करु शकत नाहित. माहितगार माणासाशिवाय कोणी आत गेलाच तर वाट मिळणं कठिण आहे." लॉंच थांबली तेव्हा आम्ही ५ जण झुंगटि पश्चिमेला उतरलो. रात्रीचे ८ वाजले होते. अंधाऽऽऽर होता. आकाशात चंद्रकोर होती तितकाच काय तो प्रकाश. आम्हाला भरपुर खडकाळ भागात उतरवुन लॉंच निघाली. लॉंचचा दुर जाणारा आवाज आमचा एकटेपणा वाढवत होता. २-४ मिनीटात लॉंचचा आवाज ऐकु येईनासा झाला आणि रातकिड्यांचा सुरु. नजर चंद्रप्रकाशाला सरावल्याने आता आजुबाजुचं थोडं थोडं दिसु लागलं होतं. तरी बॅटरीच्या प्रकाशात आम्ही आमचं सामान मोठ्या दगडा जवळ रचुन घेतले. खरंतर आमच्या बरोबर मिनल असल्याने आम्हाला सुरक्षीततेच्या दृष्टिने टॉवर दिला होता. पण बापूकाका म्हणाले "समोरच्या झाडितच आहे तो टॉवर, पण रात्री समोरची भुसभुशीत माती चढुन जाणं कठिण आहे! इतकं सामान त्यातुन हि बायडि बरोबर आहे, आज आपण उघड्यावर काढु, फटफटंलं कि जाऊ तिथं!!" तरी डोक्यात प्रश्नचिन्ह घेउन आम्हि त्यांना हो म्हणालो.

कोयनेचा बापू -
बापू गुरव त्या चंद्रप्रकाशात आम्हाला जंगलातले किस्से त्यांच्या गावरान भाषेत सांगत होते - "आमचा जनमच जंगलामधला, रात्री-बेरात्री सुदिक आम्हि इथं उठ-बस करतो. या बापू गुरवाला इथल्या समद्या वाटा माहित हायेत! उन-पाऊस काय पण फरक नाय पडत. जनावराचं पण भय नाय, कमरेला कोयता असला कि झाल. मी आत्ता बंदुक आणलिये पण ती नुसती आवाज करायला. पण त्याची गरजच नाय, माणसाची चाहुन लागली कि जनावर दुर जातं." आम्हि श्रवणभक्ती करतच होतो. ते ऐकता-ऐकता त्यांची तांदुळाची भाकरी आणि चटणी बाहेर आली आणि आमचे ठेपले. बापू चालुच होते "जनावरांत अस्वल लई येडं, खात नाय पण फाडुन टाकतं पाकं(पार)! मागं एकदा ३ बायड्यांना माज्यापाठि जंगल बघायला पाठिवल हुतं, हे दगड दिसतय? तसच गोल दगड होतं, त्यापाठि अस्वल अस्स बसलं हुत! एक बाई ओरडायला लागली पर म्या जरा बाजु-बाजुनं नेलं, ती एकच वाट हुती कारण, अस्वल भी न हलता बसुन र्‍हायल. बघा जनावर केव्हा काय करल न्हाय सांगु शकत!!" मध्येच पाण्याकडे बघुन म्हणाले - "या साली लई पाणे हाय! मागल्या वर्षी नव्हतं, तेव्हा पाणी पाकं खालि गेलतं, मग काय रातभर कधी अस्वलाची चाहुल, कधी बिबट्याची कधी रान डुकराची! यंदा भरपुर पाणी हाय, जनावराला जास्त खाली सरकायची गरज नाय!" जेवण(?) झाल्यावर ते समोरच्या दगडामागे डोकावले आणि "अरे रे! लई चिखल हाय आत. हा दगड आतुन पोकळ हाय! ३ माणुस सहज झोपेल, शिवाय वर भोक पडलय, त्यामुळ कय शिजवलं तर धुर वरती निघुन जातु. पर यंदा साली पाणी भरपुर हाय म्हणून आत चिकल हाय! आता इथचं जरा साफ करुन झोपु, मी अस्सा थोडा वरच्या बाजुला झोपेल!" असं म्हणून ते तिथले गोटे साफ करु लागले. मी-अमित-तेजस त्यांना मदत करु लागलो ५ मिनीटात "झोपणेबल" जागा झाली एकदाची. स्लिपिंगमॅट जोडुन त्यावर चादर पसरली .... गाऽऽर वारा अंगाला झोंबत होता. मोजुन १० फुटांवर पाणी होते. "झोपा बिनधास्त!!" - इति बापू गुरव. त्यांनी त्यांचे अंथरुण पसरले, एक कांबळ घेतली नी आडवे झाले. आम्हाला काय डोंबल झोप लागणार? एकतर पाण्याच्या लाटांनी चुबुक-चुळबुक-चुबुक-चुळबुक असे आवाज येत होते, त्यामुळे सारखं पाण्यावर कोणीतरी जनावर आलयं असंच वाटायचं, मधुनच झुळकिने पाचोळा वाजायचा कि डोळ्यांवर आली-आली म्हणणारी झापडे जायची. शेवटी रात्री १०:३०-११:०० ला झोप लागली असावी. परत थंडिने जाग आली तो या क्षीतीजापासुन त्या क्षीतीजी पावतो सगळं आकाश लाख्खो तार्‍यांनी भरुन गेलं होतं, इतकं सुंदर आकाश मी ७-८ वर्षांपुर्वी भिवपुरीतच बघितलं होतं. घड्याळात बघितलं, साधारण २:३० होत होते. परत थंडि आण सावधपणा यामुळे तासभर त्या चांदण्या मोजण्यात गेला. परत डोळे मिटले. मधेच एक पक्षी आमच्या डोक्याशीच येउन ओरडायला लागला म्हणुन जिला कदाचित झोप म्हणता येईल अशी काहितरी अवस्था देखिल चाळवली गेली - तेजसने मोबाईलवर ०४:३०चा अलार्म लावला होता आणि साहेबांनी पक्ष्याचा आवाज अलार्म म्हणून ठेवला होता, इतके करुन साहेब डाराडुर आणि आम्हि तिघे टकटकित. परत पुढचा तास या कुशीवरुन त्या कुशीवर करण्यात गेला.

दिवस पहिला:
फटफटलं तशी आन्हिकं उरकली. अचानक बापूंनी उजव्या हाताला समोरच्या किनार्‍यावर "गवा!!" असं म्हणतच बोट दाखवलं. सकाळि ०६:१५च्या कोवळ्या किरणात देखिल त्याचे गुडघ्यापासुन खालचे पांढरे पाय समजुन येत होते. गवा "पांढर्‍या पायाचा" असला तरी आमच्या पहिल्या दिवसाची सुरुवात मात्र त्याने चांगली केली होती. मिनलला मी बॅग मधुन दुर्बीण काढुन दिली, पण तोवर गव्याला आमची चाहुल लागली असावी, त्याने परत जंगलाचा रस्ता धरला. साधारण ०७:१५ ला आम्हि कॅमेरा, दुर्बीण गळ्यात आणि पाणी-खाणं असं गरजेपुरतं सामान छोट्या सॅक मध्ये घालुन निघालो. बाकिच सामान त्या जंगलात उघड्यावर टाकुन जाण्यात काहिहि धोका नव्हता. किनार्‍याला धरुनच आम्हि मऊ मातीत प्राण्यांच्या पायाचे ठसे बघत पुढे सरकत होतो. गव्यांचे, अस्वलांचे, रानमांजराचे, साळिंदरांचे झालेच तर टिटवीचे सुध्दा. बापूकाका त्या ठश्यां बद्दल सांगत होते. मग आमच्या पाच जणांत थोडे-थोडे अंतर आपसुकच पडत गेले, आम्हि वेगवेगळ्या ठिकाणी वाघ-बिबट्याचे ठसे शोधु लागलो. मधेच अमितने हलक्या आवाजात इशारा केला. आम्हि जवळ जाताच त्याने हाताने जमिनिकडे बोट दाखवले. मधे बदामासारखि गादि आणि ४ बोटं. बिबट्याचा ठसा होता तो. त्याच्याच आसपास अजुन तसेच ठसे होते. आम्हि त्याचे चारहि पाय मिळतील असे ठसे घेतले, कारण आम्हाला त्याची लांबी काढायची होती. ठसा घेताना फार काळजीपूर्वक घ्यावा लागतो. शिकारी जनावरांच्या मागच्या डाव्या पायाचा ठसा घेतात. ठश्याची लांबी-रुंदि आणि गादि याची मापे घेतात. तर जनावराची लांबी मोजताना पुढच्या पायाची बोटे ते मागच्या पायाची गादि असे अंतर मोजतात. लांबी मोजल्यावर तो बच्चा आहे कि तरुण आहे कि पुर्ण वाढ झालेलं जनावर आहे ते समजतं. पूर्ण वाढ झालेल्या नर बिबट्या हा जास्तीत-जास्त ८० सेंमी पासुन ८५ सेंमीपर्यंत असतो. तर मादि साधारण ७८ सेंमी पासुन ८२ सेंमीपर्यंत असते. शिवाय वाघ-बिबट्या नराची बोटे गोलाकार तर मादिची थोडि लांबुडकि असतात, अर्थात नराचा पंजा हा चौरस तर मादिचा लांबुडका-आयताकृती असतो. आधी आम्हि काच त्या ठश्यावर दोन पट्ट्यांच्या सहय्याने ठेवली. काचेवर स्केचपेनच्या सहाय्याने त्याच्या डाव्या पायाचा ठसा काळजीपूर्वक उतरवुन घेतला, लगोलग त्याला ट्रेसिंगपेपर वर उतरवलं त्याची मोजमापे घेतली. शेवटि त्याभोवती चार पट्ट्या रचुन त्यावर आम्हि PP ओतले आणि साचा घेतला. सकळिच मिळालेल्या बिबट्याच्या ठश्याने आमचा उत्साह द्विगुणित झाला. पुर्ण वाढ झालेल्या बिबट्याचा ठसा होता तो, साधारण ८३ सेंमी होता. बापूंनी पाण्याकडे नजर टाकली - "१७-१८ दिवसांपूर्वीचा असल! पाणी फार दुर नाय!" आमच्या त्या सगळ्या हालचालीमुळे समोरील जंगलातील माकडे सावध झाली आणि त्यांनी ४-६ वेळा मोठ्यांदा "हुप्प-हुप्प" असा कॉल केला. म्हणाजे आता सगळ्या जंगलाला २ पायांचे कोणी संशयित प्राणी त्या भागात आल्याचे समजले होते तर. तो ठसा घेऊन आम्हि पुढे निघालो, डोक्यावरुन २ टिटव्या जीवाच्या आकांताने ओरडात उडत होत्या. बहुदा आम्हि त्यांच्या एरीआत घुसखोरी केली असावी. टिटव्या दगडांमध्येच त्यांछी अंडि घालतात. ती सहजासहजी समजुन येत नाहि. त्यासाठिच त्यांचा सगळा आटापिटा चालला होता. पुढे गेल्यावर एका ठिकाणी भरपुर जांभळाअच्या बीया एकगठ्ठा पडल्या होत्या. बापू म्हणाले -"अस्वलाची विष्ठा", अर्थात आजुबाजुला अस्वलाच्या पाऊलखुणा होत्याच. मधुनच सांबारांचे "फुर्र-फुर्र-फुर्र" असे तर भेकरांचे ’फ्रॅक-फ्रॅक-फ्रॅक-फ्रॅक" असे पोटातुन काढलेले आवाज येत होते. एखादे शेकरु पण मधुनच ओरडत ओरडत होते. विविध पक्ष्यांच्या आवाजाने सगळे रान गजबजले होतेच, पक्ष्यांबद्दल फारसे ज्ञान नसल्याचा किंवा बरोबर कोणी पक्षीतज्ञ नाहि याचे फार वाईट वाटल तेव्हा. मधुनच ६-७ पोपटांचा थवा डोक्यावरुन किनार्‍यापार व्हायचा. चालुन थकल्यावर एके ठिकाणी बसलो होतो डाव्या हाताच्या ओहोळात अमीत उतरुन ठसे शोधत होता. तिथेहि त्याला बिबट्याचे ठसे मिळाले. आणि जवळंच सांबाराची हाडं पण होती. परत येताना समोरुन एक लॉंच येताना दिसली. ती बघुन बापूकाका आम्हाला बसायला सांगुन झपझप खाली उतरले. आम्हि झाडाच्या सावलीत बसुन हलक्या आवाजात चित्तम्पल्ली आणि माडगुळकरांच्या रानकथांबाबत गप्पा मारत होतो. मिनलने कृष्णमेघ कुंते यांचीहि आठवण करुन दिली. या गप्पात वेळ निघुन गेला. नंतर २०-२५ मिनीटांनी आम्हालाहि बापूंनी खाली बोलावले. तिथे आमच्या बरोबरच एक ग्रुप जो झुंगटि पूर्वेला उतरला होता तो जमला होता. त्यांना काय झटाका आला होता माहित नाहि, पण त्यांना पश्चिम झुंगटि पाहिजे होतं. बहुदा आम्हि यायच्या आधी त्यांचा बापूं बरोबर काहितरी वाद झाला होता. पण आम्हाला खाली बोलावल्यावर आम्हि सांगितले - "आमच्या बरोबर मुलगी आहे! टॉवर आम्हालाच पाहिजे! मोहिते साहेबांनीच तिच्यासाठिच टॉवर असलेला झुंगटिचा भाग आम्हाला दिलाय!!" वाद एका वाक्यात खलास. पण तो ग्रुप तिथुन परत गेला नाहि. आम्हि आदली रात्र जिथे काढली होती तिथेच थोडं वर त्यांनी त्यांच बस्तान टाकलं. आम्हि आमच्या कॅम्प वर परत आलो. मी आणि अमितने आमच्या आणि मिनलच्या सॅक टॉवरखाली आणुन टाकल्या. आमच्या त्या ठिकाणा पासुन टॉवर २ मिनीटावर दिसत होता. पण त्या भुसभुशीत मातीतुन वर चढणे जरा त्रासदायक प्रकार होता. उन्हाळ्यात कोयनेचे पाणी कमी होत जाते, ते मागे सरताना लाल मातीच्या पायर्‍याच बनवत जाते. पण त्या कच्च्याच असतात. एका वरुन पाय घसरला की पुढच्या ४ पायर्‍या तुटतात. २ मिनीटावर दिसणारा टॉवर त्या मातीच्या रस्त्यामुळे १० मिनीटावर गेला. शेवटि कसरत करत मिनल, तेजस देखिल वर आले. बापुकाकांना ते नविन नव्हतं ते सराईत पणे वर आले. आमची दुपारच्या जेवणाची सुरुवात झाली. जेवणासाठि समोरच्याच एका झाडाखाली चुल मांडली. मी, अमित आणि तेजस मिळुन कांदे-बटाटे आणि लसुण कापुन मिनलला देत होतो. मिनलने झकासपैकि खिचडि केली, त्या आठ दिवसात मिनल आमची अन्नपुर्णा होती. कापाकापीच आम्हि बघायचो, शिजवायची मात्र तिच. खुप दिवसांनी असं चुलीवरचं खायला मिळालं. चुलीवरच्या जेवणाची चवच छान असते. जेवण झाल्यावर त्याच झाडाच्या सावलीत आम्हि ताणुन दिली. आम्हाला बापुंचा त्यांच्या बरोबर काय वाद झाला ते माहित नाहि, पण पूर्ण दुपारभर बापु बड्बड करत होते. आम्हि दोन्हि ग्रुप एकमेकांना समोरासमोर सहज पाहु शकत होतो. दुपारी साधारण ०४:३० च्या आसपास टॉवर मागच्या जंगलातुन बापू आनंदाने धावत आले - "चला लवकर, तिथं, त्या तिथं, मागं पट्टेर्‍याचा मोठा ठसा हाय!" आम्हि लगबगीनं सगळ ठसा घेणाचे सगळे सामान आणि कॅमेरे उचलले आणि झपाझप त्यांच्या मागुन निघालो. ठश्या शेजारी बसत बापू म्हणाले - "असे या बाजुनी या! बा! बा!! बा!!! कसला पंजा हाये बघा त्यो! पट्टेरीचाच! अजुन कोणाचा??" दुपारी ०४-०४:३० देडिल जंगलात अंधारुन आलं होत. सुर्यास्ताला अजुन २ तास तरी होते. बाकि जाऊ दे, आम्हाला आमच्या पासुन २५०-३०० फुटांवर सुर्यकिरणे पसरलेली दिसत होती. पण आमच्या आजुबाजुला इतकि दाट झाडे-झुडुपे होती कि एकहि कवडसा आमच्या आसपास पडत नव्हता. आम्हि फोटो काढायचा प्रयत्न करत होतो. त्या अंधार्‍या जागेत नीट फोटो येत नव्हता, फ्लॅश वापरला कि फोटो सपाट यायचा. शेवटि मी माझ्याकडे असलेल्या हेडटॉर्चने २-३ कोनातुन गादिची आणि बोटांची सावली येईल असे फोकस टाकुन फोटो घेतले. मनासारखा किंवा त्यातल्या-त्यात बरा फोटो आल्यावर आम्हि त्याची मोजमापे घेऊ लागलो. १५X१५ सेंमी चा म्हणजे अर्ध्या फुटाचा पंजा होता. चौरस पंजा म्हणजे नराचा पंजा. आणि त्याची स्ट्राईड होती १२६ सेंमी. म्हणजे जवळ जवळ सव्वाचार फुट. आता त्यापुढे साधारण २ फुटि तोंड आणि मागे तीन साडे तीन फुट शेपुट जोडलं कि झाला नाकापासुन शेपटापर्यंत १० फुटि वाघ तयार. बापुंनी परत विचार करुन सांगितलं - " २ दिवसापूर्वीच असंल!! असल्या मातीत ४ दिसापेक्षा जास्त नाय खुणा टिकत. आत्ताच बघा किती त्रास होतोय आपल्याला? असंल २ दिवसा पूर्वीचाच असल!!" त्या ठश्याचा आम्हि साचा घेतला, मोठ्या आनंदान आम्हि परत आलो. रात्री बापू सांगत होते - "मागं असाच एकदा सांजच्याला निघालो होतो, पाऊस लागला होता, कड्यावरुन असा वळलो तर समोर वाघरु, मला पाहुन बुझलं आणि काय वाघच त्यो, गुरगुरला नी अश्शी दानकन उडि मारली दरीत, खाली थोड्या झाडोर्‍याचा आवाज झाला आनी कड्याखालुन दुर-दुर सरकत गेला. अस्सा काटा आला अंगावर!! पण म्या बघितलं, त्याचे पंजे उठले हुते, ते मोठ्या पानानं झाकले, जवळच त्यानं आखाडा(लोळण्याची जागा) केला हुता त्ये बी बघितलं, दुसर्‍या दिवशी हापिसात सायबाला जाउन समद सांगितलं. लगेच गाडि घेऊन माझ्या मागं ४ साहेब आलं. त्यांची खात्री पटल्याव्र मला कोल्हापुरच्या हापिसात नेऊन मला सर्टिफिकट दिलं. सगळ्या मजुरात म्याच लई वेळा वाघ बघितलाय! दर महिन्यात एकदा तरी दिसतोच. वाघ दिसला, तो वाटेवरच असेल तर हात जोडुन म्हणतु - तु तुज्या वाटेनं जा, मला माज्या वाटेनं जाऊ दे!!" हे सगळ सांगताना बापूंच्या चेहर्‍यावरच्या अनुभवी सुरकुत्या लयीत हलत होत्या. मधुनच क्षणभर थांबुन डोळे मितुन, मानेला होकारार्थी झटाका देत बोलायची त्यांची सवय आम्हाला देखिल सरावाची झाली होती. हे सगळं ऐकताना मिनलने एकिकडे मॅगी शिजवायला ठेवले होते. शिवाय सकाळाची बरीच खिचडी देखिल उरली होती. शिवाय बापू काकांची काल रात्रीची एक तांदुळाची भाकरी देखिल उरली होती. भाकरी अगदि कडक झाली होती पण अमित ने ती मॅगीत टाकली खिचडि संपवे पर्यंत भाकरी परत मऊ झाली होती, कोणीहि आत्तापर्यंत तांदुळाची शिळी भाकरी आणी मॅगी अशी डिश कल्पनेतहि खाल्ली नसेल ती आम्हि प्रत्यक्ष खात होतो. ’पानात पडेल ते आणि सगळ्यांना सारख्या प्रमाणात’ या नियमाने सगळ्यांनी निमुट्पणे ती भाकरी-मॅगी डिश मटकावली. जेवण झाल्यावर सामानाची आवरा-आवर करुन आम्हि टॉवरकडे मोर्चा वळवला. टॉवर मोठ्ठा होता. आम्हि पाचहि जण झोपल्यावरहि बॅग, पाण्याच्या बाटल्या, पाऊच बुट हे सगळं ठेवायला बरीच जागा होती. संध्याकाळपासुनच रातवा काऽपूऽ-काऽपूऽ-काऽपूऽ चा ताल धरुन बसला होता. आणि अजुन ४-५ ठिकाणहुन त्याला तशीच साथ मिळत होती. रातकिडे देखिल अविरतपणे आपली किरऽऽऽऽऽऽऽऽऽकिरऽऽऽऽऽऽऽऽऽ ची ड्युटि न थांबता पार पाडत होते. पहिला दिवस आजुबाजुच्या वातावरणाशी जुळवण्यात गेला. सुर्यास्त झाल्या्वर जेवण सोडुन काहिच काम नव्हतं. जेवण करुन आम्हि ०९:१५ ला टॉवरवरती आलो आणि गप्पा मारता मारता ०९:४५ ला सगळे आडवे. मुंबईत आम्हि ०९:४५ ला जेवतो आणि १२:००-०१:०० ला झोपतो. इथे TV, Internet, Mobile, Walkman असे काहिच नव्हते, त्याची गरजहि नव्हती. आज काय-काय झालं याची उजळणी मनातल्या मनात चालु होती. जागा अनोळखि होती म्हणा किंवा आपण जंगलात आहोत म्हणुन म्हणा टॉवरवर देखिल नीट झोप लागत नव्हती. दर २ तासांनी जाग येतच होती. त्यातुन मी कडेला झोपल्याने लोखंडि टॉवरच्या पट्ट्या मधुनच खांद्याला, कोपराला गाऽऽऽर चटका देत होत्याच. मग परत कुशीवर व्हायचे, पांघरुण नीट करायचे आणि झोपायचा प्रयत्न करायचा हे वारंवार होत होते. मधे एकदा तेजसच्या कृपेने कालचाच तो पक्ष्याचा अलार्म देखिल वाजला, मग त्याची मान मुरगाळायचा कार्यक्रम देखिल पार पडला. अखेर कंटाळुन ०५:४५ ला मी आणि मिनल उठुन बसलो.

दिवस दुसरा:
फटफटत होतं. अंगाभोवती पांघरुण कवटाळुन नुसते बसुन राहिलो. बसल्या जागेवरुन समोरचा किनारा दिसत होता, कोणी प्राणी दिसत आहेत का म्हणुन बघत बसलो होतो. अमित देखिल उगीचच तोंडावरुन पांघरुण घेऊन झोपला होता. दर २ मिनिटांनी तो कुशी बदलत होता. शेवटी बापूकाका उठले आणि खाली उतरले. टॉवरचं मॅनहोल उघडावं लागलं अर्थात त्यावर पसरलेल्या अमितला उठावं लागलं. पटापटा आवरुन ७ वाजता भटाकंतीला निघालो. अमितने बापूंना समोरचा डोंगर दाखवुन विचारले - "बापू, तो डोंगर कसला?" बापुंनी लांब हात पसरला - "त्यो? झुंगटिचा किल्ला!! कोणी नाय जात तिथं!" किल्ला शब्द ऐकल्यावर आमचे कान अपोआप टवकारले गेले. "चला मग जाऊन येऊ!!" - अमित. बापूंनी मानेनेच नाहि नाहि म्हणत सुरुवात केली - " काय बघायचयं? काय गावनार नाय!" पण अमितने त्यांना राजी केलं. चालता-चालता वरच्या फांद्यांवर माकड उड्या मारत होतं. अं हं माकड नव्हे शेकरु होतं. शेकरु म्हणजे मोठि खार, मोठि म्हणजे मांजरी इतकि मोठि खार! आमचे पाय झुंगटि किल्ल्याकडे पडत होते. मधेच अमितने मिनलला विचारले - "मिनल लायटर कुठे आहे?" मिनलने खालचा ओठ बाहेर काढुन खांद्यावरच्या बॅगकडे अंगठा हलवला. " वा! म्हणजे अस्वल आलं तर काय टाईम प्लिज! म्हणुन बॅगमधुन लायटर काढणार आहे का?" - अमित. मी विचारले - " लायटरने अस्वलाला काय होणार? डोंबल?" त्यावर अमित उत्तरला अरे चटकन खालचा पाचोळा पेटवायचा कि ते पळुन जातं." एव्हाना मिनल तो लायटर काढुन तो पेटवायचा प्रयत्न करत होती, पण काहि केल्या तो पेटत नव्हता. अमित पुढे झाला आणि मिनलच्या खांद्यावर हात ठेवुन म्हणाला "घे काढला अस्वलाने तुझाअ कोथळा बाहेर!!" आम्हि सगळे खी-खी करुन हसलो. इतका वेळ बापू आमचे उद्योग बघत होते. "अहो! नाई काई होनार, आसं कसं अस्वल येईल उगाच?? माणसाला बघुन दुर जानार ते! आपन त्याच्या रस्त्यात आलो किंवा जखमी आसल तरच येड्यावानी अंगावर येतय!! आम्हि परत बापूम्च्या मागे चालायला सुरुवात केली. मध्ये मिनलला थोडि सुकलेली विष्ठा मिळाली. ती उचलुन तिने बापुंना विचारले हि कोणाची असेल? बापुंनी बरीक डोळे करुन बघितले - "हेऽऽऽ साळिंदराचं असणार!" आजुबाजुला चौकस नजर टाकत आम्हि पुढे झालो. आता चांगलाच चढ आणि रेताड जमिनीचा पट्ट सुरु झाला. खसाखसा पाय घसरत होते. मी सोडुन बाकि सगळ्यांकडे काठ्या होत्या. त्या आधारावर ते पुढे जात होते. मला काठिचा अडथळा वाटतो, म्हणूनच मी नव्हती घेतली काठि. शिवाय एका हातने मला कॅमेरा सांभाळायचा होताच. शेवटी चार जण बसतील इतपत जागा आली, तसे विसावा घेण्यासाठि थांबलो. पाण्याची देवाणघेवाण झाली. वरची झाड खसखसली परत ’शेकरु’. हे शेकरु बर्‍यापैकि धीट असतं. तो झाडाच्या शेंड्यावरुन खाली उतरत आमच्या डोक्यावरील फांदिवर आलं आणि आमच्याकडे बघु लागलं. अमित त्याचा फोटो काढणार तोच त्याने दुसर्‍या झाडावर उडि मारली आणि परत वरती झरझर निघुन गेलं. आम्हि देखिल पुढे कुच केलं. झुंगटीच्या त्या पट्ट्यात एक मोठ्ठ झाड लागलं. त्या झाडाच्या खोडात ३ जण सहज बसु शकतील इतकं मोठं खोड होतं आणि उंची म्हणाल तर आसपासची झाडं त्याच्या अर्ध्यावर देखिल पोचत नव्हती. त्या झाडाला बघुन उगीच माझे अष्टसात्विक भाव जागृत झाले. सगळं सोडुन त्या झाडाखाली तप करायला बसायचा मोह मला क्षणभर झाला. गौतम बुध्दाला देखिल त्या बोधीवृक्षाकडे बघुन असचं काहिसं वाटलं असेल कदाचित. अर्थात एखादि अप्सरा तपोभंग करायला येईपर्यंतच मी तप केले असते.....असो, तर सांगण्याचा मुद्दा असा - "पेड हो तो ऐसा, वरना ना हो!" ते झाड कॅमेराच्या कुठल्याहि अँगलच्या बाहेरचं होत याचं मला आजहि अतोनात दु:ख होतय. शेवटी साधारण २ तास ते अंगावर येणारं रान तुडवल्यावर अचानक डोक्यावरचं छप्पर उडाल्यागत प्रकाश दिसला. आता सगळी खांद्या इतकी कारवी वाढली होती, ती पार सुकली होती. चालताना त्याच्या बीया कपड्यांवर लगटत होत्या. हि कारवी असते तिला सात वर्षातुन एकदाच फुले येतात. एका ठिकाणी बापु थांबले पलीकडे खो‌ऽऽऽल दरी दिसत होती - "हे, आपण सातार्‍यात नी समोरचे डोंगर रत्नागिरीतले. आपण दोघांच्या शीमेवर उभे र्‍हाईलो! आहोत!" मग बापु आमच्याकडे वळुन म्हणाले - " गेल्या १०० वर्सात प्राणी नी कातकरी सोडुन कोन बी आलं नसेल हिथं!" आम्हाला जवळपास अमेरिगो फर्डिनांडला अमेरीकेचा किनारा मिळाल्यावर जितका आनंद झाला असेल तितका आनंद झाला. रत्नागिरीतील त्या काळ्याकभिन्न पहडांना डोळ्यांत साठवत आम्ही शेवटचा टप्पा चढायला सुरुवात केली. वाटेवर मधे २-३ ठिकाणी ताजं शेण पडलं होतं. सगळ्यात पुढे जाणार्‍या अमितला बापु म्हणाले - "पुढं चाहुल घ्या, एखादा गवा असल, दिसला तर तसेच मागे फिरा! आल्या पावली निमुट वळुया!" पण सुदैवाने गवा नव्हता. आम्ही झुंगटीच्या किल्लावर पोहोचलो. पण तो किल्ला वगैरे काहि नव्हता नुसतेच पठार होते. साधारण १००X१५० फुटाचे असेल जेमतेम बाकि सगळा उतार आणि रखरखाट. आजुबाजुला आम्ही अंदाज घेतला पण बांधुन काढल्याची एकहि खुण आम्हाला मिळाली नाहि. जरा निराशा झाली पण आम्हि उजव्या हाताला खाली बघितले - कोयनेचा अख्खा झुंगटि भाग मी कॅमेरात बंद केला. फारच सुंदर दृष्य होते ते. त्या पठारावर जाऊन दरीच्या टोकाशी फतकल मारली आणि बंद मोबाईल सुरु केले. घरी एक-एक फोन लावुन "अजुन तरी सुखरुप आहोत!" असा निरोप दिला. मग थोडं खाणं झालं. आदल्या रात्री एका भांड्यात मी घरुन आणलेले मुग-मटकि व सोयाबीन भिजत घातले होते. सकाळी निघताना मीठ घालुन बांधले होते. पौष्टिक ते पौष्टिक शिवाय तहान लागत नाहि. अशा दोन्हि सोयी भिजल्या कडधन्यात असतात. अर्धातास त्या पठारावर काढला. आमच्या समोर थोडासा उजव्या हाताला ३-४ डोंगर रांगा ओलांडुन ’वासोटा’ किल्ला आम्हाला खुणावत होता. साधारण १०:४५ ला आम्ही परतीला लागलो. खाली उतरताना परत शेकरुने दर्शन दिले. हा मगाशीच दिसलेला शेकरु असावा. साधारण ११:४५ ला आम्ही मुक्कामावर आलो. आज आंघोळ करायचीच हा निश्चय केला होता. उतरताना मी अमितला सुध्दा तयार केलं. आम्हि मुक्कामावर पोहोचताच "चला पोहायला जाऊया!" या अमितच्या वाक्यावर चष्म्यावरुन बघत मिनल म्हणाली - "मला कांदे-बटाटे कापून द्या आणि मग जे करायचे आहे ते करा!!" आमच्या पोहण्याच्या उत्साहावर मिनलने अख्ख्या कोयनेचे पाणी फिरवले. नीमुटपणे १५-२० मिनीटे खुऽऽऽप काबाडकष्ट करुन कांदे-बटाटे चिरुन दिले, आणि...... पाण्याकडे धूम ठोकली - येऽऽऽऽऽधबाऽऽक!!! अडिच दिवसांनी आंघोळ होत होती. आधी घामाचे घाण कपडे व्यवस्थित धुवुन घेतले. वारा इतका भणाणा होता कि पिळुन कपडा आडवा घातला न घातला कि अर्धा वाळुनहि जायचा. कपडे-मोजे धुतल्यावर मग किमान पुढचा सव्वा तास - " कोयना जळी खेळु खेळ कन्हैय्या काऽऽऽऽ लाजता??? सुरु होते. मी स्वत: दिड वर्षांनी असा भरपुर पाण्यात पोहायला उतरलो होतो. वा!वा!! तो सव्वा तास जे काहि पोहणे-डुंबणे झाले काय सांगावे? कोयना आमच्या तिर्थरुपांनी आम्हाला आंदण दिल्यासारखी त्या गाऽऽऽर पाण्यात आम्हि उंडारत होतो, पण मिनलला आमचा तो आनंद फार काळ बघवला नाहि. सव्वा तासाने तिने आम्हाला - "बास झालं!!जेवायला चला आता!" अशी वरुनच हाक मारली. मिनल तेव्हा फार दुष्टपणे वागल्याचा आरोप आम्हि तिघांनी दाखल केला. कोणाहि सहृदय माणसाच्या अंतकरणाला दयेने पाझर फुटावा असे उतरलेले चेहरे घेऊन आम्हि नाईलाजाने बाहेर पडालो. टॉवेल उचलेपर्यंत वार्‍याने अर्धे अंग कोरडे झाले होते. धुवुन वाळत घातलेले कपडे कडकडित वाळले होते. परत तेच स्वच्छ कपडे अंगावर चढवुन तो चढ मोठ्या कष्टानं चढु लागलो. चढ पुर्ण होत आला आणि आऽऽहाहा गरमा गरम खिचडिचा जो काहि घमघमाट नाकात शिरला कि बस्स्स! इतका वेळ पाण्यात राहुन ’भुक’ नावाची गोष्ट या जगात असते याचा विसर पडला होता, त्या स्मृतीभ्रंशातुन आम्ही चटकन बाहेर आलो. धावा-धाव करुन आम्हि ताटे घेऊन "ओम। भवती भिक्षां देहि!" करत बसलो. मग आमच्या अन्नपुर्णेने आम्हाला पोटभर जेवु घातले. अन तिच्यावरील "त्या" दुष्टपणाच्या आरोपातुन आम्हि तिची "बाईज्जत" मुक्तता केली. पोहुन झाल्यावर जेवण्यासारखे आणि जेवुन झाल्यावर दुपारी तासभर झोप काढण्यासारखे दुसरे सुख क्वचितच कुठले असेल. त्या झाडांच्या गार सावलीत अंगावर कवडसे खेळवत आम्हि ताणुस दिली. जोरात वारा सुटला कि पानांचा सळसळाट वाढायचा. थोड्यावेळाने जाग आली तो सुर्याचा रंग पिवळसरपणाकडे झुकला होता. सुर्यास्त होईतो आम्हि प्राण्यांचे निरीक्षण करत टॉवरच्या उजवीकडिल उतारावर बसलो होतो. संध्याकाळ झाली तशी जेवणाची तयारी केली. झटपट भात आणि रस्साभाजी तयार झाली. जेवल्यावर अर्थात तसे काहि काम नव्हते ८-८:३० लाच टॉवर वरती जाऊन बसलो. बापू तर १५ मिनिटात डाराडुर झोपले.

आम्हि सगळे पडल्या पडल्या दिवसभराचा विचार करत होतो. अर्धातास असाच गेला रातकिडे किर्र-किर्र करतच होते. अचानक टॉवरच्या मागच्या बाजूला खाली पाचोळ्यातुन चालण्याचा आवाज आला. तसा मी सावध झालो. दोन मिनिटांच्या शांततेनंतर परत स्पष्टपणे तसाच चालण्याचा आवाज म्हणजे उतारावरच्या पाचोळ्यावर खादा माणुस घाईघाईत चालल्यावर जसा आवाज होईल तसाच आवाज होता. आता अमित सुध्दा उठुन बसला म्हणजे मी एकट्यानेच आवाज ऐकला नव्हता. परत शांतता आता आवाज टॉवरच्या दिशेने सरकत होता. मिनल देखिल कानोसा घेत बसली. तितक्यात तेजस कुशीवर आमच्याकडे वळुन म्हणाला "एऽऽऽऽ खाली चालतय कोणीतरीऽऽ!" तसे आम्हि तिघेहि उखडलो, ओठांवर बोट टेकवुन त्याला गप्प हो म्हणून दटावले. अमित हळुच उठला मागोमाग मी आणि मिनल होतोच. आता सगळाच टॉवर लोखंडि असल्याने थोडिशी हालचाल सुध्दा आवाज निर्माण करत होती. दुसरा कुठलाहि आवाज झाला कि खालचा चालणारा आवाज बंद होत होता. यावेळि अश्या आडरानात कोण आलं होतं? खरं सांगायच तर हृदयाची धकधक वाढली होती. कारण सांभर - भेकर - हरिण रात्री भटकत नाहित. वाघ - बिबट्या मार्जरवंशिय असल्याने त्यांच्या चालण्याचा इतका मोठा आवाज होतच नाहि. मग इतक्या सहज रात्री कोण येत आहे हे समजत नव्हतं. अमितने हळुच उशाशी ठेवलेला ३२ LEDचा अतिशत पॉवरफुल हेडटॉर्च उचलला. आवाज जवळ - जवळ येत होता. पौर्णिमा अगदिच दोन दिवसांवर होती म्हणून चंद्रप्रकाशहि बराच होता. आवाज जसा टॉवरच्या खाली आला तसा अमितने एकदम हेडटॉर्च सुरु केला पण मध्ये इतक्या फांद्या आणि पाने होती कि जमिनिवर फक्त कवडसेच पडले. लगोलग खालचा आवाजहि थांबला. आम्हि पाने-फांद्या चूकवुन प्रकाश खालपर्यंत पोहोचवत होतो पण काहिहि फायदा नव्हता. टॉवरच्या उजव्या बाजुने वाकुन अमितने तसाच प्रयत्न केला पण काहिहि दिसत नव्हतं. अखेर अमितने हेडटॉर्च बंद केला. परत पाच मिनिटं रातकिड्यांच्या किरकिरि शिवाय काहिच ऐकु येत नव्हते. परत चालण्याचा आवाज आता मात्र तो आवाज जंगलातल्या आतल्या भागात सरकत बंद झाला. बापू काका डाराडूर होते. मधुनच घोरण्याशी साम्य असलेले आवाज ते काढत होते. पुढचे २ तास आम्हि फक्त कानोसे घेत जागेच होते. जरा खुट्ट झालं कि झोप उडायची. दुसर्‍या दिवशी बापूंना रात्रीचा प्रकार सांगितला तसा "माणसासारखा चालणारा आवाज??? आवो साळिंदरऽऽऽ" इतकच म्हणून त्यांनी विषयच उडवुन लावला.

पण तशीच दुसरीहि रात्र नविन आवाजाने भरलेली होती. पण त्या आधी दुसर्‍या दिवशी सकाळि काय झाले ते सांगतो - सकाळी आवरुन निघालो. पाण्याला वळसा घालुन समोरच्या किनार्‍याला लागलो काठाकाठाने काहि ठसे मिळत आहेत का बघत होतो. बर्‍याच ठिकाणी गव्यांच्या पाऊलांच्या खुणा होत्या. मधुन मधुन साळिंदर, टिटव्यांच्या खुणाहि मिळत होत्या. एकमेकांपासून १०-१२ फुटांचे अंतर ठेवुन आम्हि एका रांगेत चाललो होतो. सर्वात पाठिमागे बापूकाका होते अचानक बापू काका दबक्या आवाजात ओरडले "आबाऽऽबा बाऽऽ ते बगाऽऽऽऽ" आम्हि वळुन बापूंकडे बघु लागलो तसे ते उखडले - "आवो त्ये बगा तिथंऽऽ आरं आरं त्यो बगा पट्टेर्‍याऽऽऽ बाबो तो बगा लवकर, झाडित सरकतोय!!!" ते दूर डोंगराकडे बोट दाखवत होते पण आंम्हाला त्या डोंगरातली नेमकि दिशा कळत नव्हती. ते परत ओरडले -"आरं गेला रं अस्सा पिवळा पिवळा सोन्यागत रंग!" आणि हातात जवळपास दोन-अडिच फुटाचे अंतर पाडुन "समोरुन येवडा तरि चेहरा आसंल रं‌‍ऽऽऽ च्यॅक चॅक!!" असं म्हणून डोक्याला हात लावुन खालि उकिडवे बसले. हे सगळं मोजुन दहा-बारा सेकंदात घडलं होतं. परत त्यांनी विचारलं "नाय दिसला कोणाला??" आम्हि पडलेले आणि बेसिकली वाघ तिथे होता ह्याची नुकतीच डोक्यात एन्ट्री झालेली संवेदना घेऊन गोंधळलेले चेहरे घेऊन उभे होतो. आम्हि नाहि म्हणताच "श्या!" असा वैतागलेला स्वर काढला. अहो काका पण तुम्हि पाहिला ना? या मिनलच्या प्रश्नावर ते हसुन म्हणाले -"आगं म्या काय दर महिन्या आड असा वाघ बघतोच. तुम्हि बघितला तरच त्ये मोजणार! म्या किती बी सांगितलं तरि फायदा नाय!!" आता आम्हि जाऽम एक्साइट झालो. मग बापुंनी सावकाश ती जागा दाखवली, पावसाळ्यात पाणी वाहुन एक घळ तयार झाली होती तिथे तो वाघ खाली वाढलेल्या कारवीत उतरला असावा. आम्हि बापूंना म्हणालो - "चला मग जाऊ तिथं. मिळेल ठसा - विष्ठा चलाऽऽ!" तसे बापू काका सरळ खाली बसले - "नाय भेटनार काय बी! ह्ये आसली जमिन हाय!" म्हणत तिथल्या रेताड जमिनीकडे बोट दाखवले. पण आम्हाला आता रहावत नव्हतं. आम्हि त्यांच्या मागे भुणभुण करु लागलो - "बापूकाका चला ना!" अखेर गवताची काडि उपटुन ती नाचवत ते उठले - "परत सांगतो काय नाय भेटणार!" अचानक ते थांबले आणि हाताने खाली बसा अशी खुण केली मग समोरच्या झाडिकडे बोट दाखवले आणि म्हणाले "रानडुक्कर" एक भरभक्कम रानडुक्कर तुरुतुरु पळत समोरच्या झाडित गायब झालेले आम्हिहि पाहिले. पाच मिनिटे ते बाहेर येईल अशी आशा धरुन आम्हि दबकुन बसलो पण बहुदा त्याला आमची चाहुल लागली असावी. ते परतले नाहि. मग आम्हि त्या घळिकडे कूच केले. त्या घळिकडे पोहोचायला आम्हांला किमान सव्वातास लागला. बापू म्हणाले ते खरे होते काहिहि मिळणे शक्यच नव्हते. पण अमित - तेजस म्हणाले "आम्हि जरा पुढे जाऊन येतो विष्ठा वगैरे मिळते का बघु!" बापूंनी हवे ते करा असा हात झटकला. एका खुज्या झाडाच्या सावलीत आम्हि तिघेहि बसलो. मग आमच्या गप्पा सुरु झाल्या बापू वाघा बद्दल माहिती सांगत होते - "वाघ काटेरी झाडित नाय शिरत हे तवचा(त्वचा) असते ना त्यची लई हुळहुळी असते, जरा काय लागलं कि चिघळणार, मानंला लागंलं कि चाटुन साफ बी करत येत नाय त्यावर माश्या बसल्या तर जखम वाढते!" वाघांना बच्चे कुठल्या मोसमात होतात? यावर सांगायला लागले साधारण "दिवाळिच्या टायमाला हिथं आलात तर सगळ्या दर्‍यांतुन डरकाळ्या ऐकु येतात. नर - मादा एकमेकांना शोधत आवाज देत फिरतात. त्यांच मीलन झालं कि वाघिण चार येक महिन्यांनी पिलांना जनम देते!" आमच्या अश्या गप्पा चालु होत्या पंधरा - वीस मिनिटे झाली तरी हि दोघं आले नाहित तसे बापू काका "हिथुन हलु नका!" असे सांगुन त्या दोघांच्या मागावर गेले. मीनल आणि मी एकहि शब्द न बोलता बसलो होतो. आता मनात नवे नवे विचार येऊ लागले आता वाघ अच्चानक समोर आला तर? वाघ आपल्याकडे लपुन बघत असेल? ती वाघीण तर नसेल? एकटिच असेल कि बच्चे असतील? समजा बछडे असतील आणि बछड्यांसाठी आम्हि धोका वाटलो तर??? अमित - तेजस का नाहि आले अजुन?? अचानक अमितच्या हसण्याचा आवाज आला आणि या विचारांची साखळि तुटली. तिथे वळुन बघितलं तर तिघेहि हसत - हसत येत होते. "काय बे? काय झालं?" विचारताच त्याने जीभ बाहेर काढली आणि "आई शप्पथ!" अश्या आशयाची मान हलवली. मग येऊन समोर बसला आणि सांगायला लागला - "इथुन दहा मिनिटांवर आम्हि गेलो होतो, अचानक समोरच्या झाडित काहितरी पिवळट हलताना दिसले. तसा तेजसला हाताने थांबायला सांगितलं आणि मी हळुच पुढे गेलो. झाडित आता हालचाल स्पष्ट दिसत हो्ती. अचानक २-३ काळे पट्टेहि दिसले. पट्टे जागेवरुन थोडे हलले. झाडिपासुन मी १५-२० फुटांवर उभा होतो. खरं सांगायच तर हृदय असं वीतभर वर सरकुन घशाशी आलं होतं पण होईल ते बघु एक फोटो मिळावायचाच म्हणुन अजुन २ पाऊलं पुढे गेलो आणि त्या पिवळ्या-काळ्या प्रकाराने झर्रकन हालचाल केली आणि..... मोठ्ठी रानकोंबडि उडुन वरच्या फांदिवर गेली. तीच्या शेपटिच्या पिसार्‍यातले काळे पट्टे तेव्हा नीट दिसले!" असं म्हणुन त्याने डोक्यावर हात मारला आणि परत हसायला लागला. पण तरि त्यावेळि अमितने ती दोन पाऊले पुढे जाण्याचा धोका घेतला याबाबत त्याचे कौतुक वाटले.

पदरि काहिहि न मिळाल्याची निराशा घेऊन मागे फिरलो. पण वाटेत जंगलातल्या पायवाटेच्या शेजारी अमितला वाघाची सुकलेली वि्ष्ठा मिळाली अनेक दिवसांपूर्वीची असावी, उचलल्यावर तुकडे पडत होते म्हणुन एका तिला पिशवीत घालुन कॅंपकडे निघालो. कॅंपसाईट जवळ आलो तर वन विभागाची लॉंच किनार्‍याला लागली होती. त्यात काहि - मुलं होती जवळ आल्यावर समजलं कि पुण्याचा ग्रुप होता(हां तोच चांगल्या चेहर्‍याची मुलगी फेम!) आणि मग एक वनखात्याचा माणुस लॉंच मधुन उतरला - "आलात? वाट बघुन दहा मिनिटात निघणारच होतो!" मग ’कुतुहलापोटि’ मी विचारले "हा ग्रुप तुमच्याबरोबर कसा?" लॉंच मधले "कुतुहल" काहितरि खाण्यात मग्न होते. तसा उखडुन म्हणाला "शिक्षा म्हणून फिरवतोय त्यांना.... मालदेवला होते काल यांच्यामुळे वाघाची शिकार गेली, बरं झालं आम्हि जवळाच कॅंप केला होता. यांचा आवाज इतका होता कि वाघ आणि शिकार दोघेहि पळुन गेले! जंगलाचे नियम माहित नाहित त्यांना इथे राहु देण्यात अर्थ नाहि..... तसहि ग्रुप मधले ३ जण आजारी आहेत. ह्यांना आता दिवसभर जंगलातल्या वेगवेगळ्या कॅंपवर फिरवणार आणि रात्री उशीरा कोयना नगरला सोडणार. तशीहि गाडि आहे स्वत:ची, जातील पहाटे घरि!" मग गेल्या दोन दिवसांतली माहिती आमच्या कडुन त्याने घेतली मग अजुन पाऊण तास त्या ग्रुपला पिदवायला टंगळमंगळ केली उगीच ठरवुन गप्पा वाढवत होता. अखेर कुतुहलासकट गडि आला तैसा निघोन गेला. गेल्यावर परत आधिच्याच ४ दिवसांतले टाईम टेबल गिरवले आणि रात्री टॉवरवर गेलो.

रात्री उशीरा जंगलाच्या आतुन जनावराचा कण्हण्यागत जोरजोरात ओरडण्याच्या आवाज येत होता. नेहमीप्रमाणे बापूंना जगाची फिकिर नसल्याने ते झोपेत गुडुप झाले होते. आम्हि आपापले तर्क लढवत होतो. भेकराला शिकारि कुत्र्यांनी किंवा बिबट्याने दबोचले असावे आणि बिचारं शेवटचे आचके देत ओरडत असावं. किमान वीस - पंचवीस मिनिटे हा आवाज येत होता. मग अर्धा तास तसाच गेला परत अजुन थोडा दुरु तो आवाज यायला लागला पण यावेळि पाच मिनिटांत तो बंद झाला, जंगलाचा कानोसा घेत आम्हि उशीरापर्यंत जागे होते. अमितने त्या रात्री मालिशवाल्याचा धंदा उघडला होता आमच्या थकलेल्या पोटर्‍यांना आणि पाऊलांना अमितने झकास मसाज करुन दिला - "हलकटांनो! फुकटाची सेवा करुन घेताय?? घरी गेल्यावर माझ्या अकाउंट मध्ये प्रत्येकि पाचशे रुपये ट्रान्स्फर करा!" असं म्हणत त्याने आपल्या नव्या साईड बिझनेसची सुरुवात केली. दुसर्‍या दिवशी सकाळि परत वन विभागाची लॉंच आली त्यातुन तीन चार नविन माणसे बाहेर पडली. त्यांच्याकडे HTC चा अर्थात नॅव्हिगेशन सकटचा फोन, नाईट व्हिजनची सोय असलेला कॅननचा महागडा डिजिटल कॅमेरा, वॉकि टॉकि अशी बरीच इ-साधने होती. आल्यावर त्याने आमच्या कडच्या वाघाच्या ठश्याला पालथे घाउन त्याचे फोटो घेतले. मग गप्पांच्या ओघात रात्रीचा प्रसंग त्यांना सांगितला तसे म्हणले "नाहि शिकार नसेल झाली. शिकारीत एकदम झालेल्या छटापटिने आधी झाडांच्या खसपसीचा आवाज येतो व पाच-एक मिनिटे जनावर धडपड करते मग सगळे शांत होते. वाघ - बिबट्याने शिकार केली तर ते बहुदा थेट गळा पकडतात त्यामुळे विंड पाईप आपोआप बंद होतो त्यामुळे आवाज निघण्याचा सवालच नाहि. गुदमरुन शिकार प्राण सोडते. तुम्हांला अस्वलांचा आवाज ऐकु आला असावा, सध्या अस्वलांचा मेटिंग सिझन आहे, मादा अस्वलाचा आवाज असेल तो. अस्वलांच्या मीलनांत बराच ते गोंधळ घालतांत एकमेकांवर गुरगुरणे, मोठ्याने आवाज करणे सुरु असते. दिवसा उकाड्यामुळे अस्वले सावलीत किंवा जंगलातल्या आतल्या भागात फिरतांत, जांभळे, बोरं, मध शोधत, आपली हद्द ठरवत हे भटकणे सुरु असते. उकाड्याने हैराण अस्वले एप्रिल - मे मध्ये मीलन सहसा रात्री किंवा पहाटेच्या थंड वेळी करतात!" ह्या सगळ्या ज्ञान वाटपा नंतर त्यांच्या डिजीकॅमचे जादुचे प्रयोग बघितले. त्या फक्त लेन्सची किंमतच चाळिस हजार होती. आमच्याकडुन नविन माहितीची नोंद करुन ते परत निघुन गेले. दररोज इथे प्राण्यांच्या बाबतीतली नविन माहिती मिळत होती.

मधला एक दिवस फारसे काहि झाले नाहि. सकाळि दुर दोन अस्वले आणि दुपारी गव्यांचे तीन वेगवेगळे गट दिसले. इतकेच. पण यातला सर्वात कळस म्हणजे आमचा जंगलातला शेवटचा दिवस होता. १९ मे २००८ - बुध्द पौर्णिमा.




शेवटाच्या दिवशी संध्याकाळी आम्हाला हे दिसलं, आमच्या पासुन २५०-३०० फुटांवर हे सगळं चालल होतं. -





क्रमश:

Thursday, April 24, 2008

मानसीचा चित्रकार तो.....

पेन्सील स्केच काढणे मला आवडते. सुदैवाने माझे आजी-आजोबा, माझ्या दोन्ही आत्या, आई, मोठी बहिण ह्यांच्या हातात हि कला असल्याने बेसिक मार्गदर्शनाची पायरी मी घरीच ओलांडली. शिवाय ८वीत असताना एलिमेंट्री परीक्षा देखिल B ग्रेड ने का होईना पास झालोय. पुढे इंटरमिजीएट नाहि करता आली Bad luck, पण मग रंगाचा ब्रश सुटला तो सुटलाच(आता मी फक्त MS PAINT पुरता कंप्युटरवरती तो पेंटब्रश वापरतो). पण त्या जागी पेन्सील आली. पेन्सीलने देखिल कागदाला हसवता-रडवता येतं हे समजलं, खरं तर थोडा उशीरच झाला होता पण चित्रकला अगदिच अनोळखी नव्हती. काहि दिवस मान खाली घालुन चित्र काढल्यावर कोणाचे चित्र आहे? हा प्रश्न पडणे कमी होत गेलं. निदान घोडा आहे कि कुत्रा, हा प्रश्न तरी नक्कि पडत नाहि.

रंगांपेक्षाहि पेन्सील शेडिंग जास्त कठिण असतं असं मला वाटतं कारण कागदाचा पांढरा रंग हा एक आणि पेन्सीलचा रंग दुसरा हे दोनच रंग वापरुन चित्र सजवायचं असतं. त्यातहि सगळी किमया हि पेन्सीलची असते. हवी तिथे हवी ती पेन्सील वापरायची. हवी ती म्हणजे हवी त्या ग्रेड्ची खरं म्हणजे त्यात चढ उतार असतो - उतरत्या क्रमाने(Darker to Softer) ग्रेड बघायच्या झाल्याच तर - (Dark)9B, 8B, 7B, 6B, 5B, 4B, 3B, 2B, B, HB, F, H, 2H, 3H, 4H, 5H, 6H, 7H, 8H, आणि 9H(soft) असा क्रम असतो. पण साधारणत: HB पासुन 6B पर्यंत चित्रकलेसाठी वापरल्या जातात, त्या पुढील ग्रेड या बहुतकरुन drafting and engineering साठी वापरतात. ही ग्रेड करण्याची पध्दत युरोपियन आहे. अमेरीकन पध्दतीत #1, #2, #2.5 असे प्रमाण वापरतात. पेन्सील हा शब्द pencillus या लॅटिन शब्दावरुन आलाय त्याचा अर्थ "little tail." असा होतो. पेन्सील जितकी डार्क तितकी ती लवकर झिजते ती जास्त मऊ असते. या उलट पेन्सीलची शेड जितकी सॉफ्ट तितकी ति झिजण्यासाठि hard असते. HB मधला H हा "हार्डनेससाठि" तर B "ब्लॅकनेससाठि" वापरतात.
आपण ज्या पेन्सील वापरतो त्या Graphite pencils असतात, या शिवाय Charcoal pencils, Crayon pencils, Grease pencils, Watercolour pencils, Carpenter's pencils, Copying pencils, Erasable colour pencils, Stenographer's pencil आणि Golf pencil असे इतर प्रकार आहेत. अर्थात चित्रकलेसाठी शेवटच्या २ पेन्सील नाहि वापरल्या जात, किंवा कार्पेंटर्स पेन्सील देखिल वापरत नाहित. आता रंगीत पेन्सील्स असतात पण पेन्सील स्केच म्हंटलं कि "ब्लॅक & व्हाईट" हेच डोळ्या समोर येतं. या शिवाय अजुन माहिती इथे मिळेल.

मधे कधीतरी माणसाच्या शरीराची ठेवण, उभं राहण्याची, बसण्याची पध्दत याची प्रॅक्टिस करण्यासाठि Nude Sketches देखिल काढतो, बहुदा जे सगळेच चित्रकार काढतात. पण घरच्यांनी विशेषत: आईने बघितले तर पोरगं वाया गेलं असं तिला वाटु नये म्हणुन लगेच खोडुनहि टाकतो, उगीच त्यांच्या बालमनावर परीणाम नको व्हायला. खरंतर TITANIC मला यासाठिच जास्त आवडला होता. चित्रकार जॅक(लिओनार्दो डिकॅप्रिओ)चा मला "तेव्हा" भयानक हेवा वाटला होता.[;p].

पुढिल काहि चित्रे माझ्या अल्पमतीने काढली आहेत. मला माहित आहे कि माझ्या चित्रांना अजुन प्रोफेशनल/आर्टिस्टिक टच वगैरे नाहिये.पण हि चित्रे मी माझ्यासाठि काढली आहेत. मी कधी नर्व्हस असेन, मुड खराब झाला असेल तर जुनी गाणी तरी ऐकतो किंवा सरळ चित्र काढायला बसतो. कधी कधी जितका मुड खराब तितकं चित्र चांगलं येतं. कदाचित Frustration बाहेर निघत असेल. अर्थात नेहमीच असं असतं असं नाहि.

चित्र मोठे करुन बघण्यासाठि त्या चित्रावर टिचकी मारा - बोले तो क्लिक करना यार!!



जो १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती आहे, त्याच्या पासुनच श्रीगणेशा.



ज्यांनी आम्हाला ताठ मानेने जगायला शिकवले - छत्रपती शिवराय.
(महाराजांच्या चेहर्‍यावर अगदि आश्चर्योत्सुक भाव आहेत, पण महाराजांनी कधीतरी ते भाव दाखवले असतीलच ना??? मग तेव्हाचे भाव दाखवले आहेत!)



प्रत्येक मराठि माणसाचा मानबिंदु - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.



हिंदुहृदयसम्राट - वीर सावरकर.
(चष्म्याची सावली काढणे हा यातला कढिण भाग होता!)




गुरुदेव!
("रविंद्रनाथ:तीन व्याख्याने" - पु.ल. , या पुस्तकावरील चित्र आहे, सुभाष अवचटांनी ब्रशच्या सहाय्याने काढलेले चित्र मी पेन्सीलने काढले आहे.)



नादब्रह्म - पं.भीमसेन जोशी.



सच्चिन!सच्चिन!! आपला तेंडल्या.
(सचिनचे दात काढल्यावर(म्हणजे कागदावर) मी माझ्यावरच बेहद्द खुष झालो होतो. कारण बर्‍याचदा हसणार्‍याचे पेन्सील स्केच काढले कि दात किडल्यासारखे येतात, कदाचित सचिन कोलगेट वापरतो म्हणुन इथेहि त्याचे दात चकाचक आले आहेत.)




खेळणी विकणारी बाई - कल्पनाचित्र.



हं! क्या कहे? - कोणा अनामिकेचे कल्पनाचित्र.
(बाकि काहि म्हणा हिची सडक बोटे सुंदर आली आहेत. शिवाय ओठांच्या बाह्य रेषा काढताना डार्क रेषा वापरली नाहिये. म्हणुन सलग ओठ आले आहेत नाहितर ओठांभोवती गडद रेषा येउन चित्राची मजा जाते.)





Innocence - सहज सुलभ भाव.



- सौरभ वैशंपायन.