Wednesday, December 26, 2007

भारत भू चे सुपुत्र आम्ही!

भारत भू चे सुपुत्र आम्ही,
निष्ठा अमुची नचिकेताची;
झुंजुनी जिंकु आव्हानांना,
जिद्द आमची भगीरथाची ॥१॥

बृहस्पतिची बुध्दी अमुची,
शक्ती अमुची बलभीमाची;
उलथुन टाकु अन्यायाला,
दिक्षा अम्हा ’भृगुराजाची’॥२॥

चाणक्याची नीती अमुची,
छाती अमुची हनुमानाची;
शक्ती-भक्तीची वाहि गंगा
परंपरा ही अभिमानाची॥३॥

भोळे आम्ही सांबसदाशीव,
अन लबाड आम्ही कान्हापरी;
काहि वेळा रचीतो क्रिडा,
करीतो तांडव भोळे जरी॥४॥

दधीच ऋषीचा त्याग अमुचा,
अन दानत अमुची कर्णाची;
प्रतीसृष्टीचे स्पप्न आमुचे,
ताकद विश्वामित्राची॥५॥

- सौरभ वैशंपायन.

Tuesday, December 18, 2007

मीरा के प्रभू!



श्रीकृष्ण!
आजही संपूर्णपणे कोणालाच कळला नहिये. त्याची रुपच इतकी अनंत आहेत की कोणते रुप खरे? कोणते रुप सहज साध्य आहे हे समजत नाहि. कोणाला तो प्रेषित वाटतो, कोणाला तो तत्वज्ञानी वाटतो, कोणाला सखा वाटतो, कोणाला तो प्रत्यक्ष मदन वाटतो तर कोणाला अगदी लबाड आणि धुर्त मनुष्य वाटतो. कृष्ण स्वत: पाण्यासारखा आहे. म्हणजे पाण्याचे दोन महत्वाचे गुण त्याच्यात आहेत - एक म्हणजे आपण त्याला ज्या रुपात बघु त्यात तो सहज सामावतो, आणि दुसरा म्हणजे जर आपण त्याच्या प्रवाहात पाय घातला कि आपण ओढले जातोच जातो, मग कितिही ठरवले तरी थांबणे शक्य होत नाहि.
तसे बघता श्रीकृष्णाला शेकडो नावे आहेत. पण ती सगळी कार्य/स्थल/काल वाचक आहेत अथवा विशषणे आहेत. म्हणजे गोपाल/द्वारकानाथ/जगन्नाथ अशी आहेत पण त्याचे एकच नाव या सगळ्या नामांना-उपनमांना-उपाध्यांना सामवुन घेते - पुरुषोत्तम! जो सर्व पुरुषात उत्तम आहे. आणि तो सर्वोत्तम का आहे तर वरिल सर्व नावे त्याला मिळाली आहेत. म्हणजे दोन्हि गोष्टी एकमेकांत गुंतलेल्या आहेत. कृष्णाने आपल्या संपूर्ण आयुष्यात जे काही घडवले ते फक्त आश्चर्य या एकाच शब्दात वर्णावे लागेल. कारण एका गांजलेल्या जमातितुन येउन पुढे उत्तर भारताच्या राजकारणातील प्रत्येक गोष्टित आपली उपस्थिती कायम करे पर्यंतचा प्रवास हा फारच गुंतागुंतीचा आहे, आश्चर्यजनक आहे, स्तिमीत करणारा आहे.

कृष्णाने आपल्या बांधवांच्या आणि आपल्या मातृभूमीच्या भल्यासाठी सगळे चांगले वाईट मार्ग अवलंबले. कृष्णाचा जन्म हा फक्त कंसवध, महाभारत, भग्वतगीता सांगणे इतकेच नसुन "Larger than life" असे काहितरी आहे. आता ते "काहितरी" भल्याभल्यांना देखिल नेमके हेच म्हणुन नाहि सांगता आले तर तुम्ही आम्हि कोण? पण श्रीकृष्णाचे हेच वैशिष्ट्य आहे कि तो प्रत्येकाला आपला वाटतो. सगळे कृष्णाचे एक-एक रुप भजत जातात आणि अंती तो आपल्याला मिळालाय या समाधानात आपले आयुष्य सार्थकी लावतात, पण हा खरच लबाड आहे मिळाला-मिळाला म्हणताना सटकुन जातो. त्याला जितके धरायचा प्रयत्न कराल तितका तो सटकत जातो, आणि त्याला शरण गेलात की स्वत:हुन समोर उभा राहतो.

कृष्ण हा आपलासा वाटण्याचे महत्वाचे कारण म्हणजे कृष्णा बरोबर आपण भांडु शकतो. म्हणजे भांडता येतिल असे दोनच देव मला दिसतात एक श्रीकृष्ण आणि दुसरा विठ्ठल. या दोघांशी अगदि शिव्या-शापां सकट भांडता येत. बाकीचे देव कसे अंतर ठेवुन वागतात. ब्रह्मदेवा बद्दल फारसे काहि माहित नाहि, शंकर तर विनाशाची देवता, केले तांडव तर प्रॉब्लेम होईल की. दत्तात्रय तर कडक सोवळे असलेले, शनि बद्दल तर विचारुच नका. राहिला राम, तो तर मर्यादा-पुरुषोत्तम मग आपण कशी मर्यादा सोडायची? म्हणुनच आपला अमर्याद पुरुषोत्तमच बरा.

पण खरी मेख अशी आहे की आपण त्यालाहि नीट ओळखु शकलो नाहिये.आपल्याला मर्यादा-पुरुषोत्तम देखिल झेपला नाहि ना अमर्याद पुरुषोत्तम. त्याचे कार्य आपण "चमत्काराच्या" रंगाने रंगवुन मोकळे होतो. आणि श्रीकृष्ण हा अध्याय संपवतो. खरं पाहता कृष्णा इतके कुशल राजकारणी त्या नंतर फ़क्त दोघच झाले चाणक्य आणि शिवछत्रपती. श्रीकृष्णाच्या राजकिय आणि सामाजिक नियमांचा अवलंब केल्यास समाज आणि राष्ट्र बलशाली होऊ शकेल. एका ’वृष्णी’ नामक यादवसंघाच्या म्होरक्या पासुन सुरु झालेला त्याचा प्रवास यादवीवर संपतो. त्याच्यात अनेक टप्पे आहेत. श्रीकृष्णाच्या प्रत्येक कार्याचे दुरागामी परीणम बघितले तर आपण अचंबित होतो. द्रष्टा असणं म्हणजे काय ते अपल्याला सहज समजत. कृष्णाच्या चरीत्रात नेता कसे ’कमावतो’ आणी अनुयायी किंवा त्याचे वंशज ते कसे गमावतात ह्याचाहि पाठ मिळतो. अर्थात अपल्याला फक्त कमवायचे कसे आणि गमवु नये म्हणुन पुढच्या पिढ्यांना कसे तयार करावे हेच शिकायचे आहे. पण ते तरी कुठे शिकतोय आपण?


-सौरभ वैशंपायन.